नियोजनासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
By Admin | Published: March 20, 2016 12:40 AM2016-03-20T00:40:36+5:302016-03-20T00:49:59+5:30
लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेवर नियोजन आणि देखरेख करण्यासाठी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी
लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेवर नियोजन आणि देखरेख करण्यासाठी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी तीन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या शनिवारी नियुक्त्या केल्या आहेत़ उपजिल्हाधिकारी कमलाकर फड, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रकाश खपले, उपविभागीय अधिकारी प्रताप काळे हे नियुक्त करण्यात आले आहेत़
लातूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी महापालिकेच्या बरोबरीने नियोजन करून त्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी या तिघांवर सोपविण्यात आली आहे़ शनिवारी निघालेल्या आदेशाने लातूरच्या पाणी पुरवठ्यात प्रशासकीय अधिकारी आले आहेत़ प्रत्यक्ष पाणी वाटपाच्या नियोजनात वर्ग एकचे अधिकारी एखाद्या शहराच्या नियोजनात सक्रीय होण्याची बहुदा राज्यातील ही पहिलीच घटना आहे़ महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला टंचाईच्या काळात पाणी वाटपाचे नियोजन पेलत नसल्याने गोंधळ निर्माण होत आहे़ किती पाणी आले, किती गेले, प्रत्यक्षात गरज किती पाण्याची याचे गणितही मनपा कर्मचाऱ्यांना कळत नसल्याने शहराच्या पाणी वाटपाच्या नियोजनात जिल्हा प्रशासनाने अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे़ त्यामुळे लातूरकरांना आता वेळेत पाणी मिळवून देण्यासाठी या अधिकाऱ्यांसह एमजेपीचे कर्मचारीही आले आहेत़ मनपाच्या विभाग प्रमुखांना प्रभाग वाटपाची जबाबदारी आहे़ काही अभियंत्यांकडे शहरातील पाण्याच्या टाकीतून टँकर वाटपाचे नियोजन आहे़ प्रत्येक कुटुंबाला किमान २०० लिटर्स पाणी ६ ते ८ दिवसांनी पोहचविण्याचा प्रयत्न हे नवीन नियुक्त करण्यात आलेले अधिकारी करतील, असे सूत्रांनी सांगितले़ डोंगरगाव, भंडारवाडी, माकणी, साई येथून पाणी संकलित केले जात असले तरी वाटपाचे नियोजन विस्कटले आहे़