जिल्हा कारागृहात हत्येचे १४०, चोरीचे १५७, बलात्काराचे ९२ कैदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:32 AM2021-08-19T04:32:00+5:302021-08-19T04:32:00+5:30
चंद्रपूर : चित्रपटसृष्टीतील कथानकाचे अनुकरण, वाढती बेरोजगारी, दारिद्र्य, झटपट पैसे कमविण्याच्या नादात आजची युवा पिढी गुन्हेगारीच्या विळख्यात अटकत आहे. ...
चंद्रपूर : चित्रपटसृष्टीतील कथानकाचे अनुकरण, वाढती बेरोजगारी, दारिद्र्य, झटपट पैसे कमविण्याच्या नादात आजची युवा पिढी गुन्हेगारीच्या विळख्यात अटकत आहे. जिल्हा कारागृहात दाखल असलेल्या एकूण ४९९ बंदिवानात हत्येचे १४०, चोरीचे १५७, बलात्काराचे ९२ बंदिवान आहेत. विशेष म्हणजे यामध्ये १८ ते ३० वयोगटातील सुमारे ७० टक्के बंदिवान आहेत. देशाचे भविष्य घडविणाऱ्या युवकांचे हात विविध गुन्ह्यांनी रंगले असल्याची चिंताजनक बाब आहे. जिल्ह्यातील बहुतांश उद्योग बंद आहेत. शासनाकडून नोकरभरतीसुद्धा बंद आहे. परिणामी बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच १ एप्रिल २०१५ पासून जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. त्यामुळे झटपट पैसे कमविण्याच्या नादात अनेकांनी अवैध दारू विक्रीच्या व्यवसायात उडी घेतली. त्यातच अनेकांकडून आम्लपदार्थाची तस्करीसुद्धा वाढली. अवैध दारूविक्रीच्या वादातून अनेक हत्येच्या घटनाही समोर आल्या. त्यामुळे सराईत गुन्हेगाराप्रमाणे नवखे गुन्हेगारही विविध गुन्ह्यात अडकू लागले. यासोबतच दुचाकी चोरी, घरफोडी, मोबाइल चोरीचे गुन्हेगार वाढत आहेत. कारागृहातून आरोपी बाहेर गेल्यानंतर एक सुजना नागरिक बनावा यासाठी कारागृहातर्फे समुपदेशन करण्यात येत असते. मात्र अनेकदा आरोपी बाहेर पडल्यानंतर त्याच्यात कुठलाच बदल न होता पुन्हा तो दुसऱ्या प्रकरणात आरोपी बनत असल्याचे वास्तव आहे.
बॉक्स
१८ ते ३० वयोगटातील सर्वाधिक बंदिवान
जिल्हा कारागृहात ४३८ व कोरोनामुळे तयार करण्यात आलेल्या टेम्पररी कारागृहात ६१ असे एकूण ४९९ बंदिवान जिल्हा कारागृहात आहेत. यामध्ये १८ ते ३० वयोगटातील ७० टक्के बंदिवान आहेत. त्यानंतर ३५ ते ४० वयोगटातील बंदिवान आहेत.
बॉक्स
२९ महिला बंदिवान
जिल्हा कारागृहात चोरी प्रकरणामध्ये १८, हत्येच्या प्रकरणात ७, आम्लपदार्थ तस्करी प्रकरणात चार महिला बंदिवान आहेत. बेरोजगारी, दारिद्र्य, अशिक्षितपणा आदीमुळे अनेकजण वाईट मार्गाला लागत असल्याचे कारागृहातील बंदिवानावरून दिसून येते.