कीर्तनातून सापांविषयी जनजागृती
By admin | Published: August 19, 2015 01:46 AM2015-08-19T01:46:45+5:302015-08-19T01:46:45+5:30
नागपंचमीचे औचित्य साधत सापाची भीती नष्ट करण्यासाठी किर्तनाचा आधार.
ब्रम्हानंद जाधव / मेहकर : राज्यात एकूण ५२ जातीचे साप असून, त्यात ४0 बिनविषारी व १२ विषारी साप आहेत. लोकांमध्ये सापांविषयी भीती असल्यामुळे साप दिसताक्षणी त्याला मारून टाकले जाते. लोकांच्या मनातील सापाची भीती नष्ट करण्यासाठी येथील डी.भास्कर व सर्पमित्र वनिता बोराडे हे कीर्तनातून सर्प विश्वाचे धडे लोकांना देत आहेत. नागपंचमीच्या औचित्यावर जनजागृती, प्रबोधन व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सर्प कीर्तनाचा आगळा वेगळा उपक्रम बुलडाणा जिल्हाभर राबविला जात आहे. साप विषारी असो की बिनविषारी, त्याच्याविषयी लोकांच्या मनात एकप्रकारची भीती निर्माण झालेली आहे. सापाच्या भीतीपोटी सर्वसामान्य माणूस सर्प आभ्यासाकडे वळत नाही; परंतु साप कुठेही दिसला तर त्याला मारून टाकल्या जाते. त्यामुळे लोकांच्या मनातील सापाची भीती नष्ट करून सापाविषयी जिव्हाळा निर्माण व्हावा, तसेच लोकांमध्ये पर्यावरण वादी व वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविण्यासाठी नागपंचमीच्या औचित्यावर येथील सर्पमित्र डी.भास्कर व वनिता बोराडे हे सर्प कीर्तनाचा आगळावेगळा उपक्रम जिल्ह्यात राबवित आहेत. संत तुकोबारायांनी सर्पाविषय संरक्षण व संवर्धनासाठी आपल्या अभंग गाथेत विविध अभंग रचना केलेल्या आहेत. त्यापैकीच संत तुकाराम महाराजांच्या ह्यह्यसाधूनि बचनागं, खाती तोळा तोळा, इतराते डोळा न देखवे! साधूनि भुजंग धरतील हाती, आणिके कापती चळाचळा! असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे!ह्णह्ण या अभंगावर डी.भास्कर यांनी चिखली तालुक्यातील लव्हाळा येथे १७ ऑगस्ट रोजी कीर्तन केले.