समाधी घेण्यासाठी संत एकनाथांनी फाल्गुन वद्य षष्ठी तिथी का निवडली? ‘असे’ आहे दिवसाचे महात्म्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 09:35 IST2025-03-19T09:31:45+5:302025-03-19T09:35:39+5:30
Shri Eknath Shashti 2025: फाल्गुन वद्य षष्ठी श्री एकनाथ षष्ठी म्हणून ओळखली जाते. जाणून घ्या...

समाधी घेण्यासाठी संत एकनाथांनी फाल्गुन वद्य षष्ठी तिथी का निवडली? ‘असे’ आहे दिवसाचे महात्म्य
Shri Eknath Shashti 2025: महाराष्ट्रातील एक श्रेष्ठ संतकवी. नारदीय कीर्तनाचे समर्थक आणि प्रसारक संत एकनाथ महाराज. संत एकनाथांचा जन्म पैठण येथे झाला. त्यांच्या आईचे नाव रूक्मिणी व वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. एकनाथ अगदी लहान असताना त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. तेव्हा त्यांचा सांभाळ त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केला. चक्रपाणी यांचे वडील म्हणजेच एकनाथांचे पणजोबा संत भानुदास हे विठ्ठल भक्त होत. एकनाथ लहानपणापासून तल्लख बुद्धीचे होते. ईश्वरभक्तीचे वेड त्यांना उपजतच होते. संत एकनाथ यांनी अनेक अभंग, काव्यरचना, भारूडे लिहिली. संत एकनाथ यांची ग्रंथसंपदा अगदी विपूल आहे. विस्मरणात गेलेली संत ज्ञानेश्वरांची समाधी शोधण्याचे काम संत एकनाथांनी केले. शिवाय ज्ञानेश्वरीची प्रतही शुद्ध केली. संत एकनाथ महाराजांनी फाल्गुन वद्य षष्ठीला अवतारकार्याची सांगता केली. २०२५ मध्ये २० मार्च रोजी फाल्गुन वद्य षष्ठी आहे. ही तिथी श्री एकनाथ षष्ठी म्हणून ओळखली जाते.
बालवयातच ते गुरूच्या शोधात निघाले. वयाच्या बाराव्या वर्षी एकनाथांनी देवगिरी येथील जनार्दनस्वामींकडे जाऊन त्यांचे शिष्यत्व पतकरले. तेथे सहा वर्षे राहून संस्कृत शास्त्रपुराणांचे व ज्ञानेश्वरीसारख्या अध्यात्मग्रंथांचे अध्ययन त्यांनी केले. गुरुकृपेने परमेश्वरी साक्षात्कार झाल्यावर एकूण सात वर्षे त्यांनी तीर्थयात्रेत घालविली. या तीर्थयात्रेत प्रथम काही दिवस जनार्दनस्वामी त्यांच्याबरोबर होते. तीर्थयात्रेनंतर त्यांनी गृहस्थाश्रभ स्वीकारला. गिरिजा हे त्यांच्या पत्नीचे नाव. एकनाथांना हरिपंडित नावाचा एक मुलगा आणि गोदा, गंगा या नावाच्या दोन मुली होत्या. कर्नाटकातील डंबळ येथील बाळकृष्णवंत चंद्रकेत ह्यांना दुसरी मुलगी दिली होती. प्रसिद्ध मराठी पंडित कवी मुक्तेश्वर हा गोदेचा मुलगा. कवी शिवराम पूर्णानंद हा नाथांचा मुलीकडून पणतू.
पाच समकालीन सत्पुरुष नाथपंचक
अस्पृश्याच्या चुकलेल्या मुलास कडेवर घेऊन महारवाड्यात पोहोचवणे, श्राद्धाला ब्राह्मण येईनात, तेव्हा शिजवलेले अन्न अस्पृश्यांना खाऊ घालणे व गाढवाला गंगोदक पाजणे यासारख्या एकनाथांच्या चरित्रातील आख्यायिकावरून अद्वैत वेदान्ताचा व्यापक अर्थ त्यांच्या अंगी प्रत्यक्ष बाणलेला होता, हे दिसून येते. एकनाथ, विठा रेणुकानंदन, जनी जनार्दन, रामा जमार्दन आणि दासोपंत ह्या पाच समकालीन सत्पुरुषांना नाथपंचक म्हटले जाते. यांपैकी दासोपंतांची बरीच आणि जनी जनार्दनांची काही मराठी रचना उपलब्ध आहे. प्राचीन मराठीतील भारूडरचनेत नवचैतन्य, विविधता व विपुलता निर्माण करण्याचे कार्य एकनाथांनीच केले. एकनाथांचे वाङ्मयीन, सांप्रदायिक व सांस्कृतिक कर्तृत्व त्यांच्या समन्वयवादी व्यक्तिमत्त्वाचेच निदर्शक आहे. प्रपंच व परमार्थ तसेच संतत्व आणि समाजोद्धार यांची यशस्वी सांगड आपल्या जीवनात त्यांनी घातली. अडीच शतकांच्या ज्ञानेश्वरोत्तर कालखंडात संतसाहित्याची परंपरा खंडित व विस्कळित झाली होती. एकनाथांनी त्या पूर्वपरंपरेचे भान ठेवून वाङ्मयनिर्मिती केली म्हणूनच ती परंपरा अखंड, एकात्म व प्रगमनशील राखण्याचे कार्य ते यशस्वीपणे करू शकले.
रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण
चतुःश्लोकी भागवत ही नाथांची पहिली रचना. भागवत पुराणाच्या द्वितीय स्कंधाच्या नवव्या अध्यायातील ३२ ते ३५ श्लोकांवरील १,०३६ ओव्यांचे हे भाष्य आहे. वरील भाष्यानंतर एकनाथांनी काही आध्यात्मिक स्वरूपाची स्फुट प्रकरणे लिहिली. शंकराचार्यांच्या हस्तामलक या चौदा श्लोकांच्या स्तोत्रावर ६७४ ओव्यांची रसाळ टीका त्याच नावाने त्यांनी लिहिली. शुकाष्टक हे प्रसिद्ध संस्कृत अष्टकावरील ४४७ ओव्यांचे विवरण आहे. स्वात्मसुखात ५१० ओव्या असून गुरुस्तवन, अद्वैतभक्ती व भक्तिमार्गातील परमार्थ हे विषय त्यात आले आहेत. आनंदलहरीतील १५० ओव्यांत आत्मस्थितीतील आनंदाचे व गुरुभक्तांचे वर्णन आहे. चिरंजीवपदात साधकाला उपदेश केलेला आहे. रुक्मिणी स्वयंवर हे भागवत संप्रदायातील पहिले व परंपराप्रवर्तक आख्यानक काव्य होय. भागवताच्या दशम स्कंधातील अध्याय ५२ ते ५४ मधील १४४ श्लोकांच्या व हरिवंशातील विष्णुपर्वाच्या अध्याय ५९-६० च्या आधारे एकनाथांनी त्याची रचनी केली. त्याची ओवीसंख्या १,७१२ आहे. श्रीकृष्ण-रुक्मिणीचा विवाह म्हणजे जिवाशिवांचे मीलन, अशा रूपकाभोवती हे संपूर्ण काव्य रचलेले आहे. भावार्थ रामायण ही त्यांची अखेरची रचना. वाल्मीकी रामायण, अध्यात्म रामायण, क्रौंच रामायण, आनंद रामायण, योगवासिष्ठ इ. ग्रंथांच्या आधारे ही रचना केलेली आहे. ‘बाल’, ‘अयोध्या’, ‘अरण्य’, ‘किष्किंधा’, ‘सुंदर’ ही पहिली पाच कांडे आणि सहाव्या युद्ध कांडाचे ४४ अध्याय लिहून झाल्यानंतर नाथांनी देह ठेविला. त्यापुढील भाग गावबा नावाच्या त्यांच्या शिष्याने पूर्ण केला, असे परंपरा सांगते. याशिवाय मुक्तेश्वर, कोनेरीसुतशेष व एक अनाम कवी यांनी ‘एका-जनार्दन’ या नावानेच ‘उत्तर’कांड लिहून भावार्थ रामायणाच्या पूर्तीचे प्रयत्न केले आहेत. भावार्थ रामायणाचे स्वरूप रामचरित्रावरील स्वतंत्र पौराणिक महाकाव्यासारखे आहे. एकनाथांच्या आवडत्या आध्यात्मिक रूपकांबरोबरच या काव्यात सामाजिक रूपकात्मताही आढळते. तत्कालीन यवनी सत्तेचा मराठी समाजावर झालेला अंतर्बाह्य अनिष्ट परिणाम त्यातून सूचित केला आहे.
अलिखित लोककाव्याचे पुनरुज्जीवन
या रचनांखेरीज बहुजनसमाजासाठी एकनाथांनी केलेली कथात्मक रचनाही वेधक आहे. सुबोध शैलीने लिहिलेल्या तुळशीमाहात्म्य व सीतामंदोदरीची एकात्मता या पुराणकथा, सांसारिकांच्या मनोवृत्तीचा आल्हादक व विनोदरम्य आविष्कार करणार्या हळदुली व कृष्णदान ह्या श्रीकृष्णकथा, कृपण माणसाचे हास्यजनक स्वभावचित्र रेखाटणारे कदर्यु-आख्यान, ध्रुव, प्रल्हाद, उपमन्यू आणि सुदामा यांच्या नाट्यपूर्ण लघुचरित्रकथा आणि ज्ञानेश्वरादी संतांच्या संक्षिप्त जीवनकथा ही अशा रचनेची उदाहरणे होत. एकनाथांनी गेय पदरचनाही केली आहे. ही पदे मुख्यतः श्रीकृष्ण-चरित्रपर आहेत. त्यांत सुंदर शब्दचित्रे, भावपूर्णता, कल्पकता, ध्रुव-पदांची वेधकता, मार्मिक तत्त्वसूचकता इ. वैशिष्ट्ये आढळतात. ‘वारियाने कुंडल हाले’, ‘असा कसा देवाचा देव बाई ठकडा’ इ. त्यांची पदे प्रसिद्ध आहेत. १२५ विषयांवर सुमारे तीनशे भारुडे त्यांनी रचली. पुरातन काळापासून मराठी बहुजन-वर्गाचे आपल्या मनोरंजक व नाट्यपूर्ण गीतरचनेने रंजन करणार्या गोंधळी, भराडी, वासुदेव, डोंबारी, बाळसंतोष वगैरे जमातींचा एक वर्ग होता. एकनाथांनी त्यांच्या अलिखित लोककाव्याचे पुनरुज्जीवन केले. त्यांच्या कवित्वाची व्यापकता व लौकिकता यावरून स्पष्ट होते. आदिमाया, विंचू, जागल्या, कुडबुड्या जोशी या विषयांवरील त्यांची भारुडे प्रसिद्ध आहेत. एकनाथांची बरीचशी रचना साडेचार चरणी ओवी छंदात आहे. त्यांनी स्फुट अभंगरचनाही केली आहे. गुरुभक्ती, पारमार्थिक अनुभव व सामाजिक स्थिती हे त्यांच्या अभंगांचे मुख्य विषय आहेत. त्यांत नामदेव-तुकारामांसारखा साधकदशेतील भावोत्कट अंतःकलह आढळतात नाही. रचनादृष्टीनेही एकनाथी अभंग सैल आहेत.
स्वराज्याच्या चळवळीला अनुकूल पार्श्वभूमी तयार झाली
तेराव्या शतकात ज्ञानेश्वर-नामदेवांनी बहुजनसुलभ भक्तिमार्गाची प्रतिष्ठापना केली. पुढील अडीच शतकांत यवनी सत्तेमुळे भक्तिमार्गाचा प्रभाव क्षीण झाला. एकनाथांनी त्या भागवत पंथाचे प्रभावी पुनरुज्जीवन केले. जनताजनार्दन हे एक नवे तत्त्व प्रतिपादून भागवत पंथाला त्यांनी अधिक लोकाभिमुख बनविले. या पंथाला श्रीकृष्णाप्रमाणेच श्रीराम हे दैवत नव्याने परिचित करून दिले. एकनाथांचा भागवतधर्म व रामराज्याची कल्पना म्हणजे मध्ययुगीन महाराष्ट्रातील प्रेरक विचारधन होय. मराठी भाषा, वाङ्मय, विचार आणि वर्तन या सर्व क्षेत्रांत त्यांनी समाजप्रबोधन व समाजसंघटन केले. त्यातूनच सतराव्या शतकातील स्वराज्याच्या चळवळीला अनुकूल पार्श्वभूमी तयार झाली, असे म्हणता येईल.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हे एकनाथांचे परम श्रद्धास्थान
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हे एकनाथांचे परम श्रद्धास्थान. एकनाथांनी ज्ञानेश्वरीचा अतिशय सखोल अभ्यास केलेला होता याचे प्रत्यंतर त्यांच्या लिखाणात जागोजागी पहायला मिळते. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी नाथांच्या स्वप्नात येऊन, आपल्या समाधीच्या ठिकाणी असलेल्या अजानवृक्षाची मुळी आपल्या गळ्याला लागत आहे ती काढावी, असे सांगितलं. हे कळताच गहिवरुन गेलेले एकनाथ आपल्या बरोबर काही जणांना घेऊन आळंदीकडे त्वरेने रवाना झाले. अथक प्रयत्नांनंतर एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरांच्या समाधीचे ठिकाण शोधून काढले. त्यानंतर एकनाथ महाराजांनी अत्यंत महत्त्वाचे केलेले कार्य म्हणजे ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण. त्याकाळी हस्तलिखित पोथ्या वापरत असल्याने एका पोथीवरून दुसरी प्रत लिहून काढताना होणाऱ्या चुका तर होत्याच, पण काही माणसे अशा प्रती तयार करताना हेतुपुरस्सर त्यात स्वत:च्याही मोडक्या तोडक्या ओव्याही घुसडत असत. पैठणला परत आल्यावर एकनाथांनी ज्ञानेश्वरीच्या अनेक हस्तलिखीत प्रती जमवल्या. त्यांचा अभ्यास आणि संशोधन केले आणि शेवटी नितांत श्रद्धेने, कष्टाने श्रीज्ञानेश्वरीची निर्दोष प्रत तयार केली.
समाधी घेण्यासाठी संत एकनाथांनी फाल्गुन वद्य षष्ठी तिथी का निवडली?
भगवतोत्तम, शांतीब्रह्म असलेल्या संत एकनाथांना दत्तात्रेयांनी आपल्या मूळ रूपात दर्शन दिले होते. संत एकनाथ महाराजांनी समाधी घेण्यासाठी फाल्गुन वद्य षष्ठी तिथी निवडणे हा योगायोगाचा किंवा अपघाताचा भाग नाही. तर विचारपूर्वक निवडलेला हा दिवस आहे, असे सांगितले जाते. संत एकनाथ महाराजांचे गुरू जनार्दन स्वामी यांचा जन्म फाल्गुन वद्य षष्ठीला झाला. जनार्दन स्वामींना आत्मसाक्षात्कार फाल्गुन वद्य षष्ठीला झाला. जनार्दन स्वामींनी संत एकनाथ महाराजांवर जो अनुग्रह केला, तो दिवसही फाल्गुन वद्य षष्ठीचा होता आणि जनार्दन स्वामी यांनी अवतार समाप्ती केली, ती फाल्गुन वद्य षष्ठीलाच केली. तोच दिवस संत एकनाथ महाराजांनी आपल्या समाधीसाठी निवडावा, हे लक्षणीय आणि अर्थपूर्ण आहे, असे सांगितले जाते. षष्ठीच्या आदल्या दिवशी नाथ कीर्तन करत मोठ्या जनसमुदायासह गोदावरी काठी येऊन दाखल झाले. वाटेत जागोजागी आरत्या झाल्या. नाथांचे कीर्तन म्हणजे लोकांचे देहभान हरपण्याची पर्वणीच. नेहमीप्रमाणेच ते शेवटचे कीर्तनही रंगले. भजनाचे फड पडले. नाथ हातात वीणा घेऊन नामस्मरण करू लागले. मध्यरात्र उलटून गेली. भजनाचे स्वरही मंद होत गेले. अशा सर्वजणांच्या अर्धनिद्रा अवस्थेत असण्याच्या काळात नाथांनी दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरी नदीत प्रवेश केला.