भूमिगत केबल टाकण्यासाठी जूनपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 20:35 IST2019-04-10T20:33:55+5:302019-04-10T20:35:31+5:30
यापूर्वीही या योजनेला एकदा मुदतवाढ देण्यात आलेली होती.

भूमिगत केबल टाकण्यासाठी जूनपर्यंत मुदतवाढ
- विजय सरवदे
औरंगाबाद : भूमिगत केबलच्या कामाची मुदत उलटून गेली तरीही एकात्मिक विद्युत विकास योजनेंतर्गत (आयपीडीएस) शहरातील विद्युत यंत्रणेच्या सक्षमीकरणाची बरीच कामे अजूनही अपूर्णच आहेत. त्यामुळे कामे पूर्ण करण्यासाठी या योजनेला जूनअखेरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वीही या योजनेला एकदा मुदतवाढ देण्यात आलेली होती.
शहरात भूमिगत केबल, उपकेंद्रांची उभारणी व अन्य कामांसाठी ‘आयपीडीएस’ योजनेला केंद्रांकडून ९९ कोटींचा निधी मिळाला आहे. सन २०१७ पासून योजनेची कामे सुरू झाली; परंतु नोव्हेंबर २०१८ मध्ये महानगरपालिकेने भूमिगत केबलचे काम थांबवले. त्यानंतर महावितरण व महानगरपालिकेत करार झाला. खोदलेले रस्ते महावितरणच दुरुस्त करून देईल, असे निश्चित झाले. त्यानंतर महावितरणने महानगरपालिकेला प्रस्तावित कामाच्या ठिकाणांचे गुगल मॅप्सवर आधारित नकाशे दिले. महानगरपालिका व महावितरणने त्याचे संयुक्त सर्वेक्षण केले. ३३ केव्ही वाहिनीचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, ११ केव्ही वाहिनीचे सर्वेक्षण अद्याप पूर्ण झालेले नाही. दरम्यानच्या काळात ३३ केव्ही भूमिगत वाहिनीच्या प्रस्तावित २४ किमी कामापैकी अवघे ९ किमी, तर ११ केव्हीचे भूमिगत वाहिनीच्या ५६.५८ किमीपैकी अवघे २०.१ किमी काम पूर्ण झाले आहे. भूमिगत लघुदाब वाहिनीचे प्रस्तावित १६.३७ किमी कामापैकी १२.४३ किमी काम पूर्ण झाले आहे. या योजनेंतर्गत दोन कंत्राटदार संस्थांमार्फत शहरात कामे सुरू आहेत.
५८ किमी अंतराची एरिअल बंच केबल कार्यान्वित
वीजगळती रोखण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी शहरातील विविध भागांत खांबांवर विजेच्या तारांऐवजी एरिअल बंच केबल टाकल्या जाणार आहेत. आतापर्यंत जवळपास १८० किमी एरिअल बंच केबलपैकी शहराच्या विविध भागांत ५८ किमी एवढ्या अंतरावर एरिअल बंच कार्यान्वित करण्यात आली आहेत. यामध्ये मुकुंदवाडी, विमानतळ परिसर, सिडको आविष्कार कॉलनी, एन-९, एन-१२, संस्थान गणपती परिसर, मीनाबाजार शहागंज, हर्सूल, बेगमपुरा, पुष्पनगरी, शक्तीनगर, गणेश कॉलनी, दिलरस कॉलनी, मजनू हिल, एसटी कॉलनी, रहेमानिया कॉलनी, किराडपुरा, रोशनगेट, कैसर कॉलनी, किलेअर्क, हर्षनगर, चेलीपुरा, भवानीनगर, बनेवाडी, छावणी, नागसेननगर, शिवाजीनगर, विशालनगर, बाळकृष्णनगर , हनुमाननगर, अरिहंतनगर, नेहरूनगर आदी परिसरात एरिअल बंच केबलद्वारे वीजपुरवठा करण्यात येत आहे.
३३ केव्हीच्या ६ उपकेंद्रांचा समावेश
‘आयपीडीएस’ योजनेंतर्गत शहरात प्रामुख्याने ३३ केव्हीची ६ उपकेंद्रे समाविष्ट आहेत. त्यात बेडसे पेपर मिल (चिकलठाणा एमआयडीसी)जवळ फेब्रुवारी महिन्यातच कार्यान्वित झाले आहे. समाधान कॉलनीमध्ये उपकेंद्र पूर्ण झाले असून, तेथे ३३ केव्ही भूमिगत वाहिनीचे काम अपूर्ण आहे. एम-४, गोलवाडी, वाळूज येथे या महिन्याच्या अखेरीस उपकेंद्रांची कामे पूर्ण होतील. याशिवाय दूध डेअरी, एन-१० व एसटीपीआय उपकेंद्रांची कामे प्रगतिपथावर आहेत.४रोशनगेट, सिडको एन-७, सातारा व पन्नालालनगर या उपकेंद्रांची पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता ५ एमव्हीएवरून १० एमव्हीएपर्यंत वाढविण्यात आली आहे. हिमायतबाग उपकेंद्रात अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला असून, वाळूजच्या एम सेक्टर उपकेंद्रात अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहे.