समाजाच्या उद्धारासाठी एकत्र या
By admin | Published: August 25, 2016 12:33 AM2016-08-25T00:33:26+5:302016-08-25T00:33:26+5:30
ज्या कुटुंबामध्ये चार ते पाच व्यक्ती शासकीय सेवेत आहेत, त्यांच्या कुटुंबातील शासकीय सेवेतील व्यक्ती कमी करून ज्यांच्या कुटुंबात काही व्यक्ती शासकीय सेवेत नाही, ...
मातंग समाजाचा मेळावा : चंद्रकात वानखेडे यांचे आवाहन
भंडारा : ज्या कुटुंबामध्ये चार ते पाच व्यक्ती शासकीय सेवेत आहेत, त्यांच्या कुटुंबातील शासकीय सेवेतील व्यक्ती कमी करून ज्यांच्या कुटुंबात काही व्यक्ती शासकीय सेवेत नाही, त्यांना शासकीय सेवेत सामावून घेतल्यास त्या कुटुंबाचा उद्धार होईल. त्यांच्या येणाऱ्या पिढीचा शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक दर्जा वाढेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यीक चंद्रकांत वानखेडे यांनी केले.
विदर्भ लहुजी सेना शाखा भंडाराच्या येथील संत तुकाराम सभागृहात मातंग समाजाचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते.
उद्घाटन खासदार नाना पटोले यांनी केले. अध्यक्षस्थानी आमदार रामचंद्र अवसरे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार हरिष मोरे, विदर्भ लहुजी सेनेचे विदर्भ अध्यक्ष मेजर खंडारे, भाजपा शहर अध्यक्ष चंद्रशेखर रोकडे, प्रसिद्ध उद्योजक सुनील मेंढे, नगरसेवक सुर्यकांत इलमे, भाजपा अनु. जाती जमाती कोर कमिटीचे अध्यक्ष लहानुजी इंगळे, विदर्भ लहुजी सेना भंडाराचे अध्यक्ष रमेश गायकवाड, उपाध्यक्ष विठ्ठल हिवराळे, सचिव किशोर तेलंगे, उपकोषाध्यक्ष प्रकाश बावने, सल्लागार प्रदीप बावने आदी उपस्थित होते.
खासदार नाना पटोले यांनी मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त शिक्षण घेऊन मोठे व्हावे, असे आवाहन केले. लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांनी समाजाला उद्देशून म्हणाले की, मातंग समाज हा पुर्वीपासून पराक्र मी व हुशार होता. परंतु, स्वत:ची प्रगती करू शकला नाही. त्यामुळे शिक्षणाशिवाय आपला व समाजाचा उद्धार होऊ शकत नाही. म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगिकारा. आतापर्यत समाजबांधवांनी समाजासाठी चांगले प्रयत्न केले आहेत. हे सहकार्य भविष्यातही मिळावे, असे आवाहन केले. खा. पटोले व आ. अवसरे यांनी मातंग समाजाकरीता जास्तीत जास्त सवलती उपलब्ध करून शासकीय सेवेत समाविष्ठ करण्याकरीता सहकार्य करण्याचे तसेच लहुजी साळवे यांचा पुतळा, समाजाकरीता समाज मंदिर शासकीय जागेत मंजूर करून देण्याची विनंती केली. यावेळी आ. रामचंद्र अवसरे, हरिष मोरे, मेजर खंडारे, चंद्रशेखर रोकडे, सुर्यकांत इलमे, सुनील मेंढे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. यावेळी खा. नाना पटोले यांनी लहुजी साळवे यांचा पुतळा, समाजाकरीता समाज मंदिर बांधून देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्र मादरम्यान, खा. पटोले यांच्या हस्ते मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन दाढी यांनी केले. प्रास्तविक प्रकाश बावने यांनी तर आभार प्रदर्शन विठ्ठलराव हिवराळे यांनी केले.
यावेळी विदर्भ लहुजी सेनेचे अनिता हिरवाळे, मिरा खडसे, चित्रा तेलंगे, कल्पना गायकवाड, मंगल बावने, लहूजी जाधव व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)