वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; मूल तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 17:09 IST2022-10-11T17:04:13+5:302022-10-11T17:09:03+5:30
चिरोली परिसरात दहशतीचे वातावरण

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; मूल तालुक्यातील घटना
मूल (चंद्रपूर) : शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना मंगळवारी (दि. ११) सकाळी ८ वाजेच्या दरम्यान चिरोली नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ७२० मध्ये घडली. येवनाथ विकरू चुनारकर (७५, रा. चिरोली) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
येवनाथ चुनारकर हे नेहमीप्रमाणे शेतात धान पिकाला पाणी करण्यासाठी सकाळी शेतात गेले असता दबा धरून असलेल्या वाघाने अचानक हल्ला करून ठार केले. ही घटना चिरोली नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ७२० मध्ये घडली. या घटनेची माहिती मिळताच चिचपल्ली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे, क्षेत्र सहायक मस्के, खनके, पडवे, घागारघुंडे, वनरक्षक राकेश गुरनुले, मरसकोले, रोघे, मानकर, शीतल व्यहाडकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला वनविभागमार्फत कुटुंबांना तत्काळ ३० हजारांची आर्थिक मदत देण्यात आली. वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याने चिरोली परिसरात दहशत पसरली आहे.