कोट्यवधी खर्चूनही कालव्याला भगदाड
By admin | Published: August 25, 2016 12:29 AM2016-08-25T00:29:21+5:302016-08-25T00:29:21+5:30
पावसाळा असून पाणी नाही, धरण असून पाण्याचे नियोजन नाही. त्यामुळे इटियाडोह व गोसेखुर्द धरणाच्या पाण्याअभावी...
पाण्यासाठी शेतकरी त्रस्त : इटियाडोह धरणाचे कालवे बेवारस, निकृष्ट बांधकामाचे परिणाम
लाखांदूर : पावसाळा असून पाणी नाही, धरण असून पाण्याचे नियोजन नाही. त्यामुळे इटियाडोह व गोसेखुर्द धरणाच्या पाण्याअभावी हजारो हेक्टर क्षेत्रातील धानपिक अखेरची घटीका मोजत असल्याचे भयावह वास्तव बघायला मिळत आहे.
लाखांदूर तालुक्याला इटियाडोह धरण व गोसेखुर्द धरणाची मोठी देणं लाभली आहे. चुलबंद व वैनगंगा नदीची भर पुन्हा तालुक्यात हरितक्रांती घडवून आणण्यास मदत मिळणार म्हणून या भागातील शेतकरी आनंदात होता. अत्याधुनिक शेतीच्या तंत्राची जोड व धरणाच्या पाण्याचा वापर यातून आर्थिक प्रगती साधण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न आता भंगणार आहे. इटियाडोह धरण कालव्याच्या दुरुस्तीकरिता नाबार्ड योजनेअंतर्गत करोडोचा निधी खर्च करण्यात आला. यातील अर्धेअधिक कामे पेटी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केले. निकृष्ट कामे झाल्याने आता ठिकठिकाणी भगदाड पडले. सिमेंट अस्तरीकरणाची कामे पाण्यात वाहून गेली. धरणाचे पाणी बंद केल्यावर शेवटच्या टोकावर पाणी पोहचते. त्यामुळे पाण्याअभावी धान पिक धोक्यात आले आहे. इटियाडोह धरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्याच्या नियोजनशून्य कारभारामुळे नाले, वाहत आहेत. पाणी वापर संस्था लक्ष देत नसल्याने काही भागातील शेतकरी एक दुसऱ्या कडीला गेट बंद करून पाण्याचा गैरवापर करीत आहेत. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी पाणी वापर संस्थाकडे बोट दाखवून शेतकऱ्यांना हुलकावणी देत आहेत. त्यामुळे धरणात पाणी असून शेतकऱ्यांना पाण्यासाठी बोंबा माराव्या लागत आहेत. अशी परिस्थिती राहिल्यास यावर्षी धान करपल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)
चौरास भागात गोसे धरणाचे कालवे फुटले
चौरास भागात गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्याचे अनेक ठिकाणी अर्धवट बांधकाम करण्यात आले. मुख्य कालव्याला लागून लहान कालव्याचे बांधकाम झाले नाही. आधीच निकृष्ट दर्जाचे केलेल्या बांधकामाला भेगा पडलेल्या असल्याने धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कालव्याना तडे जाऊन कालवे फुटले. तालुक्यातील मांढळ, ओपारा, गुंजेपार, भागडी, पालपेंढारी, गवराळा, किरमटी, नांदेड, विरली या चौरास भागातील कालवे नामशेष होण्याच्या मार्गावर असून संबंधित विभागाने लक्ष न दिल्यास भविष्यात गोसेखुर्द धरणाचे पाणी चौरास भागात मिळणे कठीण जाणार आहे.