पुतळा स्वच्छतेसाठी पैसे नसेल तर आम्ही देऊ
By admin | Published: January 14, 2016 01:28 AM2016-01-14T01:28:02+5:302016-01-14T01:28:02+5:30
ज्या मा.सा. कमन्नमवार यांनी चंद्रपूरचे नाव महाराष्ट्रात मोठे केले, त्या नेत्याच्या पुतळ्याची अवहेलना बरी नव्हे.
अवहेलना टाळा : शांताराम पोटदुखे यांचे आवाहन
चंद्रपूर : ज्या मा.सा. कमन्नमवार यांनी चंद्रपूरचे नाव महाराष्ट्रात मोठे केले, त्या नेत्याच्या पुतळ्याची अवहेलना बरी नव्हे. पुतळा स्वच्छ करण्यासाठी महानगर पालिकेकडे पैसा नसेल तर आम्ही देऊ, पण ही अवहेलना थांबवा, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांनी केले आहे.
शांताराम पोटदुखे हे अध्यक्ष असलेल्या लोकसेवा आणि विकास संस्थेच्या वतीने १६ जानेवारीला पुरस्कार दिले जात आहेत. यात कर्मवीर कन्नमवार पुरस्काराचाही समावेश आहे. एकीकडे कन्नमवार यांच्या नावाने पुरस्कार दिले जात असताना त्याच शहरातील कन्नमवारांचा पुतळा मात्र कचऱ्यात उभा असणे, हा विरोधाभास आहे.
‘लोकमत’मध्ये मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या वृत्ताची दखल घेऊन शांताराम पोटदुखे यांनी आपली संवेदना आणि कळकळ व्यक्त केली. ते म्हणाले, हा पुतळा कुणी उभारला आणि कुणी स्वच्छ करावा हा वाद निरर्थक आहे. पुतळा जिल्हा परिषदेने उभारला असला तरी शहरातील पुतळ्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी महानगर पालिकेची असते.
या पुतळ्याच्या हस्तांतरणाची प्रक्रिया झाली अथवा नाही हे आपणास माहीत नाही, मात्र मनपा आपली जबाबदारी टाळू शकत नाही. त्यांच्याकडे पुतळा स्वच्छ करण्यासाठी माणसे आणि पैसा नसेल तर त्यांनी सांगावे, त्यासाठी आम्ही पैसा देऊ, असेही ते म्हणाले.