एसआयटी पथकात आणखी १२ कर्मचाऱ्यांची भर
By Admin | Published: November 22, 2015 11:24 PM2015-11-22T23:24:13+5:302015-11-22T23:42:48+5:30
शिरीष शिंदे , बीड येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या १४१ कोटी रूपयांच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विशेष तपासणी पथकाची स्थापना यापुर्वीच करण्यात आली आहे
शिरीष शिंदे , बीड
येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या १४१ कोटी रूपयांच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विशेष तपासणी पथकाची स्थापना यापुर्वीच करण्यात आली आहे. या घोटाळ्याच्या तपासाचा वेग वाढविण्यासाठी तसेच पारदर्शकात आणण्याच्या उद्देशाने पथकातील एक उपविभागीय अधिकारी व आठ कर्मचाऱ्यांच्या ताफर्यात आणखी सात अधिकारी व पाच कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंतच्या तपासाच्या अनुषंगाने विशेष पोलीस महानिरीक्षका विश्वास नांगरे पाटील यांनी तीन बैठका घेतल्या आहेत.
विशेष पथकामध्ये पुर्वी अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी नीलेश मोरे व इतर आठ पीय व एपीआयचा समावेश होता. आता नवीन १२ कर्मचाऱ्यांमध्ये माजलगाव येथील सहायक पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी यांच्यासह धारुर ठाण्याचे पोनि धरमसिंग चव्हाण, नेकनुर ठाण्याचे बाबासाहेब भुसारे यांच्यासह इतरांचा समावेश आहे. पोनि चव्हाण यांचे शिक्षण कॉमर्स विषया झाले असल्याने त्यांची निवड झाली असल्याचे समजते. दरम्यान,बीड येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १४१ कोटी रूपयांचा घोटाळा झाला होता.
या प्रकरणाच्या तपासामध्ये प्रगती नाही, असा ठपका ठेवत हे प्रकरण विशेष तपासणी पथकामार्फत तपासावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. पी. आर. बोरा यांनी दिले होते. त्यानंतर विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांना पत्र पाठवून पथक तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
रविवारी झाली बैठक
अंबाजोगाई येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात डीसीसी घोटाळ्यासंदर्भात बैठक रविवारी पार पडली. यावेळी पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी तपास झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आले. ५० लाख रूपयांपर्यंतचा तपास एपीआय, १ कोटी रूपयापर्यंतचा तपास पीआय तर पाच कोटी रूपयापर्यंतचा तपास डीवायएसपी करणार आहेत.
डीसीसीच्या १४१ कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी १३१ गुन्हे दाखल झाल्याची माहिती सहायक सरकारी वकील सुजीत कार्लेकर यांनी उच्च न्यायालयाला दिली होती. आता पर्यंत या पैकी काही बहुतांश गुन्ह्यांचा तपास पुर्ण झाला असून सात गुन्हे पथकाच्या तपासावर आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता पर्यंत ज्या प्रकरणांचा तपास पुर्ण झालेला आहे त्यांची पडताळी केली जाणार आहे. त्यानंरत उच्च न्यायालयास संपुर्ण गुन्ह्यांचे दोषारोप पत्र सादर केले जाणार आहेत.
४दरम्यान, बीड जिल्ह्यातील सादोळा येथील सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य हरिभाऊ सोळंके यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. गुन्हे नोंदविलेल्या गुन्ह्यांचा तपास करून आरोपपत्र दाखल करण्याची विनंती सोळंके यांनी याचिकेत केली होती.