सकल जैन समाजाचा ‘धर्म बचाव’ मूक मोर्चा
By Admin | Published: August 25, 2015 02:02 AM2015-08-25T02:02:17+5:302015-08-25T02:02:17+5:30
बुलडाणा जिल्ह्यात आंदोलन; संथाराप्रकरणी फेरविचार करण्याची मागणी.
बुलडाणा : राजस्थान उच्च न्यायालयाने जैन धर्मीयांच्या संथारा सल्लेखना व्रताच्या विरोधात निकाल दिल्याने सकल जैन समाजामध्ये तीव्र भावना उमटली असून, या न्यायालयीन निर्णयाचा फेरविचार व्हावा, या मागणीसाठी २४ ऑगस्ट रोजी आपले प्रतिष्ठान बंद करून सकाळी ११ वाजता मूक मोर्चा काढून अधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
जैन धर्मीयांचे मुनी, साध्वी श्रावक, श्रविका आपल्या आत्मबलावर तपस्या साधना करतात. अंतिम समयी शरीराचा मोह सोडून संथारा व्रत किंवा सल्लेखना घेतात, यालाच समाधी मरण असेही संबोधले जाते, ही प्राचीन परंपरा असून, विनोबा भावे, संत ज्ञानेश्वर, महाभारतातील पितामह भीष्म यांसारखांनीही आपल्या शरीराचा मोह सोडून समाधी घेतली आहे. तर समाधी मरण व संथारा हे एकाच अर्थांंंचे शब्द असतानाही न्यायालयाने संथारा व समाधी मरण यांची सांगड सती परंपरेशी जोडुन यास आत्महत्या ठरवत शिक्षेचे प्रावधान केल्यामुळे समस्त जैन धर्मीयांमध्ये दु:खाची भावना पसरवली आहे. याबाबत न्यायालयाच्या निर्णयावर फेरविचार व्हावा, या मागणीसाठी बुलडाणा येथील जैन समुदायाच्यावतीने २४ ऑगस्ट रोजी शहरातील आपली प्रतिष्ठाने, व्यवसाय, दुकाने, बंद करून सकाळी ११ वाजता मूक मोर्चा जैनस्थानकपासून जयस्तंभ चौक, पोलीस स्टेशनमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी टाकसाळ यांना निवेदन देण्यात आले.