गाव समृद्ध झाले तर लोकांना विस्थापित होण्याची गरज पडणार नाही - सत्यजित भटकळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 17:33 IST2021-02-02T16:57:38+5:302021-02-02T17:33:09+5:30
Satyajit Bhatkal News 'पाणी फाउंडेशन'चे सीईओ तथा अभिनेता आमीर खानचे वर्गमित्र सत्यजित भटकळ यांच्याशी साधलेला संवाद.

गाव समृद्ध झाले तर लोकांना विस्थापित होण्याची गरज पडणार नाही - सत्यजित भटकळ
- नवीन मोदे
मोताळा : 'पाणी फाउंडेशन'चे सीईओ तथा सत्यमेव जयते या टीव्ही मालीकेचे दिग्दर्शक, अभिनेता आमीर खानचे वर्गमित्र, अत्यंत साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले सत्यजित भटकळ हे नुकतेच मोताळा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांच्याशी साधलेला हा संवाद
सत्यमेव जयते ते वॉटर फाउंडेशन हा प्रवास कसा झाला ?
सत्यमेव जयते हा कार्यक्रम सामाजिक प्रश्न वर आधारित होता. त्या वेळी देशातील विविध भागातील समस्या तसेच त्यासाठी अहोरात्र काम करणारे अनेक लोक भेटली. हि लोक त्या त्या ठिकाणी काम करत होती. त्यावेळी एखादा प्रश्न लावून धरून त्याचे जनआंदोलनात रूपांतर करून ती समस्या सोडवण्याचा आमिर खान यांनी विचार मांडला व त्यातूनच पाणी फाउंडेशन ची पुढची वाटचाल सुरु झाली.
पाणी फाउंडेशन च्या आजपर्यंतची वाटचाल किती यशस्वी झाली असे तुम्हाला वाटते?
लोक एकत्रित येऊन काम करू शकतात हे यातून सिद्ध झाले ही फक्त सुरुवात आहे. अजून खूप मोठा लढा बाकी आहे. जनआंदोलनातून गावे समृद्ध होऊ शकतात हा आत्मविश्वास मिळाला.
समृद्ध गाव स्पर्धेचे नेमकी संकल्पना काय आहे ?
जलव्यवस्थापन जल व मृदसंधारण, गावकर्यांचे उत्पन्न वाढविणे ,जंगल निर्मिती ,मातीचे आरोग्य सुधारणे व गवताचे संरक्षित कुरान निर्माण करणे या प्रश्नावर काम केल्याशिवाय गावात समृद्धी येणार नाही, नेमके यावरच समृद्ध गाव स्पर्धेमध्ये काम होणार आहे .
जलयुक्त शिवार योजना बंद करण्यात आली आहे त्याचा काही परिणाम होणार आहे का ?
जलयुक्त शिवार योजना अतिशय चांगली योजना होती जलसंधारणासाठी ती उपयोगी पडली. परंतु आजही अनेक योजना आहेत. त्यातूनही अनेक चांगली कामे होऊ शकतात यात शंका नाही.
पाणी फाउंडेशन च्या कामाला सर्वांचे सहकार्य मिळाले का?
नक्कीच सर्वच राजकीय पक्ष सामाजिक संस्था यांनी सहकार्य केले. अनेकांचे पाठबळ मिळाले शासन-प्रशासन खंबीरपणे पाठीशी उभी राहिले. शेवटी हे जन आंदोलन आहे .
पाणी फाउंडेशन च्या आज पर्यंतच्या वाटचालीबाबत आपण समाधानी आहात का ?
समाधानी आहे असे म्हटले तर चळवळ संपून जाईल .परंतु योग्यरीतीने वाटचाल सुरू आहे. एवढेच मी सांगू शकतो. मी तर म्हणेल फक्त ही एक सुरुवात आहे. पाणी फाउंडेशन सारख्या अनेक उपक्रमाची महाराष्ट्राला गरज आहे. स्वप्नातला गाव निर्माण व्हावीत, जगातून लोक ती पहायला यावे एवढा बदल घडवण्याची कुवत गावातील लोकात आहे हे निश्चित.