पूल प्रवास; ‘फुल्ल’ धोका !

By Admin | Published: August 4, 2016 11:53 PM2016-08-04T23:53:18+5:302016-08-05T00:15:32+5:30

बीड : रायगड जिल्ह्यातील महाड येथे सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याने चाळीस प्रवाशांना प्राण गमवावे लागले. या अनुषंगाने गुरुवारी ‘लोकमत’ने जिल्ह्यातील पुलांची पाहणी केली,

Pool travel; 'Full' danger! | पूल प्रवास; ‘फुल्ल’ धोका !

पूल प्रवास; ‘फुल्ल’ धोका !

googlenewsNext



बीड : रायगड जिल्ह्यातील महाड येथे सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याने चाळीस प्रवाशांना प्राण गमवावे लागले. या अनुषंगाने गुरुवारी ‘लोकमत’ने जिल्ह्यातील पुलांची पाहणी केली, तेव्हा पूल ‘फुल्ल’ धोक्याचे असल्याचे निदर्शनास आले. पुलांवरुन आरामात व निर्धोकपणे पैलतीर गाठता येईल, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. लोकप्रतिनिधी व प्रशासन महाडची पुनरावृत्ती होण्याची वाट पाहतेयं का? असा संतप्त सवालही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
शहरातील बिंदूसरा नदीवरील पूल निजामकालीन असून १९३२ मध्ये तो उभारल्याची प्रशासनदरबारी नोंद आहे. शहराचा वाढता विस्तार, भरमसाठ वाहने या पार्श्वभूमीवर नव्या पुलाची आवश्यकता होती; परंतु जुन्या पुलाच्या डागडुजीवरच कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. या पुलावर ऐन मधोमध गत आठवड्यात खड्डा पडला होता. दरवर्षी पावसाळ्यात तोे उघडा पडतो. हे भगदाड बुजवण्यासाठी तीन वर्षांपूर्वी ९० लाख रुपये खर्च केले होते. दरवर्षी तात्पुरती मलमपट्टी केली जाते; परंतु कायमस्वरुपी दुरुस्ती झाली नाही. डागडुजीसाठी वापरलेल्या लोखंडी पट्ट्या उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे पुलावरुन प्रवास करताना जीव मुठीत धरून जावे लागते. परळी राज्यमार्ग व सोलापूर राष्ट्रीय महामार्गाशी हा पूल जोडलेला आहे, त्यामुळे त्यावर कायम वर्दळ असते.
विशेष म्हणजे या पुलाची कालमर्यादा संपलेली आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन उदासीन असल्याचे पाहावयास मिळत आहे. जिल्हाभरातील इतर पुलांचीही याहून वेगळी स्थिती नाही. (प्रतिनिधी)
परळी तालुक्यात पुलांची अवस्था बिकट
परळी : तालुक्यातील अनेक गावांतील पुलांची संख्या बिकट झाली आहे. पांगरी, नागापूर या पुलांची रुंदी व दुरुस्ती वाढविणे आवश्यक आहे. नंदनज गावालगतचा पूल जीवघेणा व धोकादायक बनला आहे. या पुलाच्या नवीन बांधकामासाठी ग्रामस्थ गेल्या आठ वर्षांपासून अंबाजोगाईच्या सा.बां. विभागाकडे पाठपुरावा करीत आहेत; परंतु काम रखडले आहे. धर्मापुरीतील जिजामाता शाळेसमोर व गढूळ नदीवरील पुलाकडेही दुर्लक्ष झाल्याचा आरोप अ‍ॅड. गोविंद फड यांनी केला. नंदनज गावालगत ३४ वर्षांपूर्वी पुनर्वसनाच्या वेळी बांधलेला पूल अरूंद आहे. खोडवा सावरगाव तांड्याला पूलच नाही. वाघबेट, संगम, वडखेल, वानटाकळी, दौनापूर, बोधेगाव, तडोळी, मोहा, गोपाळपूर, कौडगाव घोडा, गाढेपिंपळगाव, राधोबा तांडा येथेही नवीन पुलांची कामे होणे गरजेचे असल्याचे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. टी.पी. मुंडे यांनी सांगितले.
अंबाजोगाई : तालुक्यात धोकादायक पुलावरून बिनधास्त वाहतूक होते. तालुक्यात आजही शेकडो पूल धोकादायक आहेत, तर ग्रामीण भागातील पुलांची मोठी दुरावस्था झालेली आहे. परिणामी लहान मोठे अपघात या परिसरात सातत्याने सुरूच असतात. धोकादायक पूल व रस्त्यावरील खड्डेही समस्या अंबाजोगाईकर वर्षांनुवर्षे निमूटपणे सहन करीत आहेत.
४ग्रामीण भागातील शेकडो पूल धोकादायक बनलेले आहेत. पुलाचे कठडे तुटणे, पडणे, याकडे गेल्या १० ते १२ वर्षात दुर्लक्ष झाल्याने ही परिस्थिती धोकादायक बनलेली आहे. तरीही या ठिकाणांहून होणारी वाहतूक ही बिनधास्तपणे होते.
४रिंगरोडवरून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मानवलोक संस्थेच्या जवळ मोठा पूल आहे. या पुलाचे कठडे गेल्या चार वर्षांपासून तुटलेल्या अवस्थेत आहेत.
गेवराई शहराजवळील विद्रुपा नदीवरील जमादारणीच्या पुलावरील कठडे गेल्या चार वर्षांपासून तुटलेले आहेत. या पुलावरून एक दुचाकीस्वार नदीत कोसळून ठार झाला होता. छोटे अपघातही झाले होते. हिरापूर येथील सिंदफना नदीवरील पुलाचे गेल्या दोन वर्षांपासून कठडे तुटलेले आहेत. धोंडराई, उमापूर पुलांचीही दयनीय अवस्था झालेली असून, तलवाडा येथील राजुरी मळा पूलही खड्डेमय झाला आहे. कठडे नसलेले तालुक्यातील प्रमुख मार्गावरील १० पूल धोकादायक आहेत.

Web Title: Pool travel; 'Full' danger!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.