साठे चौक बंद, मात्र वाहतूक समस्या कायम
By Admin | Published: November 25, 2015 10:56 PM2015-11-25T22:56:35+5:302015-11-25T23:23:25+5:30
शिरीष शिंदे , बीड मोठ्या अपघातास कारणीभूत ठरणारा अण्णा भाऊ साठे चौक अधीक्षकांच्या सुचनेवरुन बंद करत वाहतूक अश्विनी हॉटेल समोरून वळविण्यात आली.
शिरीष शिंदे , बीड
मोठ्या अपघातास कारणीभूत ठरणारा अण्णा भाऊ साठे चौक अधीक्षकांच्या सुचनेवरुन बंद करत वाहतूक अश्विनी हॉटेल समोरून वळविण्यात आली. मात्र, वाहतूक समस्या अद्यापही कायमच आहे. येथे सिग्नल बसविणे अत्यंत जोखमीचे ठरणार असल्याचे वाहतूक पोलिसांचे मत आहे तर वाहनधारकांनाही वळण घेताना अपघाताचा धोका कायम असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पहाणीवरुन समजुन आले. त्यामुळे वीर हॉस्पिटलजवळ सिग्नल बसविल्यास तो सर्वांनाच फायदेशीर ठरेल असे मत सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.
शहरातून राष्ट्रीय मार्ग गेल्यामुळे दिवसरात्र हा रस्ता रहदारीने व्यस्त असतो. मालवाहू गाड्यांमुळे अनेकांचे प्राण अण्णा भाऊ साठे चौकात गेले आहेत. चौक हा अपघाताचे केंद्र असल्यामुळे तो कायमचा बंद करण्याचे धाडस अधीक्षक अनिल पारसकर यांनी केले. ही वाहतूक हॉटेल अश्विनी समोरुन वळविली. ज्यांना सुभाष रोडकडे जायचे आहे त्यांनी हॉटेल अश्विनीसमोरून वळून क्रीडा संकुलाकडे जाणाऱ्या किंवा वळण घेऊन सरळ जात साठे चौकातून खाली जाण्याचे नियोजन झाले.
चार रस्ते जोडणारा मात्र चौक नसणारा रस्ता
साठे चौक बंद केल्यामुळे हॉटेल अश्विनीकडे जाण्याऱ्यांची संख्या अधिक वाढली. हा भाग हा चौक होत नाही. कारण, सहयोगनगर भागातून येणारा रस्ता, हनुमान मंदिराकडून येणारा रस्ता समोरासमोर नाही. त्यामुळे चौक होत नाही. अशा परिस्थितीत येथे सिग्नल लावणे हा योग्य निर्णय नसल्याचे समोर आले.
वीर हॉस्पिटलसमोरील जागा योग्य
वीर हॉस्पिटलसमोर मोठी जागा आहे कारण त्या ठिकाणी पार्किंगसाठी जागा सोडली आहे तर समोर विरुद्धबाजुला मोकळी जागा आहे. या ठिकाणी सिग्नल बसविल्यास बसस्थानकाकडून येणारी वाहने थांबतील. तसेच त्यांना अश्विनी हॉटेलसमोर जाऊन वळण्याची गरज भासणार नाही. याचा लाभ व्यापाऱ्यांना होईल. वीर हॉस्पिटलसमोर सिग्नल झाला तर नागरिकांना लगेच सुभाष रोडला जाता येईल. तसेच वीर हॉस्पिटलाच्या बाजुला रस्त्याच्या बाजुला उभी राहणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे शक्य होईल, अशा प्रतिक्रीया सर्व सामान्य नागरिकातून व्यक्त होत आहेत.
अश्विनी हॉटेलसमोर सिग्नल बसविण्याचा पेच वाहतूक पोलिसांसमोर निर्माण झाला आहे. या ठिकाणी सिग्नल बसविल्यास बसस्थानकाकडील येणारी वाहतूक सिग्नलवर येऊन थांबेल तर जालना रोडकडील येणारी वाहतूक ही दुसऱ्या बाजूने सिग्नलवर थांबेल. सिग्नल ग्रीन होण्यासाठी १ मिनिट २० सेकंदाचा कालावधी निश्चित केला तर यावेळेत मोंढा रोडकडे जाणारा रस्ता मोठ्या वाहनांमुळे ब्लॉक होईल. दुसरी बाब म्हणजे, सहयोगनगर भागातून व हनुमान मंदिराकडून येणारे वाहनधारक थांबु शकणार नाहीत. त्यांना जायचे असेल तर जालना रोडकडूून स्थानकाकडे व बसस्थानकाकडून जाणारी वाहने थांबली पाहिजेत. मात्र, सिग्नल त्या बाजुने असायला हवे हे होणे शक्य नाही. त्यामुळे या ठिकाणी सिग्नल बसविणे हा डोक्याला ताप होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.