धान्य बियाणांवर निर्बंध कुणाचे?
By admin | Published: June 7, 2015 12:42 AM2015-06-07T00:42:33+5:302015-06-07T00:42:33+5:30
खरीप हंगामाला सुरूवात होण्यापूर्वीच खासगी कंपन्यांनी बियाणीच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात सुरू केल्याने नेमके ..
लाखांदूर : खरीप हंगामाला सुरूवात होण्यापूर्वीच खासगी कंपन्यांनी बियाणीच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात सुरू केल्याने नेमके कोणत्या कंपनीची बियाणे विकत घ्यायची याबाबतीत शेतकरी संभ्रमात सापडला आहे. एकरी उत्पन्न जास्त मिळेल, या हेतूने यापूर्वी खासगी कंपनीच्या बियाणामुळे मोठी फसगत झाल्याने शेतकरी बाजारातील धान्य बियाणांवर निर्बंध कुणाचे म्हणून मन:स्थितीत आहे.
खरीप हंगामाला सुरवात होत आहे. उन्हाळी धानपिकाची मळणी करून शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी बियाणांच्या जुळवा जुळव करण्याच्या लगबगीत असताना खेडोपाळी खाजगी कंपन्यांनी मोठ मोठ्या जाहीरातीचे फलक लावून शेतकऱ्यांना मोहात ओढण्याचा केविलवाना प्रकार सुरू केला आहे. बि-बियाणे शेतकऱ्यांसाठी तारक की मारक या संभ्रमात शेतकरी वर्ग दिसून येत असल्याने या बियाणे विक्रीवर कुणाचे निर्बंध नाही काय, असाही प्रतिप्रश्न विचारल्या जात आहे. लाखांदूर तालुक्यात २६ हजार ७११ हेक्टर क्षेत्र खरीप पिकाखाली असून ५ हजार ४०० क्विंटल बियाणांची गरज ३२ हजार शेतकऱ्यांना आहे. ७५ टक्के शेतकरी हे केंद्रातील बियाणांवर अवलंबून असून २५ टक्के शेतकरी हे स्वत:जवळील बियाणे पेरणीकरीता वापरतात. (तालुका प्रतिनिधी)
बोगस बियाणावर आळा घालणार
खरीप हंगामाला सुरवात होताच बियाणे, खते, औषधींच्या परवानाधारक कृषी केंद्राची तपासणी केली जाते. कंपनीची परिपूर्ण मान्यता व बियाणांच्या योग्यतेची तपासणी करूनच विक्रीला मान्यता दिली. यंदा सुद्धा कृषी विभाग पं.स. लाखांदूर विशेष भरारी पथक तयार करून बोगस बियाणे कंपनीवर आळा घालणार आहे. बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर यापूर्वी कार्यवाही झाली. परंतू, कायद्यात केवळ ५०० रूपये दंड असल्याने तसेच गुणात्मक दर्जा तपासण्यासाठी नमुने प्रशीता शाळेत पाठविल्यानंतर अहवाल येईपर्यंत आॅल ईज वेल होत असल्याने अशा कंपन्या जाहिरातीच्या माध्यमातून फोफावल्या आहेत. त्यामुळे कायद्यात दुरूस्ती करून कड शिक्षा केल्यास बोगस बियाणे कंपनीवर आळा बसेल.
- संजय लांजेवार,
विस्तार अधिकारी,
पंचायत समिती, कृषी विभाग, लाखांदूर