रिंगणात उरले २३ उमेदवार
By Admin | Published: June 7, 2014 12:31 AM2014-06-07T00:31:22+5:302014-06-07T00:31:22+5:30
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत एकूण १३ जणांनी माघार घेतली आहे.
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत एकूण १३ जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आता २३ उमेदवार उरले आहेत. उमेदवारांची संख्या जास्त असली तरी काँग्रेस आघाडीचे सतीश चव्हाण आणि युतीचे शिरीष बोराळकर या दोघांमध्येच सरळ लढत होण्याची शक्यता आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात येत्या २० जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण ४२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत यापैकी ६ जणांचे अर्ज बाद झाले. त्यानंतर ३६ अर्ज उरले होते. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत यातील १३ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी ३ वाजता संपली. या मुदतीनंतर एकूण २३ उमेदवार रिंगणात उरले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे शिरीष बोराळकर, इंडियन युनियन मुस्लिम लीगचे अल्ताफ अहमद एकबाल अहमद, आॅल इंडिया मजलिसे इत्तेहादूल मुसलिमीनचे मुशताख अहमद खान दाऊद खान तसेच अपक्ष म्हणून प्रा. शंकर अंभोरे, विलास जाधव, रामराव दाभाडे, नानासाहेब दांडगे, पांडुरंग नरवडे, गणेश बजगुडे, उद्धव बनसोडे, जगजीवनराव भेदे, काकासाहेब मोरे, डॉ. यशवंत होवाळ, रुपेश राजेमाने, रतन वाघ, वाजीद अन्वर अब्दुल रशीद, सय्यद शमीम रजवी, डॉ. शंकर सुरवसे, सखाराम खुरपे, सय्यद सामेयुद्दीन, संतोष लोखंडे यांचा समावेश आहे.
विभागात १० हजार मतदार वाढले
निवडणूक जाहीर झाल्यानंतरही आयोगाने विभागात ३ जूनपर्यंत पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याची मोहीम राबविली. या मोहिमेमुळे विभागात १० हजार ७२४ मतदारांची भर पडली आहे. विभागात याआधी ३ लाख ६८ हजार ३७५ मतदार होते. आता ही संख्या ३ लाख ७९ हजार १०९ झाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ४ हजार ८६६ मतदार वाढले आहेत. जालना जिल्ह्यात ४०५, बीड जिल्ह्यात २२१६, परभणी जिल्ह्यात ४१६, हिंगोली जिल्ह्यात १६८, नांदेड जिल्ह्यात १४९४, उस्मानाबाद जिल्ह्यात ७९३ आणि लातूर जिल्ह्यात ४५६ मतदारांची भर पडली आहे.