११ जिल्हा परिषद सदस्यांची निर्दोष सुटका
By admin | Published: January 15, 2016 01:40 AM2016-01-15T01:40:38+5:302016-01-15T01:40:38+5:30
सन २०१० मध्ये जिल्हा परिषद कार्यालयाला कुलूप ठोकल्याप्रकरणी तत्कालीन जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्षांसह ११ जणांविरूद्ध पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
कुलूप ठोकल्याचे प्रकरण : तत्कालीन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा समावेश
चंद्रपूर : सन २०१० मध्ये जिल्हा परिषद कार्यालयाला कुलूप ठोकल्याप्रकरणी तत्कालीन जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्षांसह ११ जणांविरूद्ध पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणाचा खटला चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयात गेल्या पाच वर्षांपासून सुरू होता. गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देत अकराही जिल्हा परिषद सदस्यांची निर्दोष मुक्तता केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या सभांना व कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नसल्याच्या कारणावरून तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष सतिश वारजूकर, उपाध्यक्ष संदिप करपे, सभापती विनोद अहिरकर, सभापती आसावरी देवतळे, सभापती प्रफुल खापर्डे व जि.प. सदस्य पंजाबराव गावंडे, सुधाकरराव कुंदोजवार, विलास डांगे, कन्हैय्यालाल जयस्वाल, संदिप गड्डमवार, तुळशिराम श्रीरामे यांनी जिल्हा परिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून आंदोलन केले.
या प्रकरणी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी अकराही जिल्हा परिषद सदस्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करून अटक केली. त्यानंतर सर्व सदस्यांची जामिनावर सुटका झाली होती.
पोलिसांनी या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. गेल्या पाच वर्षांपासून हा खटला सुरू होता. गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयाने प्रकरणाचा निकाल देत अकराही जिल्हा परिषद सदस्य निर्दोष असल्याचा निकाल दिला. (स्थानिक प्रतिनिधी)