Shani Dev: दुष्कर्म करणाऱ्यांना शनी देव अद्दल घडवतातच; वेळेत सावध व्हा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 01:46 PM2024-08-22T13:46:25+5:302024-08-22T13:46:57+5:30

Shani Dev: आज शनीचे उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे, त्यानिमित्ताने शनी देवाची न्यायप्रक्रीया समजवून सांगणारा लेख!

Shani Dev: Shani Dev makes justice to the wrongdoers; Be careful in time!  | Shani Dev: दुष्कर्म करणाऱ्यांना शनी देव अद्दल घडवतातच; वेळेत सावध व्हा! 

Shani Dev: दुष्कर्म करणाऱ्यांना शनी देव अद्दल घडवतातच; वेळेत सावध व्हा! 

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

आपल्या आजूबाजूला असंख्य चांगल्या वाईट घटना रोज घडत असतात . ह्या सर्वाचा आपल्या मनावर सुद्धा परिणाम होत असतो . कुणाचा व्हिसा आला किंवा विवाह ठरला तर मन आनंदित होते प्रसन्न वाटते पण कुणाला गंभीर आजार किंवा तत्सम घटना घडली तर मन हळहळते . वाईट वाटत राहते आणि त्यात कुणी जवळचे असेल तर मग कित्येक दिवस त्याचा परिणाम आपल्या मनावर होत राहतो . पण असे का घडले ह्याचा विचार आपल्याला त्या व्यक्तीने केलेल्या पूर्व आयुष्यातील कर्मांपाशी नेतो त्यावेळीस असे वाटते की इतकी वाईट कर्मे केली आहेत म्हणून हे फळ आहे , कदाचित झालेली शिक्षा कमीच आहे. 

आयुष्यात कुठलीच गोष्ट अशीच घडत नसते. प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असतेच. ह्याचे मूळ कुठेतरी आपण केलेल्या कर्मातच असते. आपले राग लोभ, दुसऱ्या बद्दलचा द्वेष  तिरस्कार , मत्सर अनेकदा पराकोटीला पोहोचतो आणि आपल्या हातून वाईट कृती किंवा बोलण्यातून समोरच्याला दुःख दिले जाते. ह्याचा परिणाम म्हणजे आपण आपले स्वतःचे “ कर्म “ वाढवून ठेवतो जे पुढे आपल्यालाच फेडावे लागते . 

आपल्याला दुखावणाऱ्या, अपमानीत करणाऱ्या व्यक्ती खूप असतात. आजकाल तर गरजेपुरते इतरांना वापरून घेण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. कारण माणसाची स्वार्थी वृत्ती खूप वाढली आहे . कामाशिवाय आजकाल बात नाही. असो कलियुग आहे हे , ह्याहून वेगळे अपेक्षित नाहीच . पण अनेकदा चांगल्या व्यक्तींना त्रास होतो, त्यांच्या चांगल्या स्वभावाचा फायदा करून त्यांना फेकून दिल्याची भावना त्यांच्या मनात येते आणि  त्यांचा माणुसकीवरचा विश्वास उडून जातो. आपणही उलटा वार करू शकतो , फाडफाड बोलू शकतो, पण हे सर्व करून मिळणार काय ? पुन्हा आपण आपलेच कर्म वाढवून ठेवणार आणि मग ते फेडण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेणार.

गेल्या अनेक दिवसात घडलेल्या घटनांवरून माझा देवावरचा आणि शनी महाराजांवरचा  विश्वास कित्येक पटीने वाढलाय . शनी महाराज कुणालाही सोडत नाहीत. तिथे वशिला चालत नाही किंवा पैशाने त्यांना विकतही घेता येत नाही . योग्य वेळ आली की ते शिक्षा करतात आणि अशी शिक्षा करतात की दुनिया पाहत राहते, त्या शिक्षेची तीव्रता आणि दाह इतका भयंकर असतो की त्यावरून समोरचचा सुद्धा चूक करताना दहा वेळा विचार करेल .

शेवटी १०० अपराध झाल्यावरच शिक्षा होते, पण ती होतेच होते. शनीचे नियम कडक आहेत, त्यांनी शिक्षा सुनावली की संपले सर्व काही , मग फक्त ती निमूटपणे भोगणे हेच आपल्या हाती राहते. तिथे माफी नाही, कुणालाही नाही! 

मी कसाही वागेन आणि कुणाचा बाप माझे वाईट करू शकणार नाही ह्या भ्रमात माणसाने राहू नये हे सांगण्यासाठीच हा लेखन प्रपंच. आपल्याला अत्यंत प्रिय असणाऱ्या व्यक्तीचा विरह, होत्याचे नव्हेत होणे हीच शनी महाराजांची शिक्षा आहे.

माणसे फेकून द्यायची फार हौस आहे ना? द्या . मग बघा शनी तुम्हाला कुठे फेकून देतो ते . कुणाला कमी लेखू नका , कुणाच्याही परिस्थितीवर , व्यंगावर , अपयशावर हसू नका, कुणाची निर्भत्सना, निंदा करू नका. आपल्याला वेळोवेळी मदत करणाऱ्या लोकांचे ऋण माना आणि त्या ऋणात राहा . गोड बोलून सहानुभूती मिळवून आपली कामे करून घेवू नका . स्वाभिमानाने जगा कारण आपली कष्टाची भाकरीच शेवटी गोड लागणार आहे . 

कशाला राग करताय कुणाचा, इथेच सर्व सोडून द्यायचे आहे तुम्हाला, आम्हाला सगळ्यांनाच . विसरा आणि मुक्त व्हा ह्या षडरिपुंच्या ओझ्यातून . बघा कसे मोकळे मोकळे वाटेल आणि शांत झोप सुद्धा लागेल. कशाला शनिदेवाच्या शिक्षेस पात्र ठरायचे ? विचार करा . करोनाचा धक्का , फटका जग अजून पचवू शकला नाही आहे. लाखोंची खरेदी क्षणात करणारे रस्त्यावर आले बेघर झाले. 

का नाही बघवत आपल्याला दुसऱ्याचे चांगले. अहो माझ्याकडे सर्व मग नक्की कसला राग ? काय बघवत नाही आहे आपल्याला ? दुसऱ्याचा आनंद बघवत नाही की त्यांची मुले परदेशात शिकायला जात आहेत ते बघवत नाही ? जो तो आपापल्या कर्माचा धनी, आपले पूर्वकर्म आपले आजचे आयुष्य घडवत आहे . मग आजचे कर्म जर उद्याचा आपला दिवस घडवणार असेल तर ते नक्कीच अधिक उत्तम असायला हवे ना ? पटतंय का? 

शनी मनावर आघात करणारच, तुमची प्रिय वस्तू व्यक्ती हिरावून नेणार , तुम्ही इतरांना रडवलेत ना, त्यांचा अनादर केलात , निंदा केलीत , लोकांना पाण्यात पाहिलेत , भोगा आता आपल्या कर्माची फळे.

रवी म्हणजेच सूर्य. सकाळी उगवतो आणि आपल्या आशा पल्लवित होतात इतकी त्या सूर्यप्रकाशात ताकद आहे . मध्यानीला सूर्य डोक्यावर तळपत असतो तेव्हा त्याच्याकडे पाहणेही अशक्य असते . पण ह्या दोन्ही अवस्था सोडून संध्याकाळी तो अस्ताला जातो . ह्यावरून आपण काय शिकतो ? आपल्या आयुष्याच्याही ह्याच तीन अवस्था आहेत , पटतय का?  आपलेही आयुष्य बदलत जाणार , वय पुढे जाणार , शरीर खचणार आणि मन सुद्धा , आयुष्य काय कधी वळण घेईल कुणालाच सांगता येत नाही . निसर्ग सुद्धा जिथे शाश्वत नाही तिथे आपले आयुष्य काय? घमेंड , अहंकार माणसाच्या आयुष्याची माती करण्यासाठीच आलेला असतो . मी म्हणजे कोण ? अरे तू कुणीच नाहीस कारण क्षणात ते काय करतील समजणार सुद्धा नाही. जरा पैसा आला की आपले वागणे बोलणे इतके बदलते की जसे काही कुणाची गरजच नाही आपल्याला . 

अहो गरज जन्मालाच घेवून आलेले आहोत आपण . म्हणूनच माणसात आनंद शोध, सगळ्यांना धरून राहा कारण शेवटी परमेश्वर माणसातच आहे. महाराजांच्या सेवेत राहून आपला अहंकार सुद्धा नष्ट होईल. वास्तवाची जाणीव होवून जगायला प्रवृत्त करेल हे नामस्मरण .

आजूबाजूच्या घटना पाहून मन व्यथित झाले. प्रथम १० रुपयाची चोरी मग १०० असे करत पुढे हे हात काय काय करतील कारण आपल्याला वाटते कुणी पाहत नाही आपल्याला , शिक्षा करणार कोण ? पण शनी महाराज आहेत आणि त्यांचे अस्तित्व अबाधित आहे. आपल्या कर्माचे फळ दिल्याशिवाय ते राहणार नाहीत . 

आपल्या आयुष्याची इतरांशी तुलना करणे बंद करा , जे आहे ते आहे. कुणाचा हेवा , तिरस्कार करून आपले भले निश्चित होणार नाही उलट संकटे आपली पाठ सोडणार नाहीत . आपल्याला त्रास देणाऱ्यांना देव शिक्षा कधीही करत नाही ह्या चुकीच्या कल्पना उराशी बाळगू नका, वेळ आली की शनी महाराज एका क्षणाचाही विलंब न लावता शिक्षा करतात, जन्मभराची अद्दल घडवतात. सगळा माज क्षणात उतरतो त्यामुळे कुणीही देवांच्या वरती जावून बसायचा प्रयत्न सुद्धा करू नये . वरील सूर्याचे उदा हेच आपले आयुष्य आहे . एकदिवस आपला अहंकार आणि माज उतरतोच उतरतो आणि तो असा उतरतो की भल्या भल्यांची झोप उडते आणि इतरांना दशहत बसते . आयुष्य नेहमी तेच राहत नाही हेच आपल्याला सुर्यानेही शिकवले आहे .आपण सगळेच मातीतून आलो आणि मातीतच मिसळणार आहोत त्यामुळे मी मी करणे सर्व फोल आहे कारण ..

चढता सुरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा .... 

Web Title: Shani Dev: Shani Dev makes justice to the wrongdoers; Be careful in time! 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.