दिवाळीनंतर फुटणार राजकीय फटाके
By Admin | Published: November 14, 2015 12:10 AM2015-11-14T00:10:10+5:302015-11-14T00:49:49+5:30
कळंब : शहरात अनियमित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, पालिकेच्या पाणीपुरवठा समितीतील चार सदस्यांनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केली आहे़
कळंब : शहरात अनियमित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, पालिकेच्या पाणीपुरवठा समितीतील चार सदस्यांनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केली आहे़ परिणामी दिवाळीनंतर पाणीप्रश्नावरून पालिकेत राजकीय फटाके जोरात फुटण्याची शक्यता आहे़
शहराच्या काही भागात सध्या सात ते आठ दिवसाआड तर काही भागात चार ते पाच दिवसाआड पाण्याचा पुरवठा केला जातो़ पालिका प्रशासनाच्या कारभारावर विसंभून न राहता काही सदस्यांनी आपापल्या प्रभागात स्वखर्चाने पाणी उपलब्ध करून दिले आहे़ एकंदरीत शहरात पाणी समस्येवरून नागरिकांमध्येही असंतोष दिसत आहे़ मांजरा धरणातून शहराला पाण्याचा पुरवठा होता़ हा पाणीपुरवठा दीर्घकाळ टिकणार नाही, या कारणाने नगर पालिकेने पाणी कपात करून बचतीचा मार्ग अवलंबिला आहे़ परंतू धरणात पाणीसाठा आहे, तोपर्यंत पुरेसा व नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शहरवासियांतून होत आहे़ शहरवासियांच्या या मागणीला पालिका प्रशासन मात्र दाद देताना दिसत नाही़ मांजरा धरणातून इतर शहर तसेच गावांना पाण्याचा पुरवठा होतो़ त्या ठिकाणी पाणी बचत करण्यासाठी पाणी कपात होते का ? हे पाहून नगर पालिकेने धोरण ठरवावे, अशी मागणीही होत आहे़
शहरातील पाणी समस्या पाहता पाणी पुरवठा समितीवरील सदस्य पांडुरंग कुंभार, संजय मुंदडा, कांतीलाल बागरेचा व छायाताई आष्टेकर या नगरसेवकांनी समितीच्या बैठकीत शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे लेखी आदेश पाणीपुरवठा विभागाला दिले होते़ या आदेशाला केराची टोपली दाखवून सात ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे धोरण कायम ठेवण्यात आले आहे़ पालिकेतील काही मंडळींच्या दबावामुळे पाणीपुरवठा विभागाने समितीचे आदेश धुडकावल्याची चर्चाही सुरू आहे़ पाणी पुरवठ्याचे श्रेय विरोधकांना जाऊ नये, यासाठी समितीच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे़ या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा समितीचे चार सदस्य १६ नोव्हेंबर रोजी राजीनामे देणार असल्याचे वृत्त आहे़ (वार्ताहर)