९१ हजार शेतकरी : धान, कापूस, सोयाबीनची नुकसान भरपाई मिळणार

By admin | Published: September 19, 2016 12:48 AM2016-09-19T00:48:41+5:302016-09-19T00:48:41+5:30

यावर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९१ हजार २२५ शेतकऱ्यांनी सुमारे ७९ हजार २६४ हेक्टरमधील पिकांचा हा विमा काढला आहे.

9 1 thousand farmers: compensation for paddy, cotton and soybean | ९१ हजार शेतकरी : धान, कापूस, सोयाबीनची नुकसान भरपाई मिळणार

९१ हजार शेतकरी : धान, कापूस, सोयाबीनची नुकसान भरपाई मिळणार

Next

पीक विम्यापोटी भरला
६८५ कोटींचा हप्ता


चंद्रपूर : यावर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९१ हजार २२५ शेतकऱ्यांनी सुमारे ७९ हजार २६४ हेक्टरमधील पिकांचा हा विमा काढला आहे. त्यामध्ये शासनाने ६६९ कोटी ९८ लाख ८७ हजार ८७१ रुपये वाटा दिला असून शेतकऱ्यांनी १५ कोटी ७२ लाख ४९ हजार ९५९ रुपये विमा हप्ता भरला आहे. जिल्ह्यामध्ये धान, कापूस आणि सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याने प्रामुख्याने या पिकांचा विमा मोठ्या प्रमाणावर काढण्यात आला आहे.
जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येते. नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण देण्यात येते. या माध्यमातून कृषी क्षेत्रासाठी पत पुरवठ्यात सातत्य राखण्याचा प्रयत्न केला जातो. या योजनेत धान पिकाला ७० टक्के जोखीम स्तर धरण्यात येऊन हेक्टरी ३९ हजार रुपये विमा संरक्षण रक्कम मिळणार आहे. त्यामध्ये रिलायंस जनरल इन्शुरंस कंपनीला उंबरठा पातळीपर्यंत हेक्टरी २ हजार ६२८ रुपये विमा हप्ता द्यायचा होता. शेतकऱ्यांना ७८० रुपयांचा विमा हप्ता ठरविण्यात आला. तर केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने आपापल्या वाट्याचे प्रत्येकी ९२४ रुपये शेतकऱ्यांच्या वतीने कंपनीला दिले आहेत.
सोयाबीनमध्येदेखील ७० टक्के जोमीख स्तर ठेवण्यात आला आहे. तर ३६ हजार रुपये विमा संरक्षण रक्कम आहे. उंबरठा पातळीपर्यंत विमा हप्ता २ हजार ८८० रुपये आहे. त्यात शेतकऱ्यांकडून ७२० रुपये आणि केंद्र व राज्य शासनाने प्रत्येकी १०८० रुपये आपापला वाटा दिला आहे. कापूस पिकासाठीही ३६ हजार रुपये विमा संरक्षित रक्कम आहे. विमा हप्त्याची उंबरठा पातळीपर्यंत रक्कम २३४० रुपये आहे.
शेतकऱ्यांना कापूस विमा हप्ता म्हणून १८०० रुपये भरावे लागले. तर केंद्र व राज्य शासनाने प्रत्येकी २७० रुपयांचा आपापला वाटा भरला. तूर पिकाला २८ हजार रुपये विमा संरक्षित रक्कम ठरविण्यात आली आहे.
उंबरठा पातळीपर्यंत ४ हजार ७०४ रुपये विमा हप्ता भरण्यात आला. त्यात शेतकऱ्यांना हेक्टरी ५६० रुपये आणि केंद्र व राज्य शासनाने २ हजार ७२ रुपये भरले. (प्रतिनिधी)

जिल्ह्यात ९० हजार
कर्जदार शेतकरी
राज्याच्या इतर भागातील शेतकऱ्यांप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातही कर्जदार शेतकऱ्यांनी सुमारे ९९ टक्के संख्या आहे. पीक विमा काढणाऱ्या एकूण ९१ हजार २२५ शेतकऱ्यांपैकी सुमारे ९० हजार २८८ शेतकरी कर्जबाजारी आहेत. त्यांची खाती जिल्हा बँकेसह कोणत्या ना कोणत्या बॅकेत आहे. त्यामुळे विमा काढणारया या शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी ७८ हजार ४४९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचा विमा काढला आहे. तर कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांनी केवळ ८१५ हेक्टर क्षेत्रातील पीक विमा काढला आहे.

सर्वच तालुक्यात
धानाला विमा संरक्षण
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये धान पिकाला संरक्षण दिले आहेत. तर सोयाबीन पीक सिंदेवाही तालुका वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये अधिसूचित करण्यात आले आहे. तूर पीक ब्रह्मपुरी, नागभीड आणि सिंदेवाही तालुक्यात अधिसूचित करण्यात आलेले नाही. उर्वरित तालुक्यांमध्ये तुरीचा पीक विमा काढण्यात आला आहे. कापूस चंद्रपूर, गोंडपिंपरी, वरोरा, भद्रावती, चिमूर, राजुरा, कोरपना आणि जिवती तालुक्यात अधिसूचित करण्यात आला आहे. मूग व उडिद केवळ ब्रह्मपुरी तालुक्यात अधिसूचित करण्यात आले.

केंद्र-राज्य वाटा समान
या योजनेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा वाटा समान आहे. त्यानुसार जिल्ह्यात ९१ हजार २२५ शेतकऱ्यांनी १५ कोटी ७२ लाख ४९ हजार ९५९ रुपयांचा विमा हप्ता भरला आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी १५ कोटी ६३ लाख २७ हजार १३० रुपये आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ९ लाख २२ हजार ८२९ रुपये भरले आहेत. त्याच वेळी केंद्र व राज्य शासनाने ६६९ कोटी ९८ लाख ८७ हजार ८७१ रुपये भरले आहेत. कर्जदारांचे ६६५ कोटी ८६ लाख ८७ हजार ५९ रुपये आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे ४ कोटी १२ लाख ८१२ रुपये भरले आहेत.

Web Title: 9 1 thousand farmers: compensation for paddy, cotton and soybean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.