अनियमित पावसामुळे पिकांची वाढ खुंटली
By admin | Published: August 26, 2015 11:38 PM2015-08-26T23:38:26+5:302015-08-26T23:38:26+5:30
बुलडाणा जिल्ह्यात पावसाचा असमतोल; उत्पादनात घट होण्याची शक्यता.
बुलडाणा : जिल्ह्यात मॉन्सूनची अनियमितता अद्यापही कायम आहे. पावसाळ्यात जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ७१२.९ मी.मी. पेक्षा वर वाढू शकले नाही. शिवाय एकाही मंडळात ७५ टक्क्यापेक्षा जास्त पर्जन्यमान झाले नाही. त्यामुळे िपकांवर परिणाम होऊन वातावरणातील बदलामुळे बर्याच तालुक्यात पिकांची वाढ खंडित झाली आहे. त्यामुळे यंदा बर्याच पीक उत्पादनात मोठी घटन होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. यंदा पावसाने सरासरी न गाठल्यामुळे शिवाय पेरणीच्यावेळी पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्यांवर मोठा परिणार झाला. परिणामी, जिल्ह्यात सोयबीन आणि कापूस हे मोठे पीक वगळता ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ व इतर लहान पिकांना पावसाच्या अनियमिततेचा मोठा फटका बसल्यामुळे या पेरणीची टक्केवारी अद्यापही वाढली नाही. खरीप ज्वारी पीकपेरणीखालील सरासरी ५६ हजार हेक्टर क्षेत्र आहे; मात्र २२ टक्क्याचेवर पेरणी झाली नाही. तर बाजरीचे क्षेत्र ३५00 हेक्टर असून, ३३ टक्केच्यावर पेरणी झाली नाही. मका पिकांची ३५ टक्के पेरणी आहे. हे सर्व पीक वाढीच्या अवस्थेत आहे; मात्र पावसाचा खंड पडल्यामुळे मोठय़ा प्रमाणात उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. मूग, उडीद, भुईमूग, तीळ या पिकांच्या जिल्ह्यात सरासरी पेरण्यात ३३ ते ४२ टक्के पर्यंत झाल्या आहे. सर्व पीक फुलोर्यावर असून, काही पिकांच्या शेंगा धरल्या आहेत; मात्र पावसाने खंड दिल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. या पिकांना अद्यापही पावसाची आवश्यकता आहे. पुढील काही दिवसात पाऊस न झाल्यास या पिकांना फटका बसण्याची शक्यता कृषी विभागाने २४ ऑगस्ट रोजीच्या अहवालात नमूद आहे.