पंतप्रधानांनादेखील तुकोबा रायांच्या अभंगांची भुरळ पडावी, असं नेमकं काय आहे वैशिष्ट्य? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 03:16 PM2022-06-15T15:16:56+5:302022-06-15T15:17:05+5:30

तुकोबारायांचे अभंग इतके गोड आणि प्रासादिक आहेत की ऐकता क्षणी मनात रुंजी घालतात. बहुदा तसेच पंतप्रधानांच्या बाबतीत घडले असावे!

What exactly is the feature that even the Prime Minister should be fascinated by Tukoba Rai's abhangas? Read on! | पंतप्रधानांनादेखील तुकोबा रायांच्या अभंगांची भुरळ पडावी, असं नेमकं काय आहे वैशिष्ट्य? वाचा!

पंतप्रधानांनादेखील तुकोबा रायांच्या अभंगांची भुरळ पडावी, असं नेमकं काय आहे वैशिष्ट्य? वाचा!

googlenewsNext

१४ जून रोजी श्री क्षेत्र देहू गाव येथील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला. या लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी उपस्थित वारकरी संप्रदायास संबोधित केले.संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई यांसह संतवाणी आणि अभंगांची ओवी मोदींनी गायली. भारत हा संतांची भूमी असलेला देश आहे, संतांची शिकवणच आपल्या देशाला पुढे घेऊन जात आहे. जे कधीच भंग होत नाही, काळानुसार ते चालतच राहतात, आपले विचार देत राहतात. काळानुसार त्यांच्याकडून आपणास प्रेरणा मिळते ते अभंग असतात, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत ही संतांची भूमी असल्याचे सांगितले.

आषाढी निमित्त पंढरपुराकडे सगळ्याच वारकऱ्यांचे डोळे लागले आहेत. तिथली पुण्यभूमी पंढरपूर हीचा आठव होताच जगद्गुरु तुकोबाराय यांचा 'सुंदर ते ध्यान' हा अभंग मुखी येतोच. काय प्रासादिक ओळी आहेत बघा. त्या गुणगुणताना विठुरायाचे सगुण रूप डोळ्यासमोर आपोआप उभे राहते. हे सामर्थ्य आहे तुकोबांच्या वाणीचे! ते लिहितात.... 

सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया।
तुलसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर,तेचि रूप।।
मकर कुंडले, तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणि विराजीत।।
तुका म्हणे माझे, हेचि सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने।।

या शब्दांबरोबर लता दीदींचा दैवी आवाज कानात घुमला नसेल तरच नवल. त्याला सुंदर संगीत साज चढवला आहे, संगीतकार श्रीनिवास खळे यांनी. हा अभंग ऐकत असताना मन थेट विठुरायाच्या पायाशी पाहोचते आणि सुंदर रूप पाहताना आपलीही समाधिस्थ अवस्था होते. 

तुकाराम महाराज तर विठ्ठल भक्त. त्यांनी स्वत: निर्गुण भक्ती केली. परंतु, समाजाला भगवंत दाखवायचा, तर तो सगुण रूपात असायला हवा, म्हणून त्यांच्या भावावस्थेत दिसणारा पांडुरंग त्यांनी सदर अभंगातून रेखाटला आहे. 

विठुरायाच्या सान्निध्यात असणारे तुकोबा, या अभंगात वर्णन करताना सुंदर `ते' ध्यान म्हणत आहेत. `ते' ऐवजी `हे' हा शब्द त्यांना वापरता आला असता, परंतु त्यांनी सुंदर ते ध्यान असे म्हटले, या मागचा तर्क सांगताना ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर सांगतात, `पंढरीला भक्तांसाठी, घेऊनि कर कटी, भीमा निकटी' उभे राहिलेले हे सावळे परब्रह्म सगुण आहे. त्याचे ध्यान करताच ते आपल्यासमोर येते. या ध्यानाचा त्या ध्यानाशी असलेला संबंध दाखवताना तुकाराम महाराजांनी `हे' ऐवजी `ते' हा शब्द वापरला असावा.' 

म्हणूनच कदाचित आपणदेखील भगवंताच्या दर्शनाला गेलो असता, डोळे मिटून घेतो. किती हा विरोधाभास? ज्या दर्शनासाठी तासन् तास रांगेत आपण ताटकळत उभे असतो, तो दर्शनाचा क्षण आला, `देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी' अशी अवस्था असताना मात्र आपण डोळे मिटून घेतो. कारण, आपल्या हृदयस्थ परमेश्वराची प्रतिमा आणि गाभाऱ्यात उभा असलेला विठोबा या दोन्ही प्रतिमा एकच आहेत ना, याची खात्री करून घेत असतो. ही तुलना, म्हणजेच तुकाराम महाराजांच्या लेखी `सुंदर ते ध्यान' आणि `सुंदर हे ध्यान' यातला फरक असेल.

संतरचना समजून घेणे अवघड. वरवर सोपे वाटणारे शब्द बरेच काही गूढ सांगून जातात. जसे की, वर केलेली शाब्दिक उकल. बाकी, उर्वरित अभंगात महाराजांनी त्यांना दिसलेला पांडुरंग कसा आहे, त्याचे वर्णन केले आहे. 

कटेवर हात ठेवून विटेवर उभा असलेला पांडुरंग, त्याच्या गळ्यात तुळशी माळ आणि कमरेभोवती पितांबर नेसले आहे. असे सोज्वळ, सात्विक रूप भक्तांना नेहमीच आवडते. त्याच्या कानात मत्स्य आकाराची कुंडले आहेत, गळ्यात कौस्तुभ रत्न आहे. हे रूप सावळे असले, तरी हा सगळा श्रुंगार त्याला शोभून दिसत आहे. अशा रूपात विठ्ठलभक्त कायम रमू शकतो....!

विठुरायाचे रूप पाहून तुकाराम महाराजांची जी अवस्था होते, तशीच आपलीही अवस्था ही अभंगवाणी ऐकून होते. त्यामुळे हे गोड अभंग आपसुख तोंडपाठ होतात. तसेच बहुतेक पंतप्रधानांच्या बाबतीत काल घडले असावे!

Web Title: What exactly is the feature that even the Prime Minister should be fascinated by Tukoba Rai's abhangas? Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.