शेतकऱ्यांनी बजावली कंपनी प्रशासनाला नोटीस; ८७ शेतकऱ्यांना मिळाला नाही मोबदला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 14:31 IST2024-08-16T14:28:59+5:302024-08-16T14:31:45+5:30
Chandrapur : ओरिएंटल विमा कंपनीचे व्यवस्थापकासोबतच जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी आदींना बजावली नोटीस

Farmers issue notice to company administration; 87 farmers did not get compensation
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पंतप्रधान पीकविमा काढलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मागील खरीप हंगामाची नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ओरिएंटल विमा कंपनीचे व्यवस्थापक, केंद्रीय व राज्य कृषी विभाग सचिव, जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी आदींना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती अॅड. दीपक चटप यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत मागील हंगामात एक रुपयात विमा काढला होता. कंपन्यांना जाणार प्रीमियम हा जनतेच्या पैशातून शासन भरत असतो. मात्र, नुकसान झाल्यानंतर वेळेत विमा कवच मिळत नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
ओरिएंटल विमा कंपनीच्या जुलै २०२४ च्या पत्रानुसार विमा कंपन्यांनी पात्र ठरवलेल्या जिल्ह्यातील ८७ हजार ७४२ शेतकऱ्यांचे १३३ कोटी ९८ लाख ५६ हजार ३८६ रुपये अद्यापही मिळालेले नाही. विमा क्लेम करूनही कंपनीने पंचनामे न केलेल्या शेतकऱ्यांनाही १५ दिवसांच्या आत भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी गजानन लोडे, किशोर डुकरे, शब्बीर सय्यद, नरेश सातपुते, सुनीता शेंबाळे, परमेश्वर वारे, अविनाश डोहे, सत्यशीला हरबडे, वामन ढेंगळे, प्रभाकर कारेकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी कायदेशीर नोटीस बजावून केली आहे.
पिक विमा योजना
"चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे न करताच मदतीपासून अपात्र ठरविले. २०२३ पासून प्रतीक्षेत असणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली नाही तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करू."
-अॅड. दीपक चटप, उच्च न्यायालय, नागपूर