मजुराची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:13 IST2017-10-23T00:13:13+5:302017-10-23T00:13:23+5:30
वरवट बकाल: मोबाइल टॉवरचे काम करण्यासाठी आलेल्या हिंगोली जिल्हय़ातील मजुराने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना वरवट बकाल शिवारात २२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

मजुराची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
वरवट बकाल: मोबाइल टॉवरचे काम करण्यासाठी आलेल्या हिंगोली जिल्हय़ातील मजुराने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना वरवट बकाल शिवारात २२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
वरवट बकाल परिसरात एका खासगी मोबाइल कंपनीच्या टॉवरचे काम सुरू आहे. कंत्राटदाराने या कामासाठी हिंगोली जिल्हय़ातील मजूर आणलेले असून, ते वरवट बकाल शिवारात सोनाळा रोडवर पाल टाकून राहत आहेत. यातील लक्ष्मण शंकर ऊर्फ अण्णा पवार (वय ३५ वर्ष) या मजुराने वरवट बकाल शिवारात माजी पोलीस पाटील यांच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजतादरम्यान उघडकीस आली. लक्ष्मण पवार हा गेल्या दोन दिवसांपासून नातेवाइकांना न सांगता बेपत्ता होता. याबाबतची तोंडी माहिती तामगाव पोलिसांना देण्यात आली होती; परंतु शोध घेऊनही तो मिळून आला नाही. दरम्यान, रविवारी सोनाळा रोडवर पेट्रोल पंपाच्या बाजूला माजी पोलीस पाटील यांच्या शेतातील विहिरीत अनोळखी युवकाचे प्रेत असल्याबाबत तामगाव पोलिसांना माहिती मिळाली. यावरून तामगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन प्रेत वर काढल्या वर मृतक हा लक्ष्मण शंकर ऊर्फ अण्णा पवार रा. पळसगाव ता. वसवत, जि. हिंगोली असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी मृतकचा भाऊ संजय शंकर पवार यांच्या लेखी फिर्यादीवरून तामगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.