औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 

By श्रीकृष्ण अंकुश | Published: May 11, 2024 03:17 PM2024-05-11T15:17:16+5:302024-05-11T15:28:00+5:30

2019 च्या निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. हा निकाल आश्चर्याचा आणि चर्चेचा विषय ठरला होता. तेव्हा वंचित बहुजन अघाडी इम्तियाज जलील यांच्या पाठीशी होती आणि हर्षवर्धन जाधव यांनी मिळवलेल्या मतांचाही त्यांना अप्रत्यक्ष फायदा झाला होता. यावेळीही औरंगाबादच्या निकालात मतविभाजनाची भूमिका महत्त्वाची राहणार का आणि ती कुणाच्या फायद्याची ठरणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

lok sabha election 2024 In Aurangabad the result was divided by vote; This time 'mathematics' is different, who will win chandrakant khaire sandipan bhumre imtiaz jaleel | औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 

औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 

श्रीकृष्ण अंकुश -

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघांतील लढतींबद्दल राज्यभरात उत्सुकता आहे, त्यातलाच एक मतदारसंघ म्हणजे औरंगाबाद. (जिल्ह्याचं नामकरण छत्रपती संभाजीनगर झालं असलं, तरी मतदारसंघाचं नाव अद्याप बदललेलं नाही) हा मतदारसंघ शिवसेना-भाजपा युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून चंद्रकांत खैरे येथून सलग चार वेळा निवडून आले होते. त्याआधी दोन वेळा ते आमदारही होते. मात्र, 2019 च्या निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी त्यांचा पराभव केला होता. हा निकाल आश्चर्याचा आणि चर्चेचा विषय ठरला होता. जवळपास साडेचार हजार मतांनी खैरे पराभूत झाले होते, त्याची दोन प्रमुख कारणं होती. तेव्हा वंचित बहुजन अघाडी इम्तियाज जलील यांच्या पाठीशी होती आणि हर्षवर्धन जाधव यांनी मिळवलेल्या मतांचा त्यांना अप्रत्यक्ष फायदा झाला होता. यावेळीही औरंगाबादच्या निकालात मतविभाजनाची भूमिका महत्त्वाची राहणार का आणि ती कुणाच्या फायद्याची ठरणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

यावेळी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाच्या आखाड्यात पहिल्यांदाच दोन शिवसेना समोरासमोर आहेत. एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, जो महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहे. तर दुसरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, जो महायुतीतील घटकपक्ष आहे. येथे महाविकास आघाडीकडून शिवसेनेने (ठाकरे गट) चंद्रकांत खैरे यांना, तर महायुतीकडून शिवसेनेने (शिंदे गट) पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांना मैदानात उतरवले आहे. याशिवाय, ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एआयएमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील आणि वंचित बहुजन आघाडीकडून अफसर खान हे चेहरेही मैदानात आहेत. तसेच, हर्षवर्धन जाधव यावेळीही अपक्ष म्हणून मैदानात आहेत. याशिवाय इतरही काही नेते या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. मात्र मुख्य लढत शिवसेना VS शिवसेना VS एआयएमआयएम अशीच मानली जात आहे.

अशी आहे मतदारसंघांची रचना - 
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात, औरंगाबाद पूर्व, गंगापूर, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, वैजापूर आणि कन्नड असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी औरंगाबाद पूर्व आणि गंगापूरमध्ये भाजप, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम आणि वैजापूरमध्ये शिवसेना (शिंदे) तर कन्नडमध्ये शिवसेना (ठाकरे) पक्षांचे आमदार आहेत. 

शिवसेना आमदारांची मेहनत ठरणार महत्वाची - 
आता यापैकी शिवसेना आमदारांना विधानसभा निवडणुकीत मिळालेली मते लोकसभा निवडणुकीत कशा प्रकारे फिरतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे (या प्रत्येक आमदाराला गेल्या विधानसभा निवडणुकीत साधारणपणे 80 हजारहून अधिक मते मिळालेली आहेत.). कारण, शिवसेनेतील फुटीचा परिणाम येथेही अगदी स्थानिक पातळीपर्यंत झाला आहे. शिवसेनेच्या विभाजनापूर्वी जे शिवसैनिक पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन सोबतीने फिरत होते, ते आता एकमेकांच्या विरोधात प्रचार करताना दिसत आहेत. यामुळे कागदावर शिवसेनेच्या शिंदे गटाकडे तीन आमदार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे एक आमदार दिसत असला तरी, शिवसेनेला मानणारा प्रत्यक्ष मतदार या लोकसभा निवडणुकीत कुणाच्या बाजूने कौल देणार, खैरे की भुमरे? हे महत्त्वाचे ठरणार आहे. 

युतीचे उमेदवार असलेल्या संदिपान भुमरे यांच्या दृष्टीने हे अधिक महत्त्वाचे असणार आहे. कारण, भुमरे ज्या पैठण तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत, तो पैठण तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत असला, तरी लोकसभा मतदारसंघात येत नाही. यामुळे त्यांना त्यांची हक्काची मतं मिळणार नाहीत. अर्थात त्यांची मदार ही शिवसेना आमदारांच्या मेहनतीवर आणि व्यूहरचनेवर असणार आहे.

असं आहे मतांचं समीकरण - 
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 3,89,042 मते मिळाली होती, तर चंद्रकांत खैरेंना 3,84,550 मते मिळाली होती. काँग्रेसचे नेते सुभाष झांबड यांना 91,789 आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना 2,83,798 मते मिळाली होती. तेव्हा जाधव यांनीच चंद्रकांत खैरे यांचे गणित बिघडवल्याचे बोलले जाते. यावेळीही लोकसभा निवडणुकीत मतविभाजन होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात साधारणपणे 20 लाखांहून अधिक मतदार आहेत.

इम्तियाज जलीलांना पुन्हा लागणार का लॉटरी? अशी आहे स्थिती -
इम्तियाज जलीलांचा विचार करता, 2019 च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळीही मुस्लीम समाजाची बहुतांश मतं जलीलांच्या पारड्यात जाऊ शकतील. मात्र, गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळी जलीलांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडीची ताकद नाही. कारण, यावेळी वंचितने अफसर खान यांच्या रुपाने आपला स्वतंत्र उमेदवार दिला आहे. त्याचा फटका जलीलांना बसू शकतो. मात्र त्याचवेळी, हर्षवर्धन जाधव कुणाची मतं घेतात, किती प्रमाणात मतं कापतात, यावर त्यांचं भवितव्य अवलंबून असेल. जलील यांनी आदर्श बँक घोटाळा प्रकरण चांगलेच उचलून धरले होते, आंदोलनही केले होते. याचा काही प्रमाणावर फायदा त्यांना होऊ शकतो.   

चंद्रकांत खैरेंचं काय होणार? यावेळी भाजपाची सथ नाही, सहानुभूतीचा मिळेल का फायदा? -
राज्यात शिवसेनेचे विभाजन झाले, एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या. त्याच प्रमाणे स्थानिक पातळीवरही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे विभाजन झाले. यात बराच मोठा भाग एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडेही गेल्याचे दिसते आणि काही इतर पक्षात. यामुळे चंद्रकांत खैरे यांना सर्कल आणि बुथ लेवलवर कार्यकर्त्यांची कमतरता भासू शकते. चित्र असे आहे, गेल्या वेळी ज्यांनी चंद्रकांत खैरे यांचा प्रचार केला, ते आता त्यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांचा प्रचार करताना दिसत आहेत. याचाही मोठा फटका खैरेंना बसू शकतो. 

दुसरे म्हणजे, गेल्या निवडणुकीत अखंड शिवसेनेसह भाजपची संपूर्ण ताकद चंद्रकांत खैरे यांच्या बाजूने होती. ती आता नसणार. मात्र, भाजपच्या बदल्यात त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार गट) साथ मिळाली आहे. पण मतांचा विचार करता, तेव्हाचे आघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांना 91,789 मते मिळाली होती. त्यामुळे ती कितपत पुरेशी ठरतील, असा प्रश्न आहे. त्यातही आता राष्ट्रवादीचेही दोन गटात विभाजन झाले आहे. मात्र, असे असले तरी, सध्या स्थानिक पातळीवर जनतेमध्ये उद्धव ठाकरेंसंदर्भात असलेल्या सहानुभूतीचा फायदाही खैरे यांना होऊ शकतो. याशिवाय, यावेळी खैरे भाजपविरोधात असल्याने काही प्रमाणावर अल्पसंख्यकांची मतेही खैरे यांना मिळू शकतात.

संदिपान भुमरेंचं काय होणार? मोदींचा चेहरा कामी येणार? -
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील युतीच्या आमदारांवर भुमरे यांची भिस्त आहे. भुमरे यांच्या उमेदवारीची घोषणा होताच, विरोधकांनी  त्यांच्यावर पहिला आरोप केला तो दारू व्यावसायिक असल्याचा. तेव्हापासून आतापर्यंत मतदारांमध्ये आणि सोशल मीडियावरही यासंदर्भात चर्चा होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे, उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानं जो वर्ग नाराज आहे, तोही विरोधात जाऊ शकतो. त्याचा कितपत फटका बसतो हे पाहावं लागेल. 

याउलट, भुमरे यांच्यासाठी जमेची बाजू म्हणजे भाजप सारखा मोठा पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा चेहरा त्यांच्यासोबत आहे. कारण, एकीकडे जसा उद्धव ठाकरेबद्दल सहानुभूती असलेला मतदार आहे, तसाच दुसऱ्या बाजूला पंतप्रधान मोदींचे आकर्षण असलेला मतदारही मोठा आहे. भुमरे नव्हे, आम्ही मोदींच्या चेहऱ्याकडे बघून मतदान करणार, असेही लोक म्हणत आहेत. याशिवाय, भुमरे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री झाल्यानंतर, त्यांनी जिल्हाभरात बरीच कामे केली आहेत. अगदी गुरांच्या गोठ्या पासून, शेतकऱ्यांना विहिरी मंजूर करून देईपर्यंत आणि अनेक गावांत रस्त्यांची आणि पेवरब्लॉकच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीही दिला आहे. याचा फायदाही त्यांना होऊ शकतो. याशिवाय भुमरे यांच्या पाठीशी शिवसेनेच्या (शिंदे गट) तीन आणि भाजपच्या दोन आमदारांची ताकदही उभे आहेत. 

मराठा समाजाची मतं कुणाकडे जाणार? -
गेल्या काही दिवसांत मराठा आरक्षणाचा मुद्दा जबरदस्त गाजला. मराठा समाजातील बहुतांश लोकांच्या मनात भाजपाबद्दल काहीसा रोष आहे. अशा स्थितीत महायुतीने मराठा चेहराच मैदानात उतरवलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला चंद्रकांत खैरे आहेत. इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांचे कौतुकही केले होते. मात्र जलील यांनी छत्रपती संभाजीनगर नावाला केलेला विरोध मराठा समाजाला अजिबातच पटलेला नव्हता. गेल्या वेळी मराठा समाजाने हर्षवर्धन जाधव यांना मोठ्या प्रमाणावर मतदान केले होते. मात्र यावेळी त्यांच्यासोबत मराठा समाज फारसा दिसत नाही. यामुळे आता मराठा समाज कुणाच्या बाजूने मतदान करणार? यावर बरेच काही अवलंबून आहे. मात्र सध्या तरी मराठा समाज विभागलेला दिसत आहे. मराठा समाजाचा काही भाग युतीकडे, तर मोठा भाग महाविकास आघाडीकडे जाऊ शकतो, असे दिसते.

निशाणीचं कन्फ्युजन -
13 मे रोजी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. मात्र अद्यापही धनुष्यबाण कुणाचा आणि मशाल कुणाची? हा निशाणीचा घोळ, कन्फ्युजन संपलेले दिसत नाही. मतदारांमध्ये विशेष करून महिला वर्गात निशाणीचा घोळ अजूनही कायम आहे. अद्यापही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मशाल चिन्ह शेवटच्या व्यक्तीपर्यंत अथवा घराघरात पोहोचलेले दिसत नाही. याचा मोठा फटका चंद्रकांत खैरे यांना बसू शकतो. तर भुमरे यांना याचा फायदा मिळू शकतो. इतकी अटीतटीची लढाई असूनही, यंदा प्रचार काहीसा थंडच वाटला. त्यामुळे आता मतदानाच्या दिवशी मतदारांना घराबाहेर काढण्यात कोण यशस्वी ठरणार, मतदानाचा टक्का वाढणार की कमी होणार, यावर ४ तारखेचा निकाल अवलंबून असेल.

Web Title: lok sabha election 2024 In Aurangabad the result was divided by vote; This time 'mathematics' is different, who will win chandrakant khaire sandipan bhumre imtiaz jaleel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.