जिल्ह्यात दमदार पाऊस; इरई धरणाचे दरवाजे उघडले, चंद्रपूरकरांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2022 03:24 PM2022-07-12T15:24:08+5:302022-07-12T15:44:00+5:30

इरई धरणाचे पाणी वाढतच असल्याने दोन दरवाजे उघडले असून, प्रशासनाने चंद्रपूरकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Heavy rainfall in Chandrapur district; 2 gates of Irai dam opened | जिल्ह्यात दमदार पाऊस; इरई धरणाचे दरवाजे उघडले, चंद्रपूरकरांना सतर्कतेचा इशारा

जिल्ह्यात दमदार पाऊस; इरई धरणाचे दरवाजे उघडले, चंद्रपूरकरांना सतर्कतेचा इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देशेकडो हेक्टर पिके पाण्याखाली; रस्ते खचले, घरांच्या भिंती कोसळल्या

चंद्रपूर : जिल्ह्यात सलग चार दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने सर्व नदी-नाल्यांना पूर आला. चार जलाशये १०० टक्के भरले तर इरई धरणही तुडुंब भरण्याच्या मार्गावर आहे. सोमवारी दिवसभर झोडपल्याने कापूस, सोयाबीन, तूर, धान, भाजीपाला आदी पिके पुराच्या पाण्याखाली आहेत. अनेक गावांतील रस्ते खचले.

इरई धरणाचे पाणी वाढतच असल्याने दोन दरवाजे उघडले असून, प्रशासनाने चंद्रपूरकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणाच्या पुराच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर पिके कुजण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

कमलापूर, कोदेपूर घाटात झाडे कोसळली

जिवती तालुक्यातील परिसरातील नदी, नाले तुडुंब भरले आहेत. विद्यार्थ्यांना पावसात भिजतच शाळा गाठावी लागत आहे व शाळा सुटल्यावरही भिजतच घर गाठावे लागत आहे. अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले, तर सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. वणी-येल्लापूर मार्गावरील कमलापूर व जिवती-येल्लापूर मार्गातील कोदेपूरच्या घाटात झाडे कोसळ्ल्याने सकाळी येणारी बस घाटातूनच परत गेली. बापूराव दत्तराव गोरे (आनंदगुडा) भोक्सापूर, संजय राठोड, वामन राठोड, उत्तम चव्हाण, किसन नामदेव राठोड, विठ्ठल पवार, उत्तम राठोड सेवादासनगर, किर्लोस राजाराम गायकवाड, येल्लापूर यासह पिट्टीगुडा, नंदप्पा, लांबोरी, जिवती, टेकामांडवा, हिमायतनगर, शेणगाव, माराईपाटण, रोडगुडा येथील कापूस, सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. नदीपुलावरून पाणी वाहत असल्यास पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नयेे़, असे आवाहन तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे तालुका प्राधिकरण अधिकारी तथा तहसीलदारांनी केले आहे.

डोलारातील १४ कुटुंबांना शाळेत हलविले

भद्रावती : मुसळधार पावसामुळे डोलारा तलावातील पाण्याची पातळी ओलांडून प्रभागातील शिरल्याने १४ कुटुंबांना जिल्हा परिषद शाळा घुटकाळा येथे स्थलांतरित करण्यात आले. तलावाचे पाणी घरात शिरून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले. पावसाळ्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, याबाबत झोपडपट्टी विकास संघटनेचे अध्यक्ष राहुल सोनटक्के यांनी महिनाभरापूर्वीच तहसीलदार यांना निवेदन देऊन प्रभागात उपाययोजना करण्याबाबत मागणी केली होती. परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ही वेळ आली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. घटनास्थळी आमदार प्रतिभा धानोरकर, तहसीलदार सोनवणे तसेच प्रशासकीय अधिकारी यांनी भेट दिली.

मारोड्याला बेटाचे स्वरूप

मारोडा परिसरात तीन दिवस सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने सोमवारी मारोड्याला पुराचा तडाखा बसला. गावाला काही तास बेटाचे स्वरूप आले होते. रहदारी बंद झाली होती. उमा नदीचे पाणी पिकांत शिरले. याचा जोरदार फटका धानाच्या पऱ्यांना बसला. अति पावसाने धान्याच्या बांध्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. मुसळधार पावसाने परिसराला झोडपले. शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान. पूर उरताच महसूल अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून शासकीय मदत देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

Web Title: Heavy rainfall in Chandrapur district; 2 gates of Irai dam opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.