पंचक म्हणजे काय? डिसेंबरमध्ये ‘मृत्यू पंचक’; ५ दिवस अत्यंत अशुभ, चुकूनही ‘ही’ कामे करु नका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 14:19 IST2024-12-05T14:15:25+5:302024-12-05T14:19:51+5:30
Panchank In December 2024: मृत्यू पंचक म्हणजे काय? डिसेंबर महिन्यातील पंचक कालावधी कधी आहे? नेमके काय करू नये? जाणून घ्या...

पंचक म्हणजे काय? डिसेंबरमध्ये ‘मृत्यू पंचक’; ५ दिवस अत्यंत अशुभ, चुकूनही ‘ही’ कामे करु नका!
Panchank In December 2024: भारतीय परंपरा आणि संस्कृती यांमध्ये ज्योतिषशास्त्राला अनन्य साधारण महत्त्व असून, त्याचे महात्म्यही सांगितले गेले आहे. वैदिक ज्योतिषात ग्रह-नक्षत्रांचा अधिक विचार केला जातो. पंचांगाचे तिथी, वार, योग, ग्रह-नक्षत्र, मुहूर्त, करण मुख्य भाग असून, यामधील पंचक काल सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो. पुराणातील काही उल्लेखांनुसार, रामायण काळात श्रीरामांनी रावणाचा वध केला, तेव्हा पंचक लागले होते. पंचक म्हणजे काय? डिसेंबर महिन्यात कधी लागणार पंचक? मृत्यू पंचक म्हणजे काय? नेमकी कोणती कामे किंवा गोष्टी या काळात करू नये? जाणून घेऊया...
पंचक लागण्याची वेळ, मुहूर्त शास्त्रात अत्यंत महत्त्वपूर्ण मानला गेला आहे. पंचक कालावधीत शक्यतो शुभ कार्य केले जात नाही. पंचक कालावधी हा अमंगलाचे सूचक मानला गेला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, पंचक काळात कोणाचा मृत्यू झाला असेल, तर ते अशुभ मानले जाते. पंचक काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्यासह लगतच्या कालावधीत कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू होण्याची शक्यता असते, असा दावा शास्त्रात केल्याचे पाहायला मिळते. (What Do You Mean By Panchak In Marathi)
पंचक म्हणजे काय?
ज्योतिषशास्त्रानसार, पाच नक्षत्रांच्या विशिष्ट कालावधीला पंचक म्हटले जाते. चंद्राचे धनिष्ठा नक्षत्राचे तृतीय चरण आणि शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती या नक्षत्रांमधील भ्रमण कालावधीला पंचक मानले जाते. काही मान्यतांनुसार, या काळात केलेल्या अशुभ कार्यांचा पाचपट प्रभाव पडत असतो. खगोल विज्ञानाच्या दृष्टिकोनातून ३६० अंशाच्या भचक्रात पृथ्वीच्या ३०० डिग्री ते ३६० डिग्री मध्य भ्रमणाच्या कालावधीला पंचक मानले जाते. पंचक कालावधीत चंद्राचा पृथ्वीवर सर्वाधिक प्रभाव असल्याचे मानले जाते. (What Do You Mean By Mrityu Panchak In Marathi)
मृत्यू पंचक म्हणजे काय?
शनिवारी पंचक सुरू झाले तर त्याला मृत्यू पंचक असे म्हटले जाते. मृत्यू पंचक अतिशय कष्टदायी, प्रतिकूल मानले जाते. सन २०२४ चे शेवटचे पंचक शनिवार, ७ डिसेंबर २०२४ रोजी पहाटे ०५ वाजून ०७ मिनिटांनी सुरू होत आहे. तर १२ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजून ४७ मिनिटांनी पंचक समाप्त होणार आहे.
पंचक काळात नेमके काय करू नये?
- ज्योतिषशास्त्रानुसार, पंचक कालावधीत काही कार्ये करणे निषिद्ध मानले गेले आहे. पंचक कालावधीत लाकडाची खरेदी करू नये. घराच्या छताच्या दुरुस्तीचे किंवा नवीन बांधकाम करू नये. पंचक काळात दक्षिण दिशेकडे प्रवास करणे वर्जित मानले गेले आहे. कोणात्याही प्रकारच्या इंधनाचे भंडारण करू नये, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
- पंचक सर्व कार्यांसाठी अशुभ नसते, तर काही कार्यांसाठी पंचक अत्यंत शुभ मानले जाते. या कालावधीत यात्रा करणे, मुंडन कार्य, व्यापार आदी कार्यांसाठी पंचक शुभ मानले गेले आहे. तसेच साखरपुडा समारोह, विवाह आदी शुभ कार्ये पंचक कालावधीत केली जाऊ शकतात.
- पंचक कालावधीत जुळून येणाऱ्या शुभ योगांवर केलेल्या काही कार्यांचा सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतो. काहीवेळा धनलाभाचे योगही प्रबळ होऊ शकतात. याशिवाय वाहन खरेदी, गृह प्रवेश, शांती पूजन, मालमत्तेशी संबंधित स्थिर कार्ये करणे पंच कालावधीत शुभ मानली गेली आहेत.
- ज्योतिषानुसार, सप्ताहातील प्रत्येक दिवशी लागणाऱ्या पंचकाचा प्रभाव हा भिन्न असतो. पंचक कोणत्या दिवशी लागते, यावर त्याचा प्रभाव कसा आणि किती असेल हे अवलंबून असल्याचे सांगितले जाते. पंचकचा प्रारंभ रविवारी होतो, तेव्हा त्याला रोग पंचक म्हणतात.
- पंचक सोमवारी सुरू होते, तेव्हा त्याला राज पंचक म्हणतात. मंगळवारी लागणारे पंचक अग्नी पंचक नावाने संबोधले जाते. बुधवारी आणि गुरुवारी लागणाऱ्या पंचकाला दोषमुक्त पंचक म्हटले जाते. शुक्रवारी सुरू होणाऱ्या पंचकला चोर पंचक म्हटले जाते. शनिवारपासून लागणाऱ्या पंचकाला मृत्यू पंचक म्हटले जाते.
- पंचक काळात मृत्यू होणे शुभ मानले जात नाही. पंचक कालावधीत मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या जीवितहानीची शक्यता असते. पंचक दोष लागू नये, यासाठी काही उपाय शास्त्रात सांगितले गेले आहेत.
- पंचक कालावधीत कोणाचा मृत्यू झाला, तर ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्याचे अंतिम संस्कार करताना दर्भाचे एक प्रतीक तयार करून त्याचा दाहसंस्कार मृतकासोबत करण्याचे विधान आहे, असे सांगितले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.