सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:24 AM2021-06-03T04:24:40+5:302021-06-03T04:24:40+5:30

बुलडाणा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, शासनाने अखेर इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाची स्थिती ...

Tenth result of all schools is one hundred percent! | सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के!

सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के!

Next

बुलडाणा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, शासनाने अखेर इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. दहावीचा निकाल कसा लागेल, त्याचे सूत्र कसे असेल, आदी प्रश्न उपस्थित झाले होते. अखेर माध्यमिक शिक्षण विभागाने निकालाचे सूत्र जाहीर केले आहे. या सूत्राच्या आधारे सर्वच शाळांचा निकाल १०० टक्के लागणार असल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे इयत्ता दहावीची परीक्षा पुढे ढकलली होती; परंतु कोरोनाचा प्रकोप वाढतच असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शासनाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला, तसेच बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. दहावीची परीक्षाच होत नसल्याने आता विद्यार्थ्यांना कोणत्या आधारे उत्तीर्ण करणार, असा प्रश्न प्रारंभी समोर आला. पालक, विद्यार्थ्यांनाही गुण आणि गुणवत्तेबाबत चिंता सतावत होती. कारण गुणवंत विद्यार्थी व पास श्रेणीतील विद्यार्थी एकाच रांगेत आल्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय तर होणार नाही, अशी अटकळ विद्यार्थ्यांच्या मनात अद्यापही कायम आहे. दहावीच्या निकालाचे सूत्र शिक्षण विभागाने जाहीर केले असले तरी, पालक व विद्यार्थ्यांना अद्यापही गुणांबाबत भीती वाटत आहे.

असे असेल नवे सूत्र

माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीतील कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान न करता त्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यात येणार आहे. तसेच नववीतील ५० टक्के गुण लक्षात घेतले जाणार आहेत आणि इयत्ता दहावीतील अंतर्गत मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार आहेत.

विद्यार्थ्यांचे दहावीच्या वर्षातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण, गृहपाठ, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा यांना २० गुण, विद्यार्थ्यांचा नववीचा विषयनिहाय अंतिम निकाल ५० गुण, या आधारे विद्यार्थ्यांचे यंदाचे मूल्यमापन करण्यात येईल, तसेच विद्यार्थ्यांचे कोविड पूर्वकाळातील संपादणूक पातळीही विचारात घेतली जाणार आहे.

विद्यार्थी आनंदित

शासनाने दहावीतील विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नाही, पास होण्याची खात्री नाही, अशा विद्यार्थ्यांचे चांगलेच फावले आहे. द्वितीय व पास श्रेणीतील विद्यार्थी या निर्णयामुळे आनंदित झाले आहेत; परंतु गुणवंत, प्रथम श्रेणीच्या विद्यार्थ्यांना मात्र गुण कसे मिळतील, या गुणांच्या आधारे अकरावी विज्ञान शाखेसह आयटीआय, पॉलिटेक्निकला प्रवेश मिळेल का, याची चिंता सतावत आहे.

दहावीच्या अभ्यासक्रमावर सीईटी

अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित वैकल्पिक सीईटी घेणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सीईटीतील गुणांच्या गुणवत्तेच्या आधारे अकरावीसाठी प्रवेश प्राधान्य देण्यात येणार आहे.

शिक्षणतज्ज्ञ काय म्हणतात?

काेराेना संसर्गामुळे शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गंत मूल्यमापनावर निकाल लावण्याची घाेषणा केली आहे़ मूल्यमापनाच्या सूत्रात स्पष्टता हवी आहे़ त्यामुळे शिक्षण विभागाने मूल्यमापनातील गुणदान कसे करावे, याविषयाची सविस्तर सूचना द्याव्यात़

शालीग्राम उन्हाळे, मुख्याध्यापक

अंतर्गंत गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्याचा शासनाचा निर्णय याेग्यच आहे़ अकरावीच्या प्रवेशासाठी परीक्षा हाेणार असल्याने गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसानही हाेणार नाही़ मूल्यमापनाचे सूत्र असल्याने सर्वच विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळतील़

विजयकुमार शिंदे, प्राचार्य, डायट

काेराेना संसर्गांमुळे दूरदृष्टीने शासनाने घेतलेला हा निर्णय आहे़ या निर्णयाचा अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवर कुठलाही परिणाम हाेणार नाही़ अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालय स्तरावर सीईटी परीक्षा हाेणार आहे़ त्यावेळी गाेंधळ उडण्याची शक्यता आहे़ त्यासाठी शिक्षण विभागाने नियाेजन करावे़

नरेंद्र लांजेवार, पालक बालक समुपदेशक बुलडाणा

कोरोनामुळे परीक्षा रद्द झाली. वर्षभर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. परीक्षेची तयारी केली. आता अंतर्गत मूल्यमापन करून गुण देणार आहेत. यात गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी शिक्षकांनी घ्यावी.

- गजानन जाधव, पालक

दहावीतील अंतर्गत मूल्यमापन, नववीतील ५० टक्के गुणांच्या आधारे निकाल लागणार आहे; परंतु निकालामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना कसे गुण मिळतील, याची चिंता वाटते. त्यांचे नुकसान व्हायला नको. सीईटीमध्ये मिळणाऱ्या गुणांचा पुढील प्रवेशासाठी विचार व्हावा.

- राजेश गायकवाड, पालक

Web Title: Tenth result of all schools is one hundred percent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.