चंद्रपुरात भाजप-ठाकरेंची युती; दानवे म्हणाले, परवानगीशिवाय निर्णय; जिल्हाप्रमुखांनी घेतले वरुण सरदेसाईंचे नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 14:17 IST2026-02-10T14:13:30+5:302026-02-10T14:17:51+5:30
ठाकरे गटाच्या पाठिंब्यामुळे चंद्रपूर महापालिकेवर भाजपचा झेंडा; वडेट्टीवार-धानोरकर वादात काँग्रेसने सत्ता गमावली

चंद्रपुरात भाजप-ठाकरेंची युती; दानवे म्हणाले, परवानगीशिवाय निर्णय; जिल्हाप्रमुखांनी घेतले वरुण सरदेसाईंचे नाव
Chandrapur Mayor: चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत मंगळवारी जो ट्विस्ट पाहायला मिळाला, त्याने सर्वांचाच धक्का बसला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ६ नगरसेवकांनी पक्षादेश झुगारून भाजपला साथ दिल्याने चंद्रपूर महापालिकेत अखेर कमळ फुलले आहे. भाजपच्या संगीता खांडेकर अवघ्या एका मताच्या फरकाने महापौर पदी निवडून आल्या, तर उपमहापौर पदासाठी झालेल्या ईश्वरचिठ्ठीच्या खेळात ठाकरे गटाच्या प्रशांत दानव यांनी बाजी मारली. मात्र भाजपसोबत गेल्याने ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे.
भाजपचा एका मताने विजय; काँग्रेसला मोठा झटका
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता येईल असे चित्र असतानाच भाजपने पडद्यामागून हालचाली करत चमत्कार घडवला. महापौर पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर यांना विजयासाठी आवश्यक असणारी मते मिळाली. त्यांना ठाकरे गटाच्या ६ नगरसेवकांनी पाठिंबा दिला, ज्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
ईश्वरचिठ्ठीने उपमहापौर निवडला
उपमहापौर पदाची निवडणूक अत्यंत नाट्यमय झाली. काँग्रेसचे मित्रपक्ष असलेले पप्पू देशमुख आणि ठाकरे गटाचे प्रशांत दानव यांना समसमान ३२-३२ मते मिळाली. अखेर ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली आणि नशिबाने प्रशांत दानव यांना साथ दिली. महत्त्वाचे म्हणजे, दानव यांनी आज सकाळीच ठाकरे गटात अधिकृत प्रवेश केला होता आणि दुपारी ते उपमहापौर बनले.
ठाकरे गटात फूट? अंबादास दानवे विरुद्ध जिल्हाप्रमुख
या संपूर्ण राजकीय घडामोडीनंतर ठाकरे गटातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. "हा निर्णय पक्षाच्या परवानगीशिवाय घेण्यात आला आहे. भाजपसोबत जाण्याची पक्षाची भूमिका मुळीच नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी असा निर्णय का घेतला, याची चौकशी करून पक्ष पाऊल उचलेल," अशी संतप्त पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.
जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांचे स्पष्टीकरण
दुसरीकडे, जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी थेट वडेट्टीवार-धानोरकर वादावर बोट ठेवले. "अंबादास दानवेंपर्यंत माहिती व्यवस्थित पोहोचवली नाही, त्यांना आता माहिती देणार आहोत. या सगळ्या संदर्भात मी वरुण सरदेसाई यांच्या संपर्कात होतो. उद्धव ठाकरे यांनाही सर्व माहिती दिली आहे. त्यांनी पक्ष एकसंध राहायला हवा यासाठी तो योग्य निर्णय वाटेल तो घ्या असं सांगितले, अशी माहिती ठाकरे गटाचे चंद्रपूरमधील जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी दिली
"सकाळपर्यंत त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका नव्हती. विजय वडेट्टीवार यांना आम्ही सोबत घेण्यासाठी विनंती करत होतो. वडेट्टीवार सकारात्मक असूनही धानोरकर यांनी नकार दिला आणि आमची गरज नाही असं सांगितले. त्यामुळे आम्हाला ही भूमिका घ्यावी लागली. मला माझ्या पक्षप्रमुखांवर विश्वास आहे. मी मशालसोबत कायम राहणार आहे. माझी काही चूक झाली असेल तर उद्धव ठाकरे माफ करतील," असाही विश्वास गिऱ्हे यांनी व्यक्त केला.