विम्याचे पैसे, शिष्यवृत्ती घरकुल हवीय? पण हंगामी कामगार म्हणून नोंद केलीय का?

By साहेबराव हिवराळे | Published: December 27, 2023 08:36 PM2023-12-27T20:36:21+5:302023-12-27T20:36:35+5:30

‘हंगामी कामगार’ म्हणून जी नोंदणी असते, ती ‘नोंदणी’ शासनदरबारी असते. ती दरवर्षी करावीच लागते.

Need insurance money, scholarships and a cot? But registered as a seasonal worker? | विम्याचे पैसे, शिष्यवृत्ती घरकुल हवीय? पण हंगामी कामगार म्हणून नोंद केलीय का?

विम्याचे पैसे, शिष्यवृत्ती घरकुल हवीय? पण हंगामी कामगार म्हणून नोंद केलीय का?

छत्रपती संभाजीनगर : हंगामी कामगारांना विविध योजनांपासून दूर राहावे लागत आहे. यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर असून अधिकृत नोंदणी करूनही आम्हाला त्या योजनांचा फायदा मिळत नसल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल या हंगामी कामगारांनी केला आहे.

कोणकोणत्या योजनांचा समावेश आहे?
हंगामी कामगारांसाठी अपघात विमा, घरकुल योजना, मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना, आदी या योजना आहेत. या योजनांचे विविध फायदे, सवलती हंगामी कामगारांना मिळत नसल्याची बाब समोर आली आहे.

कुटुंबीयांतूनही नाराजी
‘हंगामी कामगार’ म्हणून जी नोंदणी असते, ती ‘नोंदणी’ शासनदरबारी असते. ती दरवर्षी करावीच लागते. ही नोंदणी ऑनलाइन किंवा ऑफलाइन करणे आवश्यक आहे; परंतु काही कारणाने ही नोंदणी झाली नाही की योजनांच्या फायद्यापासून वंचित राहावे लागते. अपघात विमा योजना ही खरे तर हंगामी कामगारांसाठी योग्य, अचूक आणि फायदेशीर योजना आहे. त्यासंबंधी तरी फायदा व्हावा असे कुटुंबीयांना वाटत असते; पण या योजनेच्या फायद्यांपासूनही वंचित राहावे लागते; कारण हंगामी कामगार म्हणून नोंद नसते. विमा योजनेत काम करताना अपघात झाल्यास विम्याचे २ लाख रुपये मिळत असतात; पण कागदपत्रांची पूर्तता नसल्याने या योजनेत नावनोंदणी करूनही फायदा होत नाही.

पुनर्नाेंदणी का नाही?
- एकदा नोंदणी झाली की काम नसल्यास कामगार गावाकडे निघून जाणे.
- दरवर्षी नोंदणी करावी लागतेच हे माहीत नसणे.
- नोंदणी करताना आलेल्या जाचक अटी व नियमांची पूर्तता करता-करता नाकी नऊ येणे.
- दुष्काळाच्या सावटामुळे खेड्यात गेलेल्या कामगारांना शेतावरून ‘मजूर’ पुन्हा शहरात परतले असले तरी पुन्हा नोंदणी न झाल्यामुळेही कामगार उपायुक्त मंडळाकडून मिळणाऱ्या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.

अर्ज का टाळले जातात?
वेळेच्या आत दरवर्षी पुनर्नाेंदणी करणे आवश्यक आहे. सर्व योजनांचा फायदा होऊ शकतो. विमा, शिष्यवृत्ती किंवा तत्सम कुठलीही योजना असो; हंगामी कामगार म्हणून नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. याशिवाय विमा असलेल्या तारखेत अपघात घडला असल्यास तो प्रामुख्याने मंजूर केला जातो. अपघात बांधकामावरच झालेला असावा अन्यथा तो निकषांत बसत नसल्याने तो डावलला जातो.
- जी. बी. बोरसे, सहायक आयुक्त

पेंडिंग असलेले क्लेम मंजूर करावेत
शहर व परिसरात अपघातादरम्यान झालेल्या घटनांतही मजुरांना त्यांचा विमा क्लेम मिळत नाही. अनेकदा कार्यालयात फेऱ्या मारूनही कर्मचारी अपुऱ्या संख्येमुळे तो डावलण्यात येतो. अधिकाऱ्यांना कळवूनही ते दुर्लक्ष करतात; त्यामुळे मजुरांच्या कुटुंबीयांना वंचित राहावे लागते.
- प्रेम चव्हाण, कामगार नेते

Web Title: Need insurance money, scholarships and a cot? But registered as a seasonal worker?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.