'काय भुललासी वरलिया रंगा?' असे म्हणत संत चोखामेळा यांनी दूरदृष्टीने सावध केले आहे, ते म्हणतात... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2023 09:50 AM2023-05-10T09:50:53+5:302023-05-10T09:53:37+5:30

वैशाख कृष्ण पंचमी ही संत चोखामेळा यांची पुण्यतिथी; या निमित्ताने त्यांच्या लोकप्रिय अभंगावरून सद्यस्थितीचे अवलोकन करूया. 

'Why people attracted to the fake world?' Asking this, Saint Chokhamela has warned with foresight, he says... | 'काय भुललासी वरलिया रंगा?' असे म्हणत संत चोखामेळा यांनी दूरदृष्टीने सावध केले आहे, ते म्हणतात... 

'काय भुललासी वरलिया रंगा?' असे म्हणत संत चोखामेळा यांनी दूरदृष्टीने सावध केले आहे, ते म्हणतात... 

googlenewsNext

सध्या 'द केरला स्टोरी' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचा धार्मिक विषय बाजूला ठेवून फक्त क्षणिक मोह या विषयाचा विचार केला, तरी होणाऱ्या अधोगतीचे चित्रण त्यात केलेले दिसते. आपण बनावट दुनियेच्या आहारी गेलो तर किती मोठ्या जाळ्यात अडकू शकतो, याचे उदाहरण म्हणूनही या चित्रपटाकडे पाहता येईल. अशा वेळेस संत चोखामेळा यांच्या अभंगाच्या ओळी सहज आठवतात, 'ऊस डोंगापरी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा?'

चोखामेळा हे ज्ञानदेवकालीन संत मूळचे मंगळवेढ्याचे. पण त्यांचे वास्तव्य बराच काळ पंढरपूरला होते. संत नामदेवांनी त्यांना मंत्रोपदेश दिला होता. त्यांच्या घरची सगळी मंडळी विठ्ठलभक्तीत एकरूप झाली होती. त्यांची पत्नी सोयराबाई, बहीण निर्मळा, मुलगा कर्ममेळा, मेहुणा बंका व स्वत: चोखामेळा या सर्वांची अभंगरचना उपलब्ध आहे. मंगळवेढ्यास गावकूस बांधण्यासाठी अधिकाऱ्यांनी बहुजनांना वेठीला धरले. बांधकाम चालू असताना कूस कोसळले. इतर बांधवांबरोबर चोखोबांचेही निर्वाण झाले. त्यांच्या अस्थी तिथुन आणून नामदेवांनी पंढरीस महाद्वारासमोर चोखोबांची समाधी बांधली. आज त्यांची पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांनी तळमळीने विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर शोधूया... 

ऊस डोंगा परी, रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा।
कमान डोंगी परी, तीर नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा।
नदी डोंगी परी, जल नोहे डोंगे, काय भुललासी वरलिया रंगा।
चोखा डोंगा परी, भाव नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा।

ऊस वेडावाकडा वाढला असेल. त्याची सगळी कांडं सरळ, एका रेषेत नसतीलही, पण त्याचा रस मात्र त्याच्यासारखाच डोंगा म्हणजे वाकडा नसतो. उसाचा रस गोडच असतो. त्यामुळे उसाच्या बाहेरील रंगाला किंवा आकाराला महत्त्व नाही. धनुष्याची कमान वाकडी असली, तरी त्याला लावलेला बाण वाकडा नसतो. तो अगदी सरळ असतो. मग कमानीला नाव ठेवून काय उपयोग? नदीला वळण नसते. तिचा प्रवाह वाकड्या रेषेत जात असतो. परंतु, नदीचे पाणी स्वच्छ व मधुर असते. नदीचे वळण आणि पाण्याची गोडी यांचा परस्परसंबंध नसतो. चोखोबांना तुम्ही एक वेळ कमी समजालही, परंतु त्यांची भक्ती श्रेष्ठ आहे. तो भाव अस्सल आहे. 

गावगाड्यात आणि शहरात आजही स्पृश्याअस्पृश्यता पाळली जाते. गावकुसाबाहेर बहुजनांची वस्ती असते. चोखामेळा त्या समाजाचे शल्य मांडतात. त्यांच्या नावातील योगायोग पहा- चोख म्हणजे स्वच्छ, शुद्ध, पवित्र आणि मेळा म्हणजे मलीन. या दोन्ही गोष्टी एका नावातच नाही, तर एका देहातही एकवटल्या आहेत. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, या शब्दातील वेदना, आर्त भाव आणि सच्ची ईश्वरभक्ती प्रगट होते. चोख-निर्मळ असूनही जातीव्यवस्थेत भरडल्या गेलेल्या संत चोखामेळ्यांचे आयुष्य लौकीकार्थाने उपेक्षित राहीले, परंतु पारमार्थिक अर्थाने, त्यांनी भगवंताला केव्हाच आपलेसे करून घेतले. भक्तीनिष्ठेच्या बळावर चोखोबांनी जशी आयुष्याची उंची वाढवत नेली, तशी आपणही आपल्या कर्तृत्त्वाच्या बळावर स्वत:चे नाव, ओळख कमावू शकतो. त्यासाठी फक्त स्वत:चा आत्मविश्वास ठाम असायला हवा.

त्यासाठी धर्मान्तर हा पर्याय नाही. संत चोखामेळा यांनीदेखील आपल्या ज्ञातीत राहून आपल्या कर्माने आणि परमार्थाने संतपद मिळवले. याउलट केरला स्टोरीमध्ये नायिका नेमकी फसव्या प्रलोभनांना भुलते. आपला धर्म, आपली दैवतं गौण मानून परधर्माचा स्वीकार करते. आकर्षणाला प्रेम समजते आणि स्वतःच्या आयुष्याची हेळसांड करून घेते. संत चोखामेळा म्हणतात, आकर्षणांना भुलू नका. चमकणारी प्रत्येक वस्तू हिरा नसते. तुम्ही रत्नपारखी व्हा, सावध व्हा, क्षणिक मोहाला बळी न पडता, सारासार विचार करा, आपल्या आई वडिलांशी मोकळेपणाने बोला, त्यांच्या अनुभवाचा आधार घ्या, स्वधर्म, संस्कृती समजून घ्या, अनुसरण करा. या गोष्टी केल्या तरच तुम्ही या फसव्या जगात न अडकता हा भवसागर पार करून जाऊ शकाल. 

Web Title: 'Why people attracted to the fake world?' Asking this, Saint Chokhamela has warned with foresight, he says...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.