क्षयरोगाचा आलेख वाढताच!
By admin | Published: August 17, 2015 12:00 AM2015-08-17T00:00:04+5:302015-08-17T00:00:04+5:30
२९२ रुग्णांची नोंद; क्षयरोग सप्ताहानिमित्त होणार जागृती.
बुलडाणा : अनादी काळापासून मानवाला छळणार्या क्षयरोगाचे अद्यापही समूळ उच्चाटन झाले नाही. क्षयरोगाचे जंतू रुग्णाच्या खोकल्यातून हवेद्वारे वातावरणात पसरतात व एका क्षय रुग्णापासून वर्षभरात १0-१५ क्षयरुग्ण तयार होतात. बुलडाणा जिल्ह्यात मागील आठ महिन्यात २९२ क्षयरोगी आढळून आले असून, ही संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र आहे. शाससनाने १५ ते २१ ऑगस्टदरम्यान क्षयरोग जनजागृती सप्ताह जाहीर केला असून, या पृष्ठभूमीवर हे वास्तव समोर आले आहे. बुलडाणा जिल्हा हा थंड हवेचे ठिकाण आणि क्षयरोग बरा होण्यास पोषक असे वातावरण असलेले ठिकाण आहे; मात्र बुलडाणा जिल्ह्यात या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात जिल्ह्यात करण्यात आलेल्या पाहणीमध्ये २९२ क्षयरोगी आढळून आले, तर २0३ रुग्ण हे फुप्फुसाचा क्षय असलेले निष्पन्न झाले. शिवाय ४३ रुग्ण मल्टी ड्रग्ज रेजिस्टन (औषधाला दाद न देणारे) चे आढळून आले. मल्टी ड्रग्ज रेजिस्टनच्या रुग्णांना सतत सहा महिने उपचार घ्यावा लागतो; मात्र हे रुग्ण वेळेवर आणि नियमित उपचार घेत नसल्यामुळे त्यांचा रोग बरा होण्याऐवजी तो वाढतच जातो. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण याच रुग्णांमध्ये अधिक असते. एका दिवशी तब्बल ९ गोळ्या व दररोजचे एक इंजेक्शन या रुग्णांना घ्यावे लागते. सध्या जिल्ह्यात असलेल्या या रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी ग्रमीण भागातील आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेवकावर आहे. दुर्दैवाने या रुग्णांना वेळेवर व योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे हे रुग्ण बरे होण्याऐवजी त्यांची प्रकृती खालावत आहे.