नाला डायवरशनमुळे ३५० एकर शेतीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:31 AM2021-08-20T04:31:54+5:302021-08-20T04:31:54+5:30
राजुरा : राजुरा तालुक्यातील गोवरी, चिंचोली, माथरा या गावांजवळून वाहणाऱ्या ओढ्यांचे नैसर्गिक प्रवाह बदलून त्यांना एकाच ओढ्यात प्रवाहित ...
राजुरा : राजुरा तालुक्यातील गोवरी, चिंचोली, माथरा या गावांजवळून वाहणाऱ्या ओढ्यांचे नैसर्गिक प्रवाह बदलून त्यांना एकाच ओढ्यात प्रवाहित केल्याने आणि खाणीभोवती माती टाकून उंच भाग केल्याने या नाल्यातील संपूर्ण पाणी शेतकऱ्यांच्या शेतात येऊन सुमारे ३५० एकर शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र आश्वासन देऊनही वेकोलिने कसलीही नुकसानभरपाई दिली नाही. ओढा डायवरशन करताना वेकोलिने कायदाभंग केला असून, वेकोलिच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी गोवरी, पोवनी व माथरा येथील आपद्ग्रस्त शेतकऱ्यांनी पत्रपरिषदेत केली.
या शेतकऱ्यांनी राजुरा तहसीलदार यांना निवेदन देऊन या भागातील चार मोठ्या ओढ्यांचे वळणीकरण करताना वेकोलिने कायदयातील तरतुदीचे उल्लंघन करून खोदकाम केले, असा आरोप केला आहे. गोवरी, पोवनी, साखरी, चिंचोली या गावांच्या परिसरात वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणी आहेत. या खाण परिसरात अनेक नाले आहेत. वेकोलिने यापूर्वी दोन ओढ्यांचे खोदकाम करून नैसर्गिकपणे वाहणाऱ्या नाल्यांना कृत्रिमपणे गोवरी ओढ्याला जोडले. यामुळे पाण्याचा प्रवाह बदलून बॅकवॉटरचा फटका गोवरी व परिसरातील गावांना व शेतीला बसत आहे. २२ व २३ जुलैला गोवरी गावातील अनेक घरांत पाणी घुसून गावकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. तसेच गोवरी परिसरातील शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली येऊन शेतपिकाचेसुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली. मात्र वेकोलिकडून नुकसानभरपाई देण्यात आली नाही.
पत्रकार परिषदेला ॲड. मारोती कुरवटकर आणि गोवरी येथील शंकर बोढे, सुधाकर पाचभाई, किशोर लोहे, रूपेश पाचभाई, अरुण पाचभाई, विलास लोहे, सुधाकर ढुमने, श्रीरंग उरकुडे, गुरुदास अहीरकर, लहू चहारे, सुनील पाचभाई, पंढरी बोढे व शेतकरी उपस्थित होते.
190821\img-20210818-wa0241.jpg
फोटो