अन्नदाता शेतकरी संघटना ‘बीआरएस’मध्ये विलीन; जोशी-शेट्टी यांच्या संघटनांसमोरही आव्हान?
By स. सो. खंडाळकर | Published: April 21, 2023 11:53 AM2023-04-21T11:53:38+5:302023-04-21T11:54:59+5:30
छत्रपती संभाजीनगरात २४ एप्रिलची सभा जबिंदा लॉन्सवर : महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते येणार, बीआरएसची २८८ जागांची तयारी
छत्रपती संभाजीनगर : अन्नदाता शेतकरी संघटना बुधवारी हैदराबादेत के. चंद्रशेखर राव यांच्या ‘बीआरएस’ पक्षात विलीन झाली. शिवाय शरद जोशी व राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनांसमोरही ‘बीआरएस’ने मोठे आव्हान उभे केले असून, विदर्भ व नाशिक भागातील या संघटनांचे कार्यकर्ते ‘बीआरएस’मध्ये प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. काहींनी प्रवेशही केला असल्याचे समजते.
२४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता जबिंदा लॉन्सवर के. चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा होत आहे. या सभेत मोठ्या प्रमाणावर प्रवेश अपेक्षित आहेत; तसेच सभेसाठी महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने आणले जाण्याची शक्यता आहे. ही सभा कशी होते, त्यात किती शक्तिप्रदर्शन घडते, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहेच. के. चंद्रशेखर राव यांचा तेलंगणा शेतकरी पॅटर्न महाराष्ट्रात किती यशस्वी होतो, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून ‘बीआरएस’ने हालचाली वाढविल्या असून, २८८ जागा लढविण्याची तयारी सुरू करण्यात आली असल्याचे वरिष्ठ सूत्राने सांगितले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ‘बीआरएस’ची वाट धरली आहे. आता अन्नदाता शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा जयाजी सूर्यवंशी यांनी हैदराबादमध्ये के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत ‘बीआरएस’मध्ये प्रवेश घेतला. यावेळी माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे उपस्थित होते. आम्ही आमची संपूर्ण संघटना ‘बीआरएस’मध्ये विलीन केली असल्याचे जयाजी सूर्यवंशी यांनी सांगितले. तेलंगणात शेतकऱ्यांना चोवीस तास वीज व पाणी मोफत मिळते. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणही शून्य टक्के आहे. २४ एप्रिल रोजीच्या जाहीर सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. आमखास मैदानावर होणारी ही सभा आता जबिंदा लॉन्सवर होणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यावरून स्थळ बदलण्यात आले आहे.