तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा, पोहोचणार विठ्ठलचरणीच, असे तुकोबा का म्हणतात? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 10:35 AM2023-01-04T10:35:48+5:302023-01-04T10:36:07+5:30

अखिल विश्वात व्यापून राहिलेली ईश्वरशक्ती एक आहे. कोणी ईश्वर म्हणतं कोणी अल्ला, मात्र ते परमतत्व एकच आहे, हे तुकोबा सोदाहरण पटवून देतात. 

Why does Tukoba say that whatever god you worship, you will reach lord Vitthal ? Read on! | तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा, पोहोचणार विठ्ठलचरणीच, असे तुकोबा का म्हणतात? वाचा!

तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा, पोहोचणार विठ्ठलचरणीच, असे तुकोबा का म्हणतात? वाचा!

googlenewsNext

विठ्ठल भक्ती करणारे तुकोबा गणरायाची स्तुती करताना 'ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान' हा अभंग लिहितात, तेव्हा एक श्रोता येऊन महाराजांना विचारतो, गणपती बाप्पा तिन्ही देवांचे जन्मस्थान असेल तर तुम्ही विठ्ठलाची भक्ती का करता? यावर तुकोबा हसले आणि म्हणाले, तुम्ही त्या ईश्वरी शक्तीला ज्या स्वरूपात पाहता त्या स्वरूपात तो तुम्हाला दिसतो. तो सगुण निर्गुण आहे. तो एक आहे तरी आपण त्याची अनंत रूपे पाहतो. हे सविस्तरपणे पटवून देताना महाराज पुढे सांगतात... 

ब्रह्म शब्दाचा उच्चार केला की शेवटी अकार उरतो, विष्णू उच्चारातून उकार उरतो आणि मकारातून महेशाचा उगम होतो, असे त्रिदेव ओंकारस्वरूपात सामावले आहेत, आणि तेच स्वरूप पांडुरंगात, गणपतीतच नव्हे, तर आपल्या प्रत्येक उपास्य देवात सामावले आहे. 

याचाच अर्थ, ईश्वरशक्ती एकच आहे, फक्त आपण तिला वेगवेगळ्या स्वरूपात पाहतो. म्हणून मूलाधार शक्तीत भेदाभेद होत नाहीत. जसे की, अष्टविनायकाची स्वरूपे वेगवेगळी, परंतु मूळ तत्त्व एक. विष्णूंचे अवतार वेगवेगवळे, परंतु शक्ती एक, तसेच भगवंताची रूपे वेगवेगळी, परंतु ईश्वर एक. म्हणून तर साईबाबा म्हणतात, 'सबका मालिक एक है।' जी बाब हिंदू देव देवतांची तीच बाब अन्य धर्मातील देवदेवतांची! आपण त्याला वेगळे समजतो, पण तो एकच आहे आणि आपल्यासकट सर्व चराचर व्यापून आहे. 

द्वैत असेल, तर ते आपल्या मनात आहे. म्हणून आजच्या संकष्टीला अनेकांना प्रश्न पडेलही, आज गणेशभक्ती करावी, की विष्णूभक्ती? एकाची पूजा केली, म्हणून दुसऱ्याला वाईट नाही ना वाटणार? आपण भक्तीत कमी तर नाही ना पडणार? देवाची कृपादृष्टी कमी तर नाही ना होणार? मनातील ही द्विधा मनस्थिती दूर व्हावी, म्हणून एक कथा.

गणपती आणि विष्णू एक:

एकदा पार्वतीमातेकडे विश्वदेव नावाचे अतिथी आले होते. पार्वतीमातेने त्यांचा आदर, सत्कार केला. स्वयंपाक केला. बसायला पाट आणि ताट ठेवायला चौरंग दिला. चौरंगाभोवती सुबक रांगोळी काढली. चांदीचा तांब्या, पेला दिला. ताटात चारीठाव पक्क्वान्नयुक्त भोजन वाढले. सुगंधी धूप लावून अतिथींनी विनम्रतेने जेवायला बसण्याची विनंती केली. विश्वदेव शुचिर्भूत होऊन पाटावर जेवायला बसले. ताटाचा नैवेद्य दाखवून त्यांनी आपोष्णी घेतली. खुद्द अन्नपूर्णेने केलेले भोजन ग्रहण करणार, तोच त्यांना आठवण झाली, की नित्यनेमाने आपण जेवणाआधी भगवान महाविष्णूंचे दर्शन घेतो, त्यांचे चरणतीर्थ प्राशन करतो, मग जेवतो. हे लक्षात येताच, विश्वदेवांनी सुग्रास तोंडाशी नेता नेता परत ताटात ठेवला. पार्वती मातेने नम्रपणे `काय झाले' असे विचारले. विश्वदेवांनी मनोदय सांगितला. त्यावेळी, तिथे उपस्थित असलेल्या बालगणेशांनी, विश्वदेवांच्या जेवणात व्यत्यय येऊ नये, म्हणून भगवान महाविष्णूंचे रूप धारण केले आणि विश्वदेवाला दर्शन दिले. विश्वदेव धन्य झाले आणि विष्णूंचे दर्शन झाल्यावर शांततेत जेवले. या कृतीतून बाप्पाने विश्वदेवांना दाखवून दिले. सकल चराचरातील ईश्वर स्वरूप वेगवेगळे असले, तरी ईश्वरी शक्ती एकच आहे. म्हणून तुकाराम महाराजही आपल्या एका अभंगात म्हणतात,

तुका म्हणे पाही, विठ्ठल गणपती दूजा नाही।

चला तर मग, आपणही मनातले द्वैत बाजूला ठेवून अधिक मासाच्या पूजेत, बाप्पाचीही मनोभावे पूजा करून त्या अद्वैत शक्तीचा आशीर्वाद घेऊया.
मंगलमूर्ती मोरया। ओम नमो भगवते वासुदेवाय.

Web Title: Why does Tukoba say that whatever god you worship, you will reach lord Vitthal ? Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.