यंदा शेतकऱ्यांचे बजेट कोलमडणार !

By admin | Published: June 19, 2016 12:16 AM2016-06-19T00:16:21+5:302016-06-19T00:16:21+5:30

आधीच सततच्या दुष्काळ, नापिकी व नैसर्गिक आपत्तीने त्रस्त शेतकरी यंदा तरी दमदार पाऊस येईल, या प्रतीक्षेत आहे.

This time the farmers' budget will collapse! | यंदा शेतकऱ्यांचे बजेट कोलमडणार !

यंदा शेतकऱ्यांचे बजेट कोलमडणार !

Next

खत, बियाणांची दरवाढ : मशागत पूर्णत्वावर, पेरणीसाठी शेतकरी सज्ज
लाखांदूर : आधीच सततच्या दुष्काळ, नापिकी व नैसर्गिक आपत्तीने त्रस्त शेतकरी यंदा तरी दमदार पाऊस येईल, या प्रतीक्षेत आहे. खरीप हंगामपूर्व शेती मशागतीची कामे आटोपली असून शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाला आहे. यंदा, खते, बियाणांची ५० टक्के दरवाढ झाल्याने लागवड खर्चातही वाढ होणार आहे. एकूणच उत्पादन खर्चात दुपटीने वाढ होत असल्याने बळीराजाचे कंबरडे मोडणार आहे.
लाखांदूर तालुक्यात धान, सोयाबीन, उस व तुर हे प्रमुख पीक आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ऊस पिकाचे क्षेत्र कमी होऊन धान पिकाच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. पावसाच्या अनियमिततेच्या फटका सलग तीन वर्षे बसल्याने खरिपासह रबीचा हंगाम होऊन शेतकरी आर्थिक अडचणीत आला. सरासरीपेक्षाही हेक्टरी उत्पन्न घटल्याने शेतकऱ्यांना यंदा पीक कजार्वाचून पर्याय नाही. बॅँकादेखील शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहे. तालुक्यातील काही सेवा सहकारी संस्थांनी मागील ५ ते ६ वर्षापासून नियमित पिक कर्जाची परतफेड न केल्याने यंदा नियमित कर्ज फेडऱ्यांना पीककर्जाकरिता त्रास सहन करावा लागला. याही स्थितीत शेतकऱ्यांनी पदरमोड करून खरीपाची तयारी केली.
मृग नक्षत्राचा आठवडा उलटला असला तरी पावसाचा पत्ता नाही. अन दुसरीकडे मशागतीपासून रासायनिक खते, बियाणे, कीटकनाशके यांच्या किमतीमध्ये अव्वाच्यासव्वा वाढ झाली आहे. यामुळे लागवडीचा खर्च वाढून शेतकरी जेरीस आला आहे. सध्या शेतकऱ्यांना ३० किलोच्या सोयाबीन बॅगसाठी २,४०० रूपये मोजावे लागत आहे. खताची बॅग मागीलवर्षीच्या तुलनेत किमत दुपटीने वाढली आहे. याशिवाय शेतातील काडीकचरा वेचणे, नांगरण, वखरण, आदी शेतमशागतीच्या कामासाठी एकरी ५ ते ६ हजार रुपये खर्च येत आहे. यंदा तरी वरुणराजाची कृपा व्हावी व शेत हिरवेगार व्हावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. लाखांदूर तालुका भरारी पथकाने हंगामाच्या अगदी सुरूवातीला तालुक्यातील कृषी केंद्राला भेटी देऊन तपासणी केली असता बियाणे, खत, व दस्तावेज व मार्गदर्शनाचे काटेकोरपणे पालन न केल्याच्या कारणावरुन तब्बल १२ कृषी केंद्राला विक्री बंदचे आदेश देण्यात आले. शेतकऱ्यांची फसवणुक होउ देणार नसल्याचे सांगुन यदा कृषी केंद्रावर नजर ठेवण्यात येणार आहे.
अशी झाली लागवड खर्चात वाढ
दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय, बिनभरवशाचा झाला आहे. शेतीपयोगी साहित्य, खते, बियाणांचे वाढलेले दर यासह अन्य संकटामुळे शेती करणे कठीण झाले आहे. सद्यस्थितीत धानाचा एकरी खर्च १० हजारांवर गेला आहे. शेती तयार कसण्यासाठी काडीकचरा वेचणे ३०० रूपये, नांगरणीकरिता ७०० रूपये, वखरणी ४०० रूपये, बियाण्यांची ३० किलोची बॅग २,४०० रूपये, खताची एक बॅग १,००० रूपये झाली आहे. निंदण, खुरपण, डवरे, काढणी व मळणी यासाठी ५ ते ६ हजार रूपये खर्च येतो. दरवर्षी उत्पादन कमी होत असताना लागवड खर्चात कमालीची वाढ होत आहे.
मागीलवर्षी डीएपीचे दर प्रति बॅग १,१७० रूपये होते यंदा १०० रूपयांची वाढ झाली आहे. धान बियाणाच्या कंपन्यानी नाव बदलवुन नवनविन वान तयार केल्याने त्यांच्या किमती पाचपट वाढवुन प्रती किलो १०० ते २०० रूपयाने विक्री सुरू आहे. सोयाबीन बियाणांचे दर १,९०० ते २००० रूपये, प्रती बॅग आता २,४०० रूपयांवर पोहोचली आहे. तूर, मूग, उडदाच्या दरातही १०० ते ३०० रूपये वाढ झाली आहे. दुष्काळी परिस्थितीने संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर दरवाढीचे संकट ओढवले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: This time the farmers' budget will collapse!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.