Lok Sabha Election 2019; असा आहे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 11:55 AM2019-03-26T11:55:58+5:302019-03-26T11:56:21+5:30

ईव्हीएम अर्थात ईलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनविषयी मतदार नेहमी चर्चा करतात. या यंत्राविषयी खास आकर्षणही असते.

Lok Sabha Election 2019; This is the history of EVM and VVPAT | Lok Sabha Election 2019; असा आहे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा इतिहास

Lok Sabha Election 2019; असा आहे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा इतिहास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ईव्हीएम अर्थात ईलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनविषयी मतदार नेहमी चर्चा करतात. या यंत्राविषयी खास आकर्षणही असते. निवडणुकीत पारदर्शकतेसाठी या यंत्राची भूमीका महत्वाची आहे. लोकसभा निवडणूक २०१९ पासून सर्व मतदारसंघात ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट यंत्रदेखील उपयोगात आणण्यात येणार आहे. ईव्हीएम ते व्हीव्हीपॅट या प्रवासाचा घेतलेला हा थोडक्यात इतिहास.
पूर्वी मतपत्रिकेच्या सहाय्याने मतदान होत असे. मतमोजणीसाठी लागणारा वेळ आणि पारदर्शकतेचे प्रश्न यामुळे बऱ्याचदा अडचणीची परिस्थिती निर्माण होत असे. या प्रक्रीयेत सुलभता आणि पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम १९७७ मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त एस.एल.शेकदार यांनी ईलेक्ट्रॉनिक यंत्राची कल्पना मांडली. १९७९ मध्ये सर्वप्रथम प्रोटो-टाईम ईव्हीएम तयार करण्यात आले. १९८०-८१ मध्ये ईलेक्ट्रॉनिक कॉपोर्रेशन आॅफ इंडिया आणि भारत ईलेक्टॉनिक्स लिमिटेड या संस्थांनी हे यंत्र तयार करून त्याचे सादरीकरण केले. भारत निवडणूक आयोगाने ६ आॅगस्ट १९८० मध्ये राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर या यंत्राचे सादरीकरण केले.
जानेवारी १९८१ मध्ये बेलने निवडणूक आयोगासमोर ही यंत्रे बनविण्याचा प्रस्ताव ठेवला. २९ जुलै १९८१ मध्ये निवडणूक आयोगाने बेल, ईसीआयएल, विधी व न्याय मंत्रालय आणि काही राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ईव्हीएमच्या वापराबाबत चर्चा केली. त्यानंतर प्रायोगिक तत्वावर
ही यंत्रे वापरण्याचा निर्णय आयोगाने घेतला. १९ मे १९८२ मध्ये केरळ राज्यातील परुर विधानसभा क्षेत्रात ५० मतदान केंद्रावर ईव्हीएमचा प्रथम वापर करण्यात आला. १९८२-८३ मध्ये ८ राज्य आणि एक केंद्रशासीत प्रदेशातील ११ विधानसभा मतदारसंघात ईव्हीएमद्वारे मतदान घेण्यात आले. 
१९८४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लोकप्रतिनिधीत्व कायद्यात सुधारणा करेपर्यंत ईव्हीएम वापरण्यास मनाई करण्याचा निर्णय दिल्याने या यंत्राचा वापर स्थगित करण्यात आला. १९८८ मध्ये कायद्यात दुरुस्ती झाल्यानंतर १५ मार्च १९८९ पासून ईव्हीएमचा वापर सुरू करण्यात आला. जानवोरी १९९९ मध्ये नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने एप्रिल महिन्यात सादर केलेल्या अहवालात एकमताने ईव्हीएम वापरण्याची शिफारस केली. सन २००० नंतर झालेल्या तीन लोकसभा आणि ११८ विधानसभा निवडणूकीत ईव्हीएमद्वारे मतदान घेण्यात आले. आतापर्यंत २५० कोटी मतदारांनी समाधानकारकरित्या ईव्हीएमद्वारे मतदान केले आहे. २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मतपत्रिकेच्या आधारे मतदान घेण्याबाबतची याचिका खारीज केल्याने यावर्षीच्या लोकसभा निवडणुकामधील मतदानदेखील ईव्हीएमद्वारे होत आहेत. दरम्यान १४ आॅगस्ट २०१३ रोजी ‘द कन्डक्ट आॅफ रुल’ १९६१ मध्ये सुधारणा करून व्हीव्हीपॅट यंत्र वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. ४ सप्टेंबर २०१३ रोजी नागालँडमधील ५१ -नोकसेन विधानसभा मतदारसंघात सर्वप्रथम व्हीव्हीपॅट यंत्राचा उपयोग करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने ८ आॅक्टोबर २०१३ ला दिलेल्या निर्णयानुसार टप्प्याटप्प्याने व्हीव्हीपॅटचा वापर वाढविण्यात आला. मे २०१७ पासून सर्व निवडणुकांमध्ये आणि लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये देशात सर्वत्र व्हीव्हीपॅटचा वापर होत आहे. व्हीव्हीपॅट स्लिपवर मत दिलेल्या उमेदवाराचा अनुक्रमांक, नाव आणि चिन्ह प्रदर्शित होते. ही स्लिप पाच वर्षापर्यंत सुस्थितीत राहू शकते. आतापर्यंत १८ कोटी मतदारांनी व्हीव्हीपॅटच्या आधारे मतदान केले आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019; This is the history of EVM and VVPAT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.