'बुलढाणा टक्कल प्रकरणात मंत्र्यांनी खोटी माहिती दिली'; मेघना बोर्डीकरांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 11:14 IST2025-03-26T10:53:09+5:302025-03-26T11:14:16+5:30
Minister Meghna Bordikar: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील केस गळतीमुळे अनेकांना टक्कल पडलं आहे. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली होती. ...

'बुलढाणा टक्कल प्रकरणात मंत्र्यांनी खोटी माहिती दिली'; मेघना बोर्डीकरांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव
Minister Meghna Bordikar: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील केस गळतीमुळे अनेकांना टक्कल पडलं आहे. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली होती. तपासानंतर सरकारी रेशनमधील गहू लोकांच्या आरोग्यसाठी घातक ठरल्याचे समोर आलं होतं. मात्र आता या प्रकरणावरुनच राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला आहे. काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांनी हा हक्कभंग दाखल केला आहे. बुलढाण्यामध्ये लोकांना टक्कल पडण्याच्या विषयी विधान परिषदेमध्ये खोटी माहिती दिल्या प्रकरणी हा हक्कभंग दाखल करण्यात आला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव गावात अचानक शेकडो लोकांचे केस गळायला लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. गावातील अनेकांचे केस गळून टक्कल पडलं होतं. वरवर पाहता गावकऱ्यांमध्ये कोणताही आजार दिसून येत नव्हता. मात्र तपासणीनंतर सरकारी वितरण केंद्रावरुन पुरवलेल्या गव्हातील विषाणूमुळे हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आलं. हा गहू सरकारी रेशन दुकानांवर पंजाबमधून पुरवण्यात येत होता. मात्र यावरुनच आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी खोटी माहिती दिल्याचे काँग्रेस आमदाराने म्हटलं आहे.
रेशनमध्ये मिळणाऱ्या गव्हामध्ये असलेल्या सेलेनियममुळे केस गळत असल्याचं संशोधन पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बाविस्कर यांनी केलं. मात्र मंत्री मेघना बोर्डीकर यांनी गव्हातील सेलेनियममुळे केस गळती होत नाही अशी माहिती सभागृहाला दिली. सभागृहाला चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्यामुळे काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांनी हक्कभंग सादर केला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी हा हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करून घेतला.
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आणि नांदुरा तालुक्यात अचानक केसगळती सुरू होऊन टक्कल पडू लागलं होतं. शेगाव तालुक्यातील १२ गावांमध्ये तर नांदुरा तालुक्यातील एका गावात केसगळतीचे रुग्ण आढळून आले होते. अनेक प्रयत्न केल्यानंतरही केसगळतीचे कारण समोर येत नव्हतं. त्यानंतर पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी संशोधन करून केसगळतीचं कारण शोधून काढलं होतं. केसगळतीनं बाधितांच्या लघवी, रक्त आणि केसांमध्ये सेलेनियमचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून आलं होतं.