मोहाडी तालुक्यात १,९२९ घरकुलांची प्रतीक्षा
By admin | Published: February 6, 2016 12:36 AM2016-02-06T00:36:47+5:302016-02-06T00:36:47+5:30
मोहाडी तालुक्यात ओबीसींना घरकुलांची प्रतीक्षा आहे. सुमारे २४ गावातील १९२९ लाभार्थ्यांचे मास्टर यादीमध्ये नाव असुनही गावाला निधी मिळत नसल्याने ...
१० वर्षांपासून संपता संपेना याद्या : स्वतंत्र योजना राबविण्याची मागणी, व्यथा इतर मागासवर्गीयांची
युवराज गोमासे करडी/पालोरा
मोहाडी तालुक्यात ओबीसींना घरकुलांची प्रतीक्षा आहे. सुमारे २४ गावातील १९२९ लाभार्थ्यांचे मास्टर यादीमध्ये नाव असुनही गावाला निधी मिळत नसल्याने त्यांचे घरकुाचे स्वप्न स्वप्नच ठरु पाहत आहेत. अन्य समाजातील बांधवांसाठी शासन योजनांवर योजना राबवित असून लाभार्थी सापडणे मुश्किल झाले असतांना ओबीसीमध्ये गरजू व गरीब नाहीत काय, असा प्रश्न विचारला जात आहे.
मोहाडी तालुक्यात मागील दहा वर्षांपासून ओबीसींच्या घरकुलांचा प्रश्न सुटलेला नाही.
माहाडी तालुक्यात एकुण ७८ ग्रामपंचायती असून २४ गावातील १९२९ लाभार्थी प्रतिक्षेत आहेत. सन २०१५ मध्ये तालुक्याला ७२ घरकुलांचा कोटा मिळाला. त्यामुळे २४ गावांना प्रत्येकी ३ घरकुलाचा टारगेट देण्यात आला. ओबीसी समाजातील गरिबांना घर बांधणे दिवास्वप्न ठरल्यासारखी अवस्था आहे. अनेक वर्षापासून गावातील प्रतिक्षा याद्या संपलेल्या नाहीत.
गावात विस्तार व लोकसंख्या वाढली, पंरतु तालुक्यातील सुमारे २४ गावातील जुन्या प्रतीक्षा याद्या संपलेल्या नाहीत सन २०१४ मध्ये तयार करण्यात आलेल्या नविन प्रतीक्षा याद्यांची त्यात पुन्हा नव्याने भर पडली आहे. शासन अनेक योजना राबवित आहे. त्यामुळे अन्य समाजाला मोठा आधार लाभला. अनेक कुटूंबाचे घरकुल त्या पैश्यातून बांधले गेले. अनेकांनी तर घरकुलाच्या निधीत घरचे पैसे ओतून घरे बांधलीत. कुणाचा विरोध करण्याचा या मागचा हेतू नाही. पंरतू ओबीसी समाज मोठा असतांना, त्यांच्यातही गरिबांची संख्या अधिक असतांना शासन-प्रशासनाकडून या दुर्लक्षित घटकांचा विचार होताना दिसत नाही.
ओबीसी समाजात गरीब नाहीत, असाच गैरसमज शासनाचा झाल्याचे दिसून येत आहे. ओबीसींचे लाभार्थी घरकुलाचे प्रतीक्षेत असतांना त्यांना लाभ मिळत नाही.
घरकुले मंजूर होणार असल्याचे सांगितले गेल्याने तालुक्यातील काही गावातील नागरिकांनी आपले झोपडे दोन वर्षांअगोदर पाडले. मात्र अजुनही त्यांना घरकुल मिळाले नाही. ओबीसींचे अनेक पुढारी शासनात व विरोधात असतांना त्यांनाही आपल्याच समाजातील नागरिकांच्या समस्या दिसू नयेत याचेच खरे तर आश्चर्य व्यक्त होण्यासारखी अवस्था आहे.