भटक्या विमुक्तांनी संघटित व्हावे
By admin | Published: March 14, 2016 12:29 AM2016-03-14T00:29:20+5:302016-03-14T00:29:20+5:30
६२ जातींमध्ये विखुरलेल्या भटक्या विमुक्त समाजाचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय विकास साधायचा असेल तर भटक्या विमुक्त प्रवर्गातील ...
संघर्ष वाहिनीची बैठक : दीनानाथ वाघमारे यांचे आवाहन
भंडारा : ६२ जातींमध्ये विखुरलेल्या भटक्या विमुक्त समाजाचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय विकास साधायचा असेल तर भटक्या विमुक्त प्रवर्गातील समाजाने संघटीत होण्याची काळाची गरज आहे, असे आवाहन संघर्ष वाहिनीचे प्रमुख दीनानाथ वाघमारे यांनी केले.
भंडारा येथे आज रविवारी आयोजित जिल्हा संघर्ष वाहिनीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चा संदर्भात विचारमंथन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी शंकरराव फुंड होते.
प्रमुख उपस्थितींमध्ये बेलदार समाजाचे संघटक मुकुंद अडेवार, के.एन. नान्हे, प्रकाश पचारे, प्रकाश हातेल, राजेश येलशट्टीवार, योगेश दुधपचारे, व्ही. डी. मारबते, यशवंत दिघोरे, लोकेश नगरे, गोविंद मखरे, राजु शिवरकर, प्रमिला मेश्राम, यावलराव मारबते, अशोक शेंडे, हेमंत बावणे, चंद्रभुषण धोबळे, रेखा मोहनकर, के. डी. कांबळे, तुलराम कराडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मुंकूद अडेवार म्हणाले, जोपर्यंत एन टी प्रवर्गातील नागरिक रस्त्यावर उतरून एकजुटता दाखविणार नाही, तोपर्यंत शासन आपल्याला हक्क देणार नाही.
प्रकाश पचारे म्हणाले समाजातील शिक्षीत वर्गातील लोकांनी शिक्षणाचा प्रचार व प्रसार करावा. समाजाचे संघटन मजबूत करुन समाज विकास कार्यात हातभार लावावा. के. एन. नान्हे म्हणाले, संघर्ष वाहिनीने उभारलेल्या लढ्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील समाज बांधवात नवचैतन्य निर्माण झाले आहे. भविष्यात या समाजाने पेटून उठण्याची गरज आहे. आपल्या हक्काकरिता समाज बांधवाना प्रोत्साहन देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या बैठकीला भंडारा गोंदिया जिल्हयातील ढिवर, बेलदार, धनगर, गायकी, नाथजोगी, पारधी, बंजारा, वडार आदी समाजातील बांधव उपस्थित होते. बैठकीचे संचालन रुपेश भांडारकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रकाश पचारे यांनी केले. (प्रतिनिधी)