गोसीखुर्द प्रकल्पाचे ९ दरवाजे अर्धा मीटरने उघडले; ६६१.२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2022 14:02 IST2022-07-08T13:53:46+5:302022-07-08T14:02:18+5:30
प्रकल्पातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे.

गोसीखुर्द प्रकल्पाचे ९ दरवाजे अर्धा मीटरने उघडले; ६६१.२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग
पवनी (भंडारा) : गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे प्रकल्पाची पाणी पातळी वाढत आहे. पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गुरुवारी दुपारपासून प्रकल्पाचे नऊ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत.
गोसीखुर्द प्रकल्पाची सद्य:स्थितीत पाणी पातळी २४२.८०० मीटर आहे. पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. उजवा व डावा कालवा यामधून पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आलेला आहे. त्यामुळे गुरुवारी प्रकल्पाचे नऊ दरवाजे अर्धा मीटरने उघडून ६६१.२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात केला जात आहे.
प्रकल्पातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.