Samartha Ramdas Swami Jayanti: समर्थांचे विचार समजून घ्यायचे तर त्यांचे व्यक्तिमत्त्व आधी समजून घ्यायला हवे, त्याचाच हा प्रयत्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 10:02 AM2023-03-30T10:02:00+5:302023-03-30T10:05:01+5:30

Samartha Ramdas Swami Jayanti: समर्थ रामदास स्वामी यांची आज जयंती, त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा धावता आढावा. 

Samartha Ramdas Swami Jayanti: If you want to understand the thoughts of Samartha, you have to understand his personality first, this is his attempt! | Samartha Ramdas Swami Jayanti: समर्थांचे विचार समजून घ्यायचे तर त्यांचे व्यक्तिमत्त्व आधी समजून घ्यायला हवे, त्याचाच हा प्रयत्न!

Samartha Ramdas Swami Jayanti: समर्थांचे विचार समजून घ्यायचे तर त्यांचे व्यक्तिमत्त्व आधी समजून घ्यायला हवे, त्याचाच हा प्रयत्न!

googlenewsNext

>> रोहन उपळेकर 

सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराज !!या नावातच सर्व काही आले. त्यांच्या समग्र चरित्राचे व उपदेशाचे सार 'राम तोचि रामदास' या पाच शब्दांमध्ये पूर्णपणे सामावलेले आहे. आज चैत्र शुद्ध नवमी, समर्थ रामदास स्वामी यांची जयंती, यानिमित्ताने घेऊया त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध!

धगधगते वैराग्य, अपार उत्साहपूर्ण व उत्फुल्ल चर्या, हनुमंतांसारखी पीळदार शरीरयष्टी, सूर्यासमान तेजस्विता, ससाण्यासारखीच चाणाक्ष नजर, अचूक चौफेर निरीक्षण, सागराप्रमाणे गहिरे ज्ञान, हिमालयासारखी उत्तुंग बोध-प्रतीती, उसळत्या गंगौघासारखी अवखळ पण सुमधुर वाणी, अद्वितीय काव्यप्रतिभेची, अलौकिक ऋतंभराप्रज्ञेची वैभवसंपन्न रत्नखाण, पराकोटीची संवेदनशीलता, मायेहूनही मवाळ व बुडत्या जनांचा अपरंपार कळवळा असणारे विशाल हृदय, अपार भगवत्प्रेम, दास्यत्वाची चरम अनुभूती सांगणारी अनन्य शरणागती ; या व अशा असंख्य सद्गुणांची घनीभूत प्रसन्न श्रीमूर्ती म्हणजेच राष्ट्रगुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराज  !!

विलक्षण दूरदृष्टीने त्यांनी त्या मोगली काळात ११०० पेक्षा जास्त मठांची स्थापना करून रामभक्तीचा अगदी हलकल्लोळ मांडला होता. हरिकथा ब्रह्मांड भेदून पल्याड नेली. बलभीमाची मंदिरे स्थापून, शरीर कमविण्याचा पायंडा घालून त्यांनी तरुणांमध्ये एक अपूर्व स्वत्व-जाणीव निर्माण केली. स्वधर्म व स्वराष्ट्राविषयी निस्तेज होऊ लागलेल्या समाजात नवचेतना निर्माण केली. विवेकाचे, वैराग्याचे व प्रयत्नांचे महत्त्व पुनश्च अधोरेखित करून हिंदूधर्मावर जमलेली राख फुंकून टाकून, तो दिव्य धर्म-स्फुल्लिंग त्यांनी पुन्हा चेतवला. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संस्थापनेच्या कार्यातही त्यांचा मोलाचा सहभाग होता. त्याकाळी परकीय आक्रमणांमध्ये, मोगली राजवटीतही, समर्थांनीच आपल्या मराठी समाजाचे मन खचू न देता, सतत हिंमत देत स्वत्व जागृत ठेवले. छत्रपती शिवरायांसारखा जाणता राजा निर्माण करून स्वराज्याचे अत्यंत विलक्षण स्वप्न साकारले. आपल्या मठांच्या व शिष्यमंडळींच्या माध्यमातून देखील स्वराज्याचे सुराज्य, श्रींचे राज्य होण्यास मदत केली. छत्रपती शिवरायांवर वेळोवेळी कृपाछत्र घालणारे, आमची धर्मजाणीव सतत जागती ठेवणारे, आमची मराठी अस्मिता निरंतर जपणारे, वाढविणारे, आमचे परमार्थविश्व अखंड आनंदी व वैभवसंपन्न करणारे राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी, तुम्हां आम्हां सर्वांचे लाडके, परम आदरणीय न ठरते तरच नवल ! यासाठीच सद्गुरु समर्थ श्रीरामदास स्वामी महाराजांचे महाराष्ट्राच्या पावन भूमीतील ओजस्वी संतपरंपरेत आगळे-वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण असे अढळस्थान आहे.

शिस्तबद्ध व नेटके संघटन कसे निर्मावे व कसे निरंतर सुव्यवस्थितपणे चालवावे, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे समर्थ श्री रामदास स्वामी महाराज होत !
संसारतापाने पोळलेल्या, भवसागरात हकनाक बुडणा-या जनप्रवाहाला पाहून अत्यंत कोमल अंत:करणाचा हा समर्थ महात्मा कळवळला आणि त्याने दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक तसेच भीमरूपी सारखी स्तोत्रे रचून जनउद्धारासाठी नौकाच निर्माण केली.

त्यांच्या मनोबोधाचे, त्यांच्या दासबोधाचे चिंतन हे आपल्याला सर्वांगांनी पुष्ट करणारे, परमार्थात अग्रेसर करणारे आहे. नित्य नियमाने मनाचे श्लोक म्हणणारा, त्यांचे चिंतन करणारा साधक कधीच दु:खी होणार नाही. नकारात्मक विचारांच्या कधीच तो आहारी जाणार नाही. हळूहळू मनाचे सर्व दोष जाऊन तो वैराग्य, सामर्थ्य व ज्ञान यांचा चढत्या क्रमाने अनुभव घेऊन पूर्णसुखी होईल यात शंका नाही.

सद्गुरु श्री समर्थांशिवाय आपली दररोजची पूजाही गोड वाटणार नाही. कारण आपण नेहमी म्हणत असलेल्या, गणपती, मारुती, शंकर, खंडोबा इत्यादी देवतांच्या लालित्यपूर्ण, रसाळ व बोधप्रद अशा अनेक आरत्या या समर्थांच्याच आपल्यावरील कृपेचे द्योतक आहेत. आपल्या दैनंदिन जीवनातही त्यानिमित्ताने नकळत का होईना पण श्री समर्थांचाच सतत सहवास आपल्याला लाभतोय, हे महत्भाग्यच आहे आपले !!

सर्व बाबतीत सतत सावधानता बाळगून, नेटकेपणे पण अलिप्ततेने संसार करीत करीतच परमार्थ साधण्याचा मौलिक उपदेश देऊन, प्राप्त परिस्थितीतही योग्य पद्धतीने हरिकथेचा कल्लोळ करावयास सांगणारा, सांगितल्याबरहुकूम स्वत:ही वागून दाखवणारा हा महात्मा अद्वितीयच म्हणायला हवा. आपल्या कुबडीमध्ये गुप्तपणे शस्त्र बाळगणारे आणि जोर-बैठका, सूर्यनमस्काराचा सतत पुरस्कार करणारे समर्थ, बलभीमाचे सच्चे उपासक होते. बलवान साधकच परमार्थातही पूर्णत्वास जातो, ही त्यांची सार्थ शिकवण होती.

"मनाची शते ऐकता दोष जाती ।" असे छातीवर हात ठेवून सांगणारी त्यांची समग्र रचना, साधकांसाठी अनंतकाळपर्यंत मार्गदर्शक आहे, तीच आपल्या साधनेचे अमृतमधुर पाथेय आहे. अखंड ऊर्जेचा खळाळता स्रोत आहे.

संत वाङ्मयाचे ज्येष्ठ-श्रेष्ठ अभ्यासक प.पू.श्री.शिरीषदादा कवडे श्री समर्थांचे यथोचित माहात्म्य सांगताना म्हणतात की, "भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींच्या वाङ्मयाचा साक्षेपी आणि सखोल अभ्यास समर्थांनी केलेला होता, हे त्यांच्या वाङ्मयातून स्पष्टपणे दिसून येते. श्री माउलींच्या तत्त्वज्ञानाचे एवढे मूलगामी, यथायोग्य आकलन व त्या उन्मेषांची इतकी समाजहिताभिमुख मांडणी अन्य कोणी संतांनी अभावानेच केलेली दिसेल. म्हणून समर्थ रामदासांचे वाङ्मय अभ्यासले तर श्री माउलींचे सिद्धांत अधिक चांगल्याप्रकारे उलगडतात, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही."

किती आणि काय काय लिहावे? आपली क्षुद्र वाणी-लेखणी फारच तोकडी आहे या "समर्थ" रूपाचे वर्णन करण्यास !! श्रीरामरायांच्या या अपरस्वरूप दासाचे, श्री समर्थांचे यथार्थ वर्णन करण्यास आपण खरोखरीच असमर्थ आहोत. म्हणूनच त्यांच्या पदीं दंडवत घालून त्यांची करुणा-कृपा भाकून एकवार "जय जय रघुवीर समर्थ ।" असा जोरदार गजर करूया !!

समर्थ ते समर्थच, अपूर्व-अद्वितीय-उत्तम-अलौकिक-अद्भुत..... एवढेच म्हणून त्यांच्या श्रीचरणीं प्रेमादरपूर्वक लोटांगण घालून त्यांची करुणा भाकणे व त्यांच्या बोधाचे पाईक होऊन, त्यांच्या शांत-शीतल कृपाछत्राखाली परमार्थ-मार्गक्रमण करणे, हेच आपले परमसौभाग्य आहे. ते तरी थोडके कसे म्हणावे?
जय जय रघुवीर समर्थ ।

Web Title: Samartha Ramdas Swami Jayanti: If you want to understand the thoughts of Samartha, you have to understand his personality first, this is his attempt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.