पर्यटन स्थळांची वाताहत थांबवा!

By Admin | Published: January 22, 2016 12:11 AM2016-01-22T00:11:51+5:302016-01-22T00:11:51+5:30

विकास राऊत , औरंगाबाद राज्यातील औरंगाबाद हे एक महत्त्वाचे, मध्यवर्ती, औद्योगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटन केंद्र असून येथील पर्यटन स्थळांची वाताहत होत आहे.

Stop the tourists' tourism! | पर्यटन स्थळांची वाताहत थांबवा!

पर्यटन स्थळांची वाताहत थांबवा!

googlenewsNext


विकास राऊत , औरंगाबाद
राज्यातील औरंगाबाद हे एक महत्त्वाचे, मध्यवर्ती, औद्योगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटन केंद्र असून येथील पर्यटन स्थळांची वाताहत होत आहे. त्यांच्या संवर्धनाकडे शासन आणि मनपाने तसेच जिल्हा प्रशासनाने मिळून लक्ष देण्याची मागणी लोकमतने केलेल्या एका पाहणीतून पुढे आली आहे.
बहुतांश पर्यटन स्थळांतील साफसफाई वेळेत होत नाही. कचऱ्यांचे ढिगारे तेथेच पडलेले असतात. पिण्याचे पाणी आणि पार्किंगची सुविधा नसते. पार्किंगमध्ये बाहेरगावाहून आलेल्या पर्यटकांची लूट होते. काही पर्यटन स्थळे विद्रूप केली जात आहेत. त्यांचे संरक्षण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरातील ऐतिहासिक दरवाजांची पडझड होत आहे. त्यांची डागडुजी आणि देखभाल करण्यासाठी मनपाने लक्ष दिले पाहिजे. शहर व जिल्ह्यात देशी-विदेशी पर्यटक येतात. त्यांनी येथील ऐतिहासिक वास्तू पाहून समाधान व्यक्त केले पाहिजे; परंतु तसे काहीही दिसून येत नाही.
काही पर्यटन स्थळांच्या आडोशाने तळीराम आपली मैफल जमवितात. त्यामुळे अनेक वास्तंूमध्ये घाणेरडा कचरा साचून राहतो. वास्तूंचे संवर्धन होण्यासाठी जनजागृतीची गरजदेखील सर्व्हेतून पुढे आली आहे.
४०० वर्षांहून अधिक जुन्या ऐतिहासिक वास्तू आजही आहेत; परंतु त्या पूर्णरूपात नसून त्यांची पडझड होत आहे. ५२ दरवाजांचे हे शहर नावापुरते राहण्याची शक्यता पुढील काळात नाकारता येत नाही. औरंगाबादला दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. आजही जुन्या औरंगाबाद शहरात अशी अनेक महाद्वारे अर्थात दरवाजे आहेत. औरंगाबाद शहराचे जुने नाव खडकी असे होते. इतिहासकारांनी मलिक अंबर याने हे शहर वसविल्याचे नमूद केले आहे.
सुरक्षारक्षक असावेत
ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन आणि स्वच्छता अबाधित राहावी, यासाठी शासन, महापालिका आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. पर्यटनाची माहिती सर्वत्र देण्यासाठी नागरिकांनीदेखील शहराचा नावलौकिक सांगितला पाहिजे.
अनेक पर्यटन स्थळे सुरक्षारक्षकांअभावी आहेत. त्यामुळे तेथील वास्तूंची नासधूस होत आहे. वास्तूंच्या भिंतीवर कुठलाही मजकूर लिहिण्याचे प्रमाण वाढले आहे.
अजिंठा, वेरूळ, पितळखोरा आणि विद्यापीठ परिसरात औरंगाबाद लेण्या आहेत. गौताळा हे अभयारण्य आहे. सारोळा आणि म्हैसमाळ ही हिलस्टेशन्स शहरापासून काही अंतरावर आहेत. विद्यापीठ परिसरात सोनेरी महल आणि इतर काही ऐतिहासिक वास्तू आहेत. तेथून काही अंतरावर बीबी का मकबरा आहे. मकबऱ्यापासून १ कि़ मी.अंतरावर पाणचक्की आहे. शहरातील ५२ पैकी काही दरवाजे नामशेष झाले असून भडकल, रोशन, मकई, दिल्ली, महेमूद, बारापुल्ला यासारखे काही दरवाजे अजूनही टिकून आहेत. टाऊन हॉल इमारत मनपाने संवर्धन केली आहे. दौलताबाद येथील देवगिरी किल्ला, १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर, शिवाजी पुराणवस्तुसंग्रहालय, सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालय, सलीम अली सरोवर, खुलताबाद येथील औरंगजेबची कबर, पैठण येथील धरण व नाथ मंदिर अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे औरंगाबाद शहर व जिल्ह्यात आहेत.

Web Title: Stop the tourists' tourism!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.