मृत्यूला कवटाळावेसे वाटत असेल तेव्हा सद्गुरुंचे 'हे' विचार तुमचे मन नक्की परावृत्त करतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 01:08 PM2022-02-15T13:08:36+5:302022-02-15T13:08:58+5:30

मृत्यू हा संकटातून सुटण्याचा मार्ग नाही. खरी मजा संकटांना तोंड देण्यात आहे. मृत्यूतून तुमची सुटका होईलही, परंतु तुमच्या पश्चात तुमच्या चारित्र्यावर शंका उपस्थित केली जाईल!

When you feel the urge to embrace death, Sadguru's 'these' thoughts will surely dissuade your mind! | मृत्यूला कवटाळावेसे वाटत असेल तेव्हा सद्गुरुंचे 'हे' विचार तुमचे मन नक्की परावृत्त करतील!

मृत्यूला कवटाळावेसे वाटत असेल तेव्हा सद्गुरुंचे 'हे' विचार तुमचे मन नक्की परावृत्त करतील!

Next

जेव्हा व्यक्ती अपयशाने खचते, तेव्हा ती आतून पूर्णपणे कोलमडून गेलेली असते का? स्वत:ला सावरणे नाहीतर कोलमडू देणे, हे सर्वस्वी आपल्या हाती असते. कोणीही बाहेरील व्यक्ती आपल्याला तोडू शकत नाही. यासाठी आपले विचार, मन, प्रयत्न यांचा पाया भक्कम असायला हवा. हातून निसटून गेलेल्या संधीचा फार विचार करू नका. या गोष्टी चांगल्यासाठीच घडल्या, याची प्रचिती कदाचित भविष्यात येईल. म्हणून परिस्थिती कशीही असो, तुम्ही खंबीर व्हा. वेळ सारखी नसते, ती बदलत राहते. कठीणात कठीण प्रसंगातून बाहेर काढण्याची ताकद बदलत्या वेळेत असते. तोवर आपल्याला संयम ठेवता यायला हवा.

उद्विग्न मनस्थिती असलेल्या व्यक्तीच्या मनात प्रचंड संताप असतो. हा राग  दोन प्रकारे उफाळू शकतो. एक राग स्वत:सकट इतरांचा सर्वनाश करतो आणि दुसरा राग ऊर्जेचे रूप धारण करून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सगळे प्रयत्न पणाला लावतो. आपल्याला दुसऱ्या प्रकारे रागाचे नियोजन करायचे आहे.  त्यासाठी रागाच्या भरात अपशब्द निघणार नाहीत ना, याची काळजी घ्या. कारण, वेळ बदलते, माणसे बदलतात पण शब्द राहून जातात. 

रागाच्या भरात कितीही टोकाचे विचार आले, तरी ते विचार कागदावर उतरवून काढा. आज ना उद्या परिस्थिती बदलणार आहे. असेही त्या कागदावर लिहा. त्या संकटकाळात बाकी कोणीही सोबत नसले, तरी तुम्हाला स्वत:ची साथ भक्कम आहे, असा आत्मविश्वास वाटायला हवा. जोवर तुम्ही स्वत: हार मानत नाही, तोवर कोणीही तुम्हाला हरवू शकत नाही. 

मृत्यू हा संकटातून सुटण्याचा मार्ग नाही. खरी मजा संकटांना तोंड देण्यात आहे. मृत्यूतून तुमची सुटका होईलही, परंतु तुमच्या पश्चात तुमच्या चारित्र्यावर शंका उपस्थित केली जाईल आणि त्याचे स्पष्टीकरण द्यायला तुम्ही अस्तित्त्वात नसाल आणि विनाकारण घरच्यांना तो त्रास सहन करावा लागेल. हा आत्मक्लेश तुमच्याबरोबर अनेकांना मरणयातना देणारा ठरेल. त्यापेक्षा काही काळ थांबा. टोकाचे विचार आले, तरी येऊद्या. विचार येतील आणि जातील. तुम्हाला वैचारिक वादळात अढळपणे उभे राहायचे आहे, हे लक्षात ठेवा. तुमची अपयशगाथा उद्याची यशोगाथा होणार आहे. तुम्ही दिलेला लढा दुसऱ्या कोणासाठी भविष्यात प्रेरणादायी ठरेल. 

म्हणून खचून जाऊ नका. कितीही राग आला, संकट आले तरी डगमगू नका. प्रतिक्रिया देऊ नका. ते वादळ निघून गेले, की मग पुनश्च हरी ओम म्हणत नव्याने सुरुवात करा. एका अपयशाने आयुष्य कधीच संपत नाही. दुसरी संधी आपली वाट पाहत असते. ती संधी ओळखा आणि आत्मविश्वासाने कामाला लागा. 

Web Title: When you feel the urge to embrace death, Sadguru's 'these' thoughts will surely dissuade your mind!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.