कायद्याची साक्षरता वाढविणे गरजेचे
By Admin | Published: February 7, 2016 01:21 AM2016-02-07T01:21:12+5:302016-02-07T01:21:12+5:30
अधिकार आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपल्या अधिकाराची मागणी करताना दुसऱ्याच्या अधिकारावर बाधा उत्पन्न होणार नाही याची दक्षता घ्यावयाची जबाबदारी...
विधी साक्षरता शिबिर : मंजुषा अलोणे यांचे प्रतिपादन
वरठी : अधिकार आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपल्या अधिकाराची मागणी करताना दुसऱ्याच्या अधिकारावर बाधा उत्पन्न होणार नाही याची दक्षता घ्यावयाची जबाबदारी हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येकांना हक्काची जाणीव करून देणे आणि कर्तव्याची अंमलबजावणी करण्याकरिता कायद्याची साक्षरता वाढवणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने शालेय शिक्षणाप्रमाणे कायदेविषयक शिक्षण घेणे आजची गरज आहे, असे प्रतिपादन तिसरे सहदिवाणी न्यायधीश (कनिष्ठस्तर) मंजुषा अलोणे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि ग्रामपंचायत कार्यालय वरठी यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता शिबिर घेण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. अध्यक्ष म्हणून न्यायाधीश मंजुषा अलोणे व प्रमुख वक्ते म्हणून अधिवक्ता विशाखा बांते, रेखा शहारे व अधिवक्ता फुले आणि प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच संजय मिरासे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र बोरकर, संगीता सुखानी, सुनीता बोंदरे, पंचायत समिती सदस्य पुष्पा भुरे, जेष्ठ नागरिक संघटनेचे सचिव देवीदास डोंगरे उपस्थित होते.
यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक अॅड. विशाखा बांते यांनी बालकांचे अधिकार व माहितीचा अधिकार २००५ व अॅड. रेखा शहारे यांनी जादुटोणाविरोधी कायदा आणि न्यायाधीश मंजुषा अलोणे यांनी मार्गदर्शन केले. सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ग्राम पंचायतच्या वतीने सरपंच संजय मिरासे यांनी केले.
संचालन व प्रास्ताविक प्रा. अश्ववीर गजभिये व आभार प्राचार्य तथागत मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघटनेचे उपाध्यक्ष हरी भाजीपाले, रमेश रामटेके, माहिती अधिकार कार्यकर्ता शरदचंद्र वासनिक, राधाकृष्ण डहाके, रूपलता फुले, कैलास बन्सोड, ग्राम पंचायत कर्मचारी जितेंद्र हरडे, अरविंद वासनिक, कैलास नारनवरे, संदीप वासनिक, नवप्रभात कन्या हायस्कूल व नवप्रभात हायस्कूलचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. विधी शिबिराला वरठीवासीयांनी लाभ घेतला. (वार्ताहर)