पपई उत्पादनातून शेतकऱ्यांसमोर ठेवला आदर्श
By Admin | Published: December 15, 2015 11:37 PM2015-12-15T23:37:28+5:302015-12-15T23:43:25+5:30
प्रसाद आर्वीकर, परभणी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी वर्षभर शासनासोबत दोन हात करणाऱ्या कॉ़ विलास बाबर यांनी स्वत:च्या शेतीत अभ्यासपूर्ण बदल करीत शेतकऱ्यांसमोर एक परिपाठ निर्माण केला आहे़
प्रसाद आर्वीकर, परभणी
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी वर्षभर शासनासोबत दोन हात करणाऱ्या कॉ़ विलास बाबर यांनी स्वत:च्या शेतीत अभ्यासपूर्ण बदल करीत शेतकऱ्यांसमोर एक परिपाठ निर्माण केला आहे़ सरकार आणि निसर्ग दोघेही साथ देत नाही, अशा वेळेला स्वत: खंबीर होऊन सक्षम बनावे, असा सल्ला त्यांनी यानिमित्ताने दिला़
कॉ़ विलास बाबर हे तालुक्यातील सुरपिंपरी येथील शेतकरी़ डाळींब, ऊस ही पिके पाणी नसल्याने पिके पूर्णत: मोडून काढली आणि यावर्षी निर्माण झालेल्या वातावरणाचा अभ्यास करीत पपईचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला़ तैवान ७८६ या वाणाच्या पपईची तीन एकरात लागवड केली़ विहिरींचे पाणी कमी झाल्याने शेततळे घेऊन पपईसाठी संरक्षित पाणीसाठा उपलब्ध केला़ सर्वसाधारणपणे पपईचे एकरी ४० टन उत्पन्न मिळते. मात्र आपण योग्य नियोजन केल्याने एकरी ५० टन उत्पन्न मिळेल, अशी आशा त्यांना आहे़ सध्या ६० टन पपई मुंबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविली आहे़ पपई हे सर्वात नाजूक पीक आहे़ लवकर रोगाचा प्रादुर्भाव होतो़ त्यामुळे प्रत्येक वेळी या पिकाची निगा राखत रोग होऊ नये, याची काळजी घेतली़ परिणामी आज दर्जेदार उत्पादन निघाले आहे आणि बाजारात चांगली मागणी मिळाली़
तज्ज्ञांचा सल्ला घेतला
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांवर संकटांची मालिका सुरू आहे़ अशा स्थितीत शेतकऱ्यांनी खर्च न वाढविता पिकांचे उत्पादन घ्यावे़ बाजारपेठेचा अभ्यास करावा़ आपल्याकडे कृषी विद्यापीठ आहे़ काही शेतकऱ्यांनी चांगले बदल करीत प्रयोगशीलता जोपासली आहे़ अशा तज्ज्ञांशी संपर्कात रहावे आणि संपूर्ण नियोजन करून पीक घ्यावे़ मी देखील हे बदल केले आहेत़
-कॉ़ विलास बाबर