Sade Sati: शनी महाराज बघतात आपल्या संयमाची परीक्षा; उत्तीर्ण होणाऱ्याला मिळते सुखाचे घबाड!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 05:15 PM2023-08-04T17:15:39+5:302023-08-04T17:15:58+5:30

Sade Sati : शनी महाराज आपल्या राशीला येणार या विचाराने अनेकांना घाम फुटतो; पण ज्यांच्यावर कृपा होते त्यांना सुखाचा मार्ग गवसतो!

Sade Sati: Shani Maharaj test your patience; The one who passes gets a bunch of happiness! | Sade Sati: शनी महाराज बघतात आपल्या संयमाची परीक्षा; उत्तीर्ण होणाऱ्याला मिळते सुखाचे घबाड!

Sade Sati: शनी महाराज बघतात आपल्या संयमाची परीक्षा; उत्तीर्ण होणाऱ्याला मिळते सुखाचे घबाड!

googlenewsNext

'श' म्हणजे शांती आणि `नि' म्हणजे निश्चय देणारी देवता म्हणजे शनी! ज्या शनिमहाराजांना आपण बघायलाही घाबरतो, त्यांना खगोलशास्त्राने सर्वात मनोहारी ग्रह असल्याचे म्हटले आहे.  ह्या ग्रहाभोवती असलेली कडी अतिशय नेत्रदीपक आहे, असे म्हणतात. म्हणजेच काय, तर त्यांच्याकडे बघण्याची आपली दृष्टी बदलणे गरजेचे आहे.

सूर्यदेवाचे पुत्र, यमदेवाचे ज्येष्ठ बंधू आणि वायुपुत्र हनुमंताचे जिवलग मित्र असलेले शनिदेव, त्यांचे वर्णन करताना महर्षी वेदव्यासांनी नवग्रह स्तोत्रात म्हटले आहे -

नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम।।

'शनी' हा ग्रह नवग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ असल्याचे म्हटले जाते. मात्र, त्यांच्याबद्दलचा लोकांचा `ग्रह' आजतागायत शुद्ध झालेला नाही, उलटपक्षी ते आपल्या राशीला येऊ नयेत म्हणून सगळे `आग्रही' असतात. एखाद्याला रावाचा रंक, तर एखाद्याला रंकाचा राव बनवण्याची किमया त्यांच्याकडे आहे. ते कठोर शासनकर्ते आहेत. म्हणून, जे लोक दुष्कृत्य करतात, ते त्यांना बाचकून असतात. मात्र ज्या व्यक्तीचे आचरण शुद्ध असते, अशा व्यक्तींनी शनी महाराजांची भीती बाळगण्याचे अजिबात कारण नाही. मनुष्याला शिस्त लागावी म्हणून साडेसातीच्या काळात ते कठोरपणे वागतात, पण ती व्यक्ती सुधारली तर तिचा उद्धारही करतात.

रामायणात राम-सीतेला जो वनवास घडला तो शनीच्या साडेसातीमुळे, रावणाचा पराभव झाला, तो शनीची वक्रदृष्टी झाल्यामुळे, कृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला, राजा हरिश्चंद्र आणि तारामतीलाही शनिपीडा सहन करावी लागली. इतकेच काय, तर शनी महाराजांचे जन्मत: सावळे रूप पाहून ते आपले अपत्य असूच शकत नाही, असे म्हणत आपल्या बायकोच्या चारित्र्यावर शंका घेणाऱ्या सूर्यदेवालाही अर्थातच आपल्या जन्मदात्या पित्यालाही माफ केले नाही, तर आपली काय कथा? 

शनि महाराजांनी कावळ्याला आपले वाहन निवडले, कारण कावळ्याकडे अतिशय सूक्ष्म नजर असते, तो घाण स्वच्छ करतो. समाजातील अनैतिकतेची, अंधश्रद्धेची, असमानतेची घाण स्वच्छ करण्यासाठी शनी महाराज कावळ्यावर स्वार झाले आहेत.

शनी महाराज अत्यंत  शीघ्रकोपी आहेत असे म्हटले जाते. जी व्यक्ती चुकीचे काम करते त्याच्यावर कोणाचाही कोप होणे स्वाभाविक आहे, मग शनी महाराज त्यासाठी अपवाद कसे ठरतील? उलट जे लोक धैर्याने संकटांना सामोरे जातात, त्यांना शनी महाराजांची कृपादृष्टी लाभते. हेच सांगणारी विक्रमादित्य राजाची पौराणिक कथा आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. त्याच्या कठोर परिश्रमांना पाहून शनी महाराजांनी त्याची ज्या ठिकाणी साडेसातीतून मुक्तता केली, ते ठिकाण म्हणजे नंदुरबार येथील `शनिमांडळ'. ते स्थान शनी साडेसाती मुक्तीस्थान म्हणूनही ओळखले जाते.  या तीर्थक्षेत्री स्त्रियांनाही दर्शन घेण्याची परवानगी आहे. त्यामुळे असंख्य भाविक शनी महाराजांच्या दर्शनाला तिथे पोहोचतात. भक्तिभावाने शरण गेलेल्या भक्ताला शनी महाराजांची कृपादृष्टी लाभते, असा आजवरचा भक्तांचा अनुभव आहे. शनी देव ज्यांच्या राशीला येतात त्यांची कामे इतरांच्या तुलनेत थोडी उशिरा होतात, पण होतात हे नक्की! 'लेट पण थेट' असा भक्तांचा त्यांच्या बाबतीत अनुभव आहे. 

त्यांची निष्काम मनाने भक्ती करणाऱ्याला आणि शुद्ध आचरण ठेवून आपले काम चोखपणे करणाऱ्या व्यक्तीला शनि महाराजांची कृपादृष्टी लाभते, अशी ग्वाही शनिस्तोत्रात आढळते.

सूर्य पुत्रो दीर्घ देहो विशालाक्ष: शिवप्रिय:।
मन्दचार: प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि:।।

Web Title: Sade Sati: Shani Maharaj test your patience; The one who passes gets a bunch of happiness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.