जलसाठे तहानलेलेच !
By admin | Published: August 19, 2015 01:48 AM2015-08-19T01:48:09+5:302015-08-19T01:48:09+5:30
सिंदखेडराजा तालुक्यात कोरड्या दुष्काळाचे ढग कायमच.
अशोक इंगळे /सिंदखेडराजा: सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वच लहान-मोठे प्रकल्प पावसाअभावी कोरडे पडले असून, सर्वांनाच दमदार पावसाची गरज आहे. तब्बल अडीच महिने लोटूनही नदी, नाले वाहिले नाही. त्यामुळे कोरड्या दुष्काळाचे ढग कायम आहेत. चार गावात टँकरने पाणीपुरवठा सुरु असून, काही गावे भीषण पाणी टंचाईच्या कचाट्यात येत आहेत.
साखरखेर्डा आणि शेंदुर्जन मंडळात यावर्षी सुरुवातीपासून पावसाने उघडझाप सुरु ठेवली. खरीप हंगामातील पिकं या पावसाने जगत असली तरी फुलं आणि फळधारणेत आलेल्या पिकाला पावसाची नितांत गरज आहे. रिमझिम पावसावर पिके तग धरुन आहेत; परंतु धरणे, तलाव यासाठी दमदार पावसाची गरज आहे. साखरखेर्डा भागात १५0 मिमीपर्यंत पाऊस पडला असून, गायखेडी तलाव, महालक्ष्मी तलाव, राताळी, शिंदी, पिंपळगाव सोनारा, सावंगी माळी - १ आणि - २ या तलावात कोठेही पाणीसाठा नाही. शेंदुर्जन मंडळात जागदरी तलावात मृतसाठा शिल्लक असून, हनवतखेड, हिवरा गडलिंग येथील दोन्ही मध्यम प्रकल्प कोरडी पडली आहेत. त्यामुळे मलकापूर पांग्रा आणि दरेगाव या दोन्ही गावात टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. मलकापूर पांग्रा मंडळात १00.00 मिमीसुद्धा पाऊस पडला नसल्याने सर्वच छोटी तलाव कोरडी आहेत. दुसरबीड मंडळात १८0.00 मिमी पाऊस पडला असला तरी केशव शिवणी, मांडवा, जऊळका तलावात फक्त मृतसाठा असून, १५ दिवस पुरेल एवढेच पाणी आहे. सोनोशी मंडळात २00 मिमी पाऊस झाला. या परिसरात जांभोरा, ताडशिवणी, रुम्हणा, सोनोशी, बुट्टा तांडा, विझोरा, चांगेफळ यासह २५ गावाचा पाणीपुरवठा विद्रुपा धरणावरून होतो; परंतु मराठवाड्यात आजपर्यंत कोठेही दमदार पाऊस न पडल्याने पाणी टंचाईचे संकट आले. किनगावराजा मंडळातही परिस्थिती फारशी चांगली नाही. सिंदखेडराजा परिसरातही पाहिजे तसा पाऊस नाही. त्यामुळे चांदणी तलाव, मोती तलाव कोरडेच आहेत. ज्या गावात पाण्याची भीषण टंचाई आहे. त्या उमरद, सोनोशी, मलकापूर पांग्रा, पिंपळखुटा, दरेगाव, केशव शिवणी येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. १२ गावात विहीर अधिग्रहण आहे. काही गावात आठवड्यातून एक दिवस पाणी सोडण्यात येते. साखरखेर्डा, सिंदखेडराजा येथे महिन्यातून एकवेळा पाणीपुरवठा होतो. तर साखरखेर्डा येथे गढूळ पाणी पाणीपुरवठा होत असून, ६-६ महिने पाण्याची टाकी स्वच्छ केल्या जात नाही. त्यामुळे मिळेल त्या पाण्यावर जनतेला दिवस काढण्याची वेळ आली आहे.