दुकानदारांच्या वजनात घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 09:55 PM2018-09-02T21:55:26+5:302018-09-02T21:56:04+5:30

आधीच महागाई गगनाला भिडत आहे. सर्वसामान्य नागरिक या महागाईमुळे भरडले जात आहेत. असे असतानाच आता दुकानदारांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे. वजनात घोळ केली जात असून अनेक ठिकाणी वजनाच्या नावाखाली दगड, लोखंडाचा वापर केला जात असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळून आले. मात्र पॅकिंगमध्ये असलेले खाद्य पदार्थ व इतर वस्तू एमआरपी दरानेच विकले जात असल्याचेही लोकमतच्या पाहणीत आढळून आले.

Shoppers' weight loss | दुकानदारांच्या वजनात घोळ

दुकानदारांच्या वजनात घोळ

Next
ठळक मुद्देग्राहकांची लूट : पॅकिंग वस्तू मात्र एमआरपी दरानेच

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आधीच महागाई गगनाला भिडत आहे. सर्वसामान्य नागरिक या महागाईमुळे भरडले जात आहेत. असे असतानाच आता दुकानदारांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे. वजनात घोळ केली जात असून अनेक ठिकाणी वजनाच्या नावाखाली दगड, लोखंडाचा वापर केला जात असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळून आले. मात्र पॅकिंगमध्ये असलेले खाद्य पदार्थ व इतर वस्तू एमआरपी दरानेच विकले जात असल्याचेही लोकमतच्या पाहणीत आढळून आले.
चंद्रपुरात एमआरपीपेक्षा जास्त दराने अनेक खाद्य पदार्थ, वस्तू यांची विक्री होते का, याबाबत लोकमतने शनिवारी बाजारपेठेत जाऊन पाहणी केली. विविध दुकानात जाऊन पॅकींगमध्ये असलेले खाद्य पदार्थ व साबणाची खरेदी केली. यावेळी दुकानदारांनी एमआरपी किंमतच घेतली.
मात्र बाजारपेठेत फिरताना आणखी एक धक्कादायक प्रकार लक्षात आला. तांदूळ, साखर, गहू व इतर किराणा वस्तू मोजून देताना काही दुकानात इलेक्ट्रानिक तराजूचा वापर होताना दिसला. तर काही ठिकाणी वजनमापे ठेवलेल्या साध्या तराजूचा वापर होत असल्याचेही दिसून आले.
विशेष म्हणजे, अनेक दुकानातील वजनांचे पासींगच केले नसल्याचे आढळून आले. अनेक दुकानात वर्षानुवर्षापासून तेच ते एक किलो, दोन किलो, पाच किलो, दहा किलोचे वजन वापरले जात आहे. बदाम, काजू, खसखस यासारख्या महागड्या वस्तू ग्रॅमनेच खरेदी केल्या जातात. मात्र काही ठिकाणी ग्रॅमच्या वजनाऐवजी एक रुपया, पाच रुपयांची नाणी वापरली जात आहे. काही दुकानात तर केवळ लोखंडच तराजूमध्ये ठेवले जाते व त्यानेच मोजून वस्तू दिली जाते.
भाजी विक्रेत्यांकडूनही लूट
प्रस्तुत प्रतिनिधीने भाजीमार्केटमध्ये फेरफटका मारला असता या ठिकाणी तर अंदाजानेच भाजीपाला विकला जात असल्याचे दिसून आले. काही भाजीविक्रेते भाजीपाला मोजून देतात. मात्र अनेकांकडे अधिकृत वजनाऐवजी दगड, लोखंड यांचा वापर केला जात असल्याचे दिसून आले.एका ठिकाणी ३० रुपये किलो याप्रमाणे टमाटर असेल तर तेच टमाटर काही फुटांवर असलेल्या दुसऱ्या भाजीविक्रेत्यांकडे २० रुपये प्रमाणे विकले जाते. तेथीलच भाजीविक्रेत्याला याबाबत विचारले असता वजनात घोळ करून कमी किमतीत टमाटर विकले जात असल्याचे सांगितमले.
वजनांची पासिंग नाही
दरवर्षी दुकानदारांकडे असलेल्या वजनांची पासींग होणे अपेक्षित आहे. मात्र संबंधित विभागाकडून दुकानदारांकडील वजनाची पासींगच केली जात नाही. वर्षानुवर्ष एकच वजन दुकानदार वापरत असल्याचे दिसते. त्यामुळे ग्राहक भरडला जात आहे.
दरात मोठी तफावत
तांदूळ, दाळ, गहू, साखर व इतर वस्तूंच्या दराविषयी काही दुकानात माहिती घेतली असता त्यात मोठी तफावत दिसून आली. प्रत्येक वस्तूची किंमत विविध दुकानांमध्ये वेगवेगळी असल्याचे दिसून आले. याबाबत एका किराणा दुकानदाराला विचारले असता त्याने वस्तूच्या क्वालिटीमुळे ही तफावत असल्याचे सांगितले. मात्र वजनातही घोळ असण्याची शक्यता यात आहे.

Web Title: Shoppers' weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.