रोजगाराअभावी शेकडो मजुरांचे आंध्र व तेलंगणात स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 14:13 IST2024-12-28T14:11:20+5:302024-12-28T14:13:16+5:30
रोजगार हमी योजनेची कामे ठप्प : मिरची तोडण्यासाठी मजुरांना मागणी

Hundreds of laborers migrate to Andhra and Telangana due to lack of employment
शशिकांत गणवीर
लोकमत न्यूज नेटवर्क
भेजगाव : मूल तालुक्यातील शेतीचा हंगाम संपुष्टात आल्याने शेतमजुरांच्या हाताला कामाची गरज आहे. मात्र, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू नसल्याने मजुरांना रोजगाराच्या शोधार्थ आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यात स्थलांतर करावे लागत आहे.
मूल तालुका धान उत्पादक म्हणून ओळखला जातो. शेती हंगाम संपल्यावर मजुरांच्या हाताला काम नाही. तालुक्यात रोजगाराचे दुसरे साधन नाही. त्यामुळे मजूर रोजगारासाठी परराज्यांत जाणे पसंत करीत आहेत. लगतच्या आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यात मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र, त्या प्रमाणात तिथे मजूर मिळत नाहीत, महाराष्ट्रातील मजूर मोठ्या प्रमाणावर मिरची तोडण्यासाठी स्थलांतरित होत आहेत. सुमारास तीन-चार महिन्यांसाठी मजूर परराज्यांत स्थलांतरित होतात. राज्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बहुतांश अधिकारी व व्यस्त होते. परिणामी, रोजगार हमी योजनेच्या कामांना प्रशासकीय मान्यतेला विलंब झाला. कामांचा कार्यारंभ आदेश जारी झाला नाही. रोजगार हमी योजनेची कामे तालुक्यात सध्या कुठेही सुरू नाहीत.
मागील वर्षी अशी झाली कामे
मूल पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतच्या वतीने तालुक्यात ४५ गावांमध्ये कामे सुरू आहेत. यात हळदी, भेजगाव, चांदापूर, फिस्कुटी, मारोडा, नांदगाव, गोवर्धन, डोंगरगाव, जाणाळा, भगवानपूर, चिरोली आदी गावांत अमृतसरोवर, मामा तलाव, नाला खोलीकरण, वृक्ष लागवड, गुरांचा गोठा, पांदण रस्ता तर चिचाळा, सुशी, खालवसपेट, मरेगाव आदी गावांत क्रीडांगणाच्या कामावर मजुरांना रोजगार मिळाला आहे.
सरकारच्या धोरणामुळे बेरोजगारीचे संकट
कामेच सुरू झाले नसल्याने गावातील मजूर कामाच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारच्या धोरणामुळे बेरोजगारीचे संकट निर्माण झाले. रोजगार हमी योजनेच्या कामांनी मजुरांना मोठा आधार मिळतो. यामुळे गावात राहून रोजगार उपलब्ध होत असल्याने मजूरही समाधान व्यक्त करतात. असे असताना कामे सुरूच झाले नसल्याने मजुरांवर बेरोजगारीचे सावट कायम आहे.